विनोद जाधव एक संग्राहक

Monday 27 February 2023

१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजाची शिफारस ! - १६


  १४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजाची शिफारस ! - १६
संजय सोनावणे
या चढाईने रोहिल्यांच्या पदरात काय पडले ? युद्धाच्या आरंभी रोहिल्यांची फौज अठरा ते वीस हजाराच्या दरम्यान होती. यातील हजार - पाचशे लोक आरंभी गारद्यांच्या तोफांमुळे निकामी झाले असावेत. पुढे काहीजण, मराठी स्वारांशी लढताना ठार वा घायाळ झाले तरी अशांची संख्या पाचशेपेक्षा कमी किंवा हजारपेक्षा जास्त असणे शक्य नाही. सारांश, जवळपास सतरा - अठरा हजार रोहिले गारद्यांवर चालून गेले असे म्हणता येईल. त्यापैकी तीन ते पाच हजाराच्या आसपास लोक, गारदी सैनिकांच्या बंदुकींना बळी पडले असतील. पुढे गारद्यांशी झालेल्या हातघाईच्या लढाईत देखील जवळपास पाच ते सहा हजार मनुष्य जखमी / मृत झाले असतील. याचा अर्थ असा होतो कि, दुपारी एकच्या सुमारास रोहिला सैन्य जेव्हा परत आपल्या मोर्च्यात येऊन उभे राहिले, त्यावेळी त्याची संख्या आठ - दहा हजारांच्या दरम्यान असावी. थोडक्यात, मोठ्या प्रमाणावर आपली माणसे मारून घेण्यापलीकडे, रोहिला सरदारांच्या पदरात फारसे यश पडले नाही असे प्रथमदर्शनी तरी दिसून येते. परंतु अधिक विचार करता, रोहिल्यांना या चढाईत अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले असावे असे वाटते.
पानिपत मोहिमेत सहभागी झालेल्या गारदी सैन्याची संख्या एकूण किती होती याविषयी विश्वसनीय अशी माहिती मिळत नाही. उदगीर मोहिमेत गारद्यांचे पथक पाच हजारांचे होते असा उल्लेख शेजवलकर करतात. पुढे उत्तर हिंदुस्थानात जायचे ठरल्यावर त्यात आणखी भर घालून ते आठ हजाराचे बनवण्यात आले. पुढे या सैन्यात आणखी भरती झाली असल्याची माहिती उपलब्ध नाही. त्याशिवाय या सैन्याचे स्वरूप देखील फारसे स्पष्ट होत नाही. कवायती पलटणे म्हटल्यावर त्यासोबत काही हजार स्वारांचा रिसाला असतो. इब्राहिमच्या पलटणींसोबत असा रिसाला होता का ? काशीराजच्या मते, इब्राहिमकडे दोन हजार स्वार होते. परंतु कैफियतीमध्ये असा उल्लेख आढळत नाही. पानिपत लढाईची उपलब्ध वर्णने पाहता, इब्राहिमजवळ दोन हजार स्वारांचा रिसाला असावा असे वाटत नाही. एखादवेळेस, त्याच्याकडे स्वारांचे लहानसे पथक असू शकते. जर काशीराजच्या मतानुसार, इब्राहिमकडे दोन हजार स्वारांचा रिसाला असता तर, रोहिला सैन्य सहजासहजी माघार घेऊ शकले नसते. गारद्यांच्या घोडदळ पथकाने त्यांची कत्तल उडवली असती. परंतु, असे काही झाल्याचा उल्लेख नसल्याने व रोहिला सैन्य देखील यशस्वीपणे माघार घेऊन आपल्या मोर्च्यात उभी राहिल्याने, गारदी पलटणींसोबत दोन हजार स्वारांचा रिसाला नसल्याचे सहज सिद्ध होते. पानिपत युद्धाच्या वेळी इब्राहिमकडे सामान्यतः आठ ते नऊ पलटणी असाव्यात. त्यातील दोन त्याने अफगाण सैन्याच्या समाचारासाठी डाव्या बाजूला ठेवल्या होत्या तर उर्वरीत सात पलटणींच्या मदतीने त्याने रोहिल्यांच्या सामना केला. रोहिला फौजेचा सामना करून त्यांना पळवून लावण्यात गारदी यशस्वी झाले. पण या संघर्षात त्यांच्या जवळपास पाच पलटणी निकालात निघाल्याने त्यांचे सामर्थ्य देखील खच्ची झाले. फिरून लढाईला उभे राहण्याचा प्रसंग उद्भवला तर अवघ्या तीन - चार पलटणी हाताशी असल्याने, त्यांना शत्रूचा मुकाबला करणे तितकेसे सोपे जाणार नव्हते. याचा अर्थ असाही होतो कि, मराठी सैन्याची डावी बाजू यावेळी निकालात निघाली नसली तरी पक्षाघात झाल्याप्रमाणे ती काहीशी लुळी पडू लागली होती. गारदी सैन्याची हि स्थिती पाहता, रोहिल्यांची चढाई पूर्णतः नसली तरी अंशतः यशस्वी झाल्याचे दिसून येते. जरी गारद्यांनी, रोहिला सैन्याला पळवून लावले असले तरी त्यांचा मोर्चा कायम होता. आपल्या मोर्च्याच्या आधाराने त्यांना फिरून फळी बांधून, गारद्यांवर चढाई करण्यास मोकळीक राहिली.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...