विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 5 March 2023

रायगडावरील मराठ्यांचा दफ्तरखाना आणि छत्रपतींचे सिंहासन


रायगडावरील मराठ्यांचा दफ्तरखाना आणि छत्रपतींचे सिंहासन

छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मुगलानी राजधानी रायगडास वेढा घालून रायगड जिंकून घेतला . महाराणी येसूबाई यांच्यासह शाहू महाराज व इतर राजपरीवार मोगली कैदेत गेले. रायगडावर असेलेला मराठ्यांचा दफ्तरखाना व छत्रपतींचे ३२ मण सोन्याचे सिंहासन याबात नेमके काय घडले ?
  • मराठ्यांचा दफ्तरखाना
दफ्तरखाना म्हणजे राज्यातील किंवा परराज्यातील लोकांशी झालेला पत्रव्यवहार , सरदाराना तसेच वतनदाराना दिलेलेया सनदा किंवा बक्षीसपत्र , अपराध्यास शिक्षा केल्याच्या नोंदी , न्यायनिवाडे केल्याच्या नोंदी , दुर्मिळ हस्तलिखित , धार्मिक ग्रंथ, पूर्वजांची माहिती असलेल्या नोदी किंवा आताच्या भाषेत बखरी तसेच इतर गोपनीय दस्तावेज
पेशवे दफ्तर खंड ४२ सातारा छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या रोजनिशीतील उतारे यात आपणास मराठ्यांच्या दफ्तरखाण्याविषयी एक नोंद आढळून येते. मराठ्यांचा इतिहास लिहिणार इंग्रज अधिकारी म्हणजे ग्रंड डफ याने मराठ्यांचा इतिहास संकलित करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी सुरवात केली व तो सातारा दरबारात पोहचला. ११ जुलै १८१९ रोजी ग्रंड डफ याने बळवंतराव चिटणीस यांना प्रश्न केला “ शिवाजी महाराजांचे तहनामे वैगरे साधनी कागद काही जुने आहेत का ? बळवंतराव चिटणीस यांनी उत्तर दिले “ रायगडास औरंगजेबाचा वेढा पडला. किल्ला घेऊन शाहू महाराज काबिले सर्व धरून नेले. संभाजी महाराजांस धरून नेले आणि मारिले नंतर यांस ( शाहू महाराज ) नेले. तेव्हा मालमालीयेत दौलत ( धन दौलत ) कागदपत्र सर्व पाद्शाहाचे हस्तगत झाले. राजाराम महाराज मात्र सडे पळून गेले. त्यामुळे जुने कागद तहनामे राहिले नाहीत.एक सावंतांचा तहनामा होता तो बाजीराव रघुनाथ यांनी चार पाच वर्षापूर्वी सावंतांच्या भांडणावेळी पहावयास नेला होता तो तहनामा परत आणून न देताच स्वतःच्या जवाहीरखाण्यात ठेवला परत दिला नाही.
सदर नोंद पाहता लक्षात येते कि रायगडावरील दफ्तरखाना हा मोगल सरदार जुल्फिरखानाने हस्तगत केला. औरंगजेबाने कागदपत्रातून राजकारणास आवश्यक गुप्त माहिती मिळाल्यावर तो दफ्तरखाना नष्ट केला कि कोणत्या सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवला याविषयीची कोणतीही नोंद आढळून येत नाही.
  • छत्रपतींचे ३२ मण सोन्याचे सिंहासन
सभासद बखरीतील नोंदीनुसार " पुढे तख्तारूढ व्हावे म्हणून तख्त सुवर्णाचे बत्तीस मणाचे सिद्ध करविले. नवरत्ने अमोलिक जितकी कोशात होती त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने तख्तास जडाव केली. जडित सिंहासन सिद्ध केले. "
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या दिवशीची, म्हणजेच ६ जून १६७४ ची प्रत्यक्षदर्शीची नोंद इंग्रजांचा प्रतिनिधी हेन्री ऑक्सिडेनच्या रायगडाच्या शिष्टाइची रोजनिशीतील नोंद
शिवाजींचे आमच्याकडे लक्ष जाताच त्याने अगदी सिंहासनाच्या पायरीजवळ येण्याचा आम्हाला हुकुम केला. व पोशाख देवून आम्हाला तत्काळ रजा दिली. थोडाच वेळ आम्ही सिंहासनसमोर होतो. तेवढ्या वेळात सिंहासनाच्या दोन्ही बाजूला सुवर्णाकीत भालाच्या टोकावर अनेक अधिकारदर्शक व राजसत्तेची चिन्हे असल्याचे आम्ही पहिले. उजव्या हाताला २ मोठ मोठ्या दातांच्या मत्स्यांची सुवर्णाची शिरे होती.
  • शिवछत्रपतींच्या सिंहासनाचे पुढे काय झाले ? ( सदर माहिती इतिहास अभ्यासक सत्येन वेलणकर यांच्या लेखातील आहे. )
रायगडाच्या पाडावानंतर सिंहासनाचे काय झाले ? याबद्दल कोणत्याही समकालीन मराठी अथवा मुघल साधनात माहिती मिळत नाही. शां. वि. आवळस्कर यांनी आपल्या 'रायगडची जीवनकथा' या पुस्तकात या संबंधी पुढील माहिती दिली आहे :-" इतिकादखानाने सिंहासन फोडले. हस्तगत झालेली दौलत व दौलतीतील कैद केलेली माणसे यांस त्याने कोरेगाव येथे बादशहापुढे रुजू केले.
या विधानाला शां. वि. आवळस्कर यांनी मराठी रियासत मधल्या 'स्थिरबुद्धी राजाराम' या प्रकरणाचा संदर्भ दिला आहे.
रियासतकार लिहितात :-
"शिवाजीचे सिंहासन फोडले आणि हस्तगत झालेली संपत्ती व कैदी मंडळींचा भला मोठा परिवार त्याने बरोबर नेऊन कोरेगाव येथे बादशहापुढे रुजू केले."
दुर्दैवाने या आपल्या विधानाला रियासतकार कोणताही संदर्भ देत नाहीत, त्यामुळे त्यांनी हे विधान कोणत्या दस्तऐवजाच्या आधाराने केले हे कळायला मार्ग नाही !
या लेखासंबंधी काही पुस्तकं चाळताना मला याविषयी एक अतिशय विलक्षण नोंद सापडली. ती भीमसेन सक्सेना याच्या 'तारीख ए दिलकुशा' या पुस्तकातली आहे. हा भीमसेन सक्सेना औरंगजेबाच्या सैन्यात सेवेला होता आणि तो या घटना घडल्या त्याच काळातला आहे, त्यामुळे समकालीन वृत्तांत म्हणून त्याच्या लिखाणाला महत्व आहे. त्याने केलेली नोंद पुढीलप्रमाणे:-
"Itiqad khan captured the fort of Rairi, seized shahu, the son of sambha and the wives of sambha and rama, and was glorified with the title of Zulfiqar khan bahadur and the gift of the mahi maratib (fish emblem) which he had taken away from Sambha. "
याचा मराठी तर्जुमा पुढीलप्रमाणे :-
इतिकादखान याने रायरीचा किल्ला जिंकला , संभा(जी) चा मुलगा शाहू , संभा(जी) च्या व रामा (राजाराम महाराज ) च्या बायकांना कैद केले . याबद्दल झुल्फिकार खान बहादुर अशी पदवी देऊन त्याचा सन्मान करण्यात आला आणि त्याने संभा(जी) कडून हिसकावून आणलेले 'माही मरातीब (मत्स्य चिन्ह)' त्याला भेट म्हणून देण्यात आले.
या ठिकाणी मी वाचकांचे लक्ष वर उद्धृत केलेल्या हेन्री ऑक्सिन्डन याच्या डायरीकडे वेधू इच्छितो. हेन्री ऑक्सिन्डनने नमूद केल्याप्रमाणे त्याने राज्याभिषेकाच्या वेळी सिंहासनाजवळ जी राज्यचिन्हे पाहिली, त्यामध्ये भाल्यावर लावलेली दोन मत्स्य चिन्हे होती.
भीमसेन सक्सेना म्हणतो त्याप्रमाणे, संभाजी महाराजांकडून (म्हणजे अर्थात रायगडावरून ) झुल्फीकारखानने हिसकावून आणलेली 'माही मरातीब (मत्स्य चिन्ह)' ही तीच ( म्हणजे हेन्री ऑक्सिन्डनने शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी पाहिलेली ) असतील का?
मी हा निर्णय वाचकांवर सोपवतो !
इतिहास अभ्यासक सत्येन वेलणकर यांनी केलेली सिंहासनाविषयीची चीकित्सा योग्य वाटते . सभासद बखरीतील नोंदीनुसार “ कलियुगाचे ठायी पुण्यश्लोक राजे सिंहासनी बसले. या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ ( मुस्लीम ) बादशाह . हा मऱ्हाठा पातशहा येवढा छत्रपती जाला. हि गोष्ट काही सामान्य जाहली नाही .
सभासद बखरीतील नोंदीनुसार “ हि वर्तमाने बहादूरखान कोका यांसी कळली त्याने पुढे पेडगाव भीमातीरी येथे घेऊन छावण्या केल्या. आणि दिल्लीस पातशाहास हे वर्तमान , सिंहासनाचे लिहिले. पातशाहास कळून तक्तावरून उतरून अंत:पुरात गेले. आणि दोन्ही हात भुईस घासून , आपले देवाचे नाव घेऊन परम खेद केला. दोन दिवस अन्न उदक घेतले नाही. आणि बोलिले कि “ खुदाने मुसलमानी पादशाही दूर करून , तक्त बुडवून मराठीयांस तक्त दिले आता हद्द झाली !” असो बहुत खेद दुखा:चे पर्वत मानिले. मग मोठे मोठे वजीरानी नानाप्रकारे समाधान करून आणा खुणा घालून तक्तावर बसविले. ऐसेच विजापूरचे पातशहा व भागानगरचे पातशहा वरकड सर्वांस वर्तमाने कळून खेद जाहाला.रूमशाम , इराण, दुराण व दर्यातील पातशाहास ( जंजीऱ्याचा सिद्धी ) खबर कळून मनात खेद करू लागले. खेद करून आशंका मानिली. ये जातीचे वर्तमान जाहाले.
सभासद बखरीतील नोंद स्पष्ट करते शिवाजी महाराज छत्रपती झाल्याने व सिंहासनारूढ झाल्याने औरंगजेबास दुखः झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती करत तत्कालीन सर्व मुस्लीम पातशहा व बादशाहाना शह देत प्रतीआव्हान निर्माण केले. त्यामुळे रायगडाचा पाडाव केल्यानंतर औरंगजेबाच्या आज्ञानुसार मुगलानी छत्रपतींचे सिंहासन तोडून नष्ट केले.
लेखन आणि संकलन :- नागेश मनोहर सावंत देसाई
संदर्भ :- पेशवे दफ्तर खंड ४२ राजा प्रतापसिंहाची रोजनिशी व इतर कागद
शिवकालीन पत्रसार संग्रह खंड २.
सभासद बखर
शिवछत्रपतींच्या सिंहासनाचे पुढे काय झाले ? इतिहास अभ्यासक सत्येन वेलणकर यांचा लेख

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...