विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 15 February 2023

पहिल्या महिला सरसेनापती श्रीमंत उमाबाईसाहेब दाभाडे

 


पहिल्या महिला सरसेनापती श्रीमंत उमाबाईसाहेब दाभाडे
पहिल्या महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे यांचा स्मृतिदिन २८ नोव्हेंबर रोजी होऊन गेला. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
..........
पराक्रमाची पराकाष्ठा करणारी इतिहासातील अनेक पात्रे अज्ञात असली, तरी त्या इतिहासाच्या पैलूंची चमक कधी कमी होत नसते. महिला सरसेनापती उमाबाई खंडेराव दाभाडे यांनी आपल्या पराक्रमाची झालर चढवली आणि इतिहासाला शौर्याचे अनोखे कोंदणही मिळाले.
भारताचा इतिहास लढवय्या रणरागिणींनी उजळवलेला आहे. महाराणी ताराराणी, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी अशी नावे घेता येतील. यात एक वेगळे नाव म्हणजे सरसेनापती श्रीमंत उमाबाई खंडेराव दाभाडे. इतिहासातील हा वेगळा पैलू अनेकदा नजरेआड झालेला दिसतो; मात्र हे एक वास्तव एका नव्या रणरागिणीची वेगळी ओळख करून देते. उमाबाईंचा आणि नाशिकचा संबंध काय हे पाहण्यासाठी सरदार दाभाड्यांची कारकीर्द जाणून घेणे गरजेचे आहे. इतिहासाला शौर्याचा रंग देण्यात त्या वेळच्या पराक्रमी सरदारांचे महत्त्वही तेवढेच आहे.
छत्रपतींच्या आदेशावर जीव ओवाळून टाकणाऱ्या अनेक सरदारांच्या पराक्रमाने मराठेशाहीचा इतिहास उजळून निघाला आहे. यात महाराष्ट्रातील सतराव्या शतकातील एक प्रसिद्ध मराठा घराणे म्हणजे पुण्यातील तळेगावचे दाभाडे घराणे. या घराण्याचे मूळ पुरुष बजाजी व त्यांचा मुलगा येसाजी हे शिवाजी महाराजांच्या पदरी होते. छत्रपती संभाजीराजांनीही त्यांना रायगडाची धुरा दिली.
छत्रपती संभाजी महाराजांनंतर ते छत्रपती राजाराम महाराजांच्या सेवेत दाखल झाले. येसाजींना खंडेराव आणि शिवाजी ही दोन मुले होती, तर खंडेरावांना त्रिंबकराव व यशवंतराव ही दोन मुले होती. खंडेराव पराक्रमी निघाले. त्यांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या. छत्रपती शाहू महाराजांनी खंडेरावांना सेनाखासखेल अन्‌ नंतर १७१७मध्ये सेनापतीपदी नेमले. खंडेराव दाभाडेंनी उत्तर सरहद्दीवर राहून खानदेश, वऱ्हाड व गुजरात या तीनही प्रांतांवर आपली पकड घट्ट केली.
डेरावांच्या मृत्यूनंतर छ. शाहूमहाराजांनी त्रिंबकरावास सेनापतिपद दिले. अंतर्गत वादातून झालेल्या डभईच्या लढाईत त्रिंबकराव मारले गेले अन्‌ येथूनच खंडेरावांची पत्नी अन्‌ त्रिंबकरावांची आई उमाबाईंचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला. छ. शाहूमहाराजांनी तळेगावात जाऊन उमाबाईंची समजूत काढून त्रिंबकरावाचा भाऊ यशवंतरावांना सरसेनापतिपदाची वस्त्रे दिली. यशवंतराव अल्पवयीन असल्याने सरसेनापतिपदाचा कारभार उमाबाई पाहू लागल्या अन्‌ त्या इतिहासातील पहिल्या महिला सरसेनापती झाल्या. उमाबाई म्हणजे अभोण्याच्या ठोके घराण्यातील कन्यारत्न. उमाबाई छत्रपती शाहूंचे सरसेनापती खंडेराव दाभाडेंच्या घरात सून म्हणून गेल्या.
खंडेरावांच्या निधनानंतर उमाबाईंचा मुलगा त्रिंबकरावांकडे सरसेनापतिपद सोपवले गेले. २५ नोव्हेंबर १७३० रोजी त्रिंबकरावांच्या मृत्यूमुळे उमाबाई दुखावल्या गेल्या. त्यानंतर छ. शाहूमहाराजांनी त्रिंबकरावांचा लहान भाऊ यशवंतरावांना सरसेनापतिपद, तर धाकट्या बाबुरावाकडे सेनाखासखेल ही पदे दिली; मात्र ते अल्पवयीन असल्याने सरसेनापती व सेनाखासखेल या दोन्ही पदांचा कारभार उमाबाईंच्या हाती आला. पती आणि मुलाच्या मृत्यूचे दु:ख उमाबाईंनी काळजात एकवटले आणि रणभूमीवर उतरल्या.
गुजरातचा बहुतेक भाग मराठ्यांच्या ताब्यात असला, तरी दिल्लीच्या बादशहाने आपली दहशत कायम ठेवली होती. दाभाडेंची पकड गुजरातवरून कमी झाल्याचे पाहून मारवाडचा राजा अभयसिंग याने दिल्ली बादशहाच्या मदतीने आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्याने बडोदा हस्तगत करून डभईला वेढा घातला. पिलाजी गायकवाड उमाबाईंचा उजवा हात होता. हे ओळखून अभयसिंगने पिलाजींचा खून घडविला. उमाबाईंचा बाणेदारपणा त्यांच्या लष्करी नेतृत्वात होता. हेच दाखवत पिलाजींच्या हत्येनंतर उमाबाईंनी अभयसिंगवर स्वारी केली.
उमाबाईंच्या भीतीने हार पत्करून अभयसिंग गुजरातमधून पळाला; मात्र अहमदाबादमधील मुघलांचे ठाणे अजूनही कायम होते. १७३२मध्ये उमाबाईंनी गुजरातवर दुसरी स्वारी केली. या वेळी मुघलांच्या जोरावरखान बाबी नावाच्या सरदाराने ‘एक विधवा माझ्याशी काय लढणार, तुझा निभाव लागणार नाही,’ अशा आशयाचे पत्र उमाबाईंना पाठवले. याचे उत्तर रणांगणात हत्तीवर बसलेल्या पांढऱ्या शुभ्र वेशातील सरसेनापती उमाबाईंनी युद्धात अलौकिक शौर्य गाजवून दिले.
उमाबाईंचे रौद्ररूप पाहून जोरावरखान अहमदाबादच्या तटात लपला. मराठा सैन्याने मुघल पठाणांचे मृतदेह एकावर एक खच करून तटावर जाण्याचा मार्ग तयार केला, अशी नोंद इतिहासात मिळते. एका महिला सरसेनापतीने केलेल्या या कामगिरीवर छत्रपती शाहू महाराज खूश झाले होते. त्यांनी उमाबाईंना साताऱ्यात बोलावून दरबारात त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या पायात सोन्याचे तोडे घातले.
उमाबाईंची तब्येत नंतरच्या काळात खालावली. २८ नोव्हेंबर १७५३ रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले. सरसेनापती हा बहुमान मिळालेल्या व रणांगणावर शौर्य गाजवून, सोन्याचे तोडे पायात घालण्याचा सन्मान मिळालेल्या उमाबाई खंडेराव दाभाडे या इतिहासात एकमेव महिला सरसेनापती होऊन गेल्या.
पेशवा बाजीरावांमुळे उमाबाईंचा मोठा मुलगा मारला गेला होता. त्यामुळे साहजिकच उमाबाईंचा बाजीरावांवर राग होता. परंतु नाईलाजाने त्यांना बाजीरावांना साथ देणे भाग होते. छत्रपती राजाराम दुसरे यांच्या काळात पेशवा होते बाळाजी बाजीराव आणि याच काळात त्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. म्हणून त्यांनी दाभाडे घराण्याशी करार करून त्यांच्या मिळकतीत हक्क दाखविला आणि दाभाड्यांना अडचणीत आणले. या कराराला विरोध करूनदेखील उमाबाईंचा प्रयत्न असफल झाला.
या लढ्यात उमाबाईंना साथ मिळाली ती म्हणजे छत्रपती ताराराणींची. ताराराणींनादेखील पेशव्यांबद्दल राग होता म्हणूनच त्यांनी उमाबाईंशी संधान बांधले आणि परस्परांना मदत करण्याचे आश्वासन दिले. उमाबाईंनी इतके वाद असूनही लढाई करण्याचे विचार बाजूला ठेवले होते व चर्चेवर भर देण्याकडे त्यांचा कल होता. त्यांचे समजूतदारीचे अनेक प्रयत्न फोल गेले. परंतु तरीही उमाबाईंनी एक शेवटचा प्रयत्न म्हणून आपल्यातर्फे महादेव निरगुडे यांना सलोख्याची बोलणी करण्यासाठी पेशवे दफ्तरी धाडले. परंतु पेशव्यांनी हीदेखील विनंती धुडकावून लावली.
याउपरही उमाबाईंनी स्वतः आळंदी येथे पेशव्यांची भेट घेतली व ‘हा करार आमच्यावर जबरदस्तीने लादला गेला असून आम्हाला तो मान्य नाही. त्यामुळे हा करार रद्द करण्यात यावा,’ असा दावा केला. परंतु, हा दावा झुगारून लावत पेशवा दाभाडे घराण्याच्या गुजरातमधील मिळकतीमधील अर्ध्या हिश्श्याच्या मागणीवर अडून राहिले. आता मात्र सलोख्याचे प्रयत्न करून भागण्यासारखे नव्हते. काही तरी ठोस कृती गरजेची होती.
पेशव्यांविरुद्ध उमाबाई
सलोख्याचे सर्व प्रयत्न व विनंत्या धुडकारून लावल्याने आता उमाबाईंनी लढाईचा मार्ग स्वीकारला. आधीच ठरलेल्या करारानुसार ताराराणीसाहे देखील त्यांच्या सोबत होत्या. १७५० साली पेशवा बाळाजी बाजीराव मुघल मोहिमेवर गेले असता अतिशय चलाखीने ताराराणींनी छत्रपती राजाराम (दुसरे) यांना कैद केले. ताराराणींच्या मदतीला पुढे उमाबाईंनी आपले मराठा व गुजरात असे दुहेरी सैन्य दमाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पाठविले. सुरुवातीला यश पदरी येत होते. परंतु, पुढे परिस्थिती उलटी झाली आणि दमाजी जाळ्यात अडकले आणि कृष्णा नदीच्या नजीक दरीत फसले गेले.
दमाजी गायकवाडांना ताब्यात घेतले गेले आणि पेशव्यांशी करार करण्यास त्यांना दबाव टाकण्यात आला. करारानुसार गुजरातेतील अर्धा वाटा व या केलेल्या हल्ल्याची नुकसानभरपाई म्हणून मोठी रक्कमदेखील मागितली. दमाजींनी या मागणीला विरोध केला. पेशव्यांनी दमाजींना त्यांच्या परिवारासकट कैद केले, पाठोपाठ उमाबाई व त्यांच्या परिवारातील काही सदस्यांनादेखील कैद केले गेले. परिणामस्वरूप दाभाडे घराण्याची जहागीर परत घेतली गेली व त्यांचे सेनापतिपददेखील हिरावले गेले.
२८ नोव्हेंबर १७५३ रोजी पुणे येथे उमाबाईंचा मृत्यू झाला. तळेगाव येथे त्यांची समाधी आहे. पेशव्यांशी लढण्यात त्यांना यश आले नाही; पण एक स्त्री म्हणून तेव्हाच्या काळात परिवारासोबत इतक्या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडणे खरेच कठीण काम होते. या सगळ्या विरोधांना, संकटांना मात देत आपल्या पतीच्या पश्चात उमाबाईंनी जवळजवळ २० वर्षे आपली सत्ता सांभाळली. स्त्री शक्तीला कमी लेखणाऱ्यांसाठी उमाबाई दाभाडे हे नेहमीच एक उत्तम उदाहरण राहील.
सरसेनापती उमाबाई दाभाडे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन.
- डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर
(इतिहास अभ्यासक, पुणे)

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...