विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 27 May 2023

मराठाशाहीतील पराक्रमी मराठा घराणे 'नागपूरकर भोसले' भाग ३




मराठाशाहीतील पराक्रमी मराठा घराणे
'नागपूरकर भोसले'
भाग ३
ओरिसा आणि मांडलिक संस्थाने- हा प्रांत सध्याचे बालासोर, कटक आणि जगन्नाथपुरी हे तीन जिल्हे मिळून होता. जगन्नाथाचे देऊळ या प्रांतात असल्यामुळे या भागाला विशेष महत्त्व होते. त्याकाळी ओरिसातील महानदीच्या काठाकाठाने कटकवरून रायपूर, रतनपूरास येऊन तेथून पश्चिमेस नागपुराला येण्याचा रस्ता होता. कटक प्रांत १८०३ पर्यंत भोसल्यांच्या ताब्यात होता. त्यानंतर वऱ्हाडबरोबर हा प्रांत सुध्दा निजामाकडे व त्यानंतर इंग्रजांकडे आला.
चंद्रपूर- पूर्वी हा सुभा गोंडांच्या ताब्यात होता. पहिल्या रघुजीने तो मिळवला. या सुभ्यात चांदा जिल्हा, औंढी, अंबागड चौकी या जमिनदाऱ्या व माणिकदुर्गचा किल्ला येत असे. नागपूरच्या खालोखाल या प्रांताला किंमत होती. तेथे बरेच उद्योगधंदे आणि व्यापार चालत असत. त्याकाळी दक्षिणेकडून येणारा नारळ, सुपारी, मीठ इत्यादी माल प्रथम येथे येत असे. मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे वऱ्हाडातून कापूसही येत असे. चांदा येथे विणकर लोकांची मोठी वस्ती होती. येथील कापड देश-विदेशात पोहोचत असे.
छत्तीसगड सुभा- यामध्ये छत्तीस लहान-मोठे किल्ले व गढया येत होत्या. त्यात फक्त रायपूर आणि रतनपूर ही मोठी शहरे आणि भोवतालचा मुलूख हा खूप महत्वाचा आणि उत्पन्नाचा भाग होता. बाकीचा मुलूख जंगली व नापिकीचा असल्यामुळे त्यातून फारसे उत्पन्न येत नसे. राज्याच्या वाटणीत हा सुभा बिंबाजीला मिळाला होता. ते स्वतः रतनपूरला रहात असत. पण ते सगळ्यात नाराज होते. कारण हा भाग नुसता तांदूळ पिकवणारा असून दुसरे काही उत्पन्न नव्हते. १७९० मध्ये सिरगुजा हे डोंगरी संस्थान भोसल्यांच्या लष्कराने घेतले होते. यामध्ये सिरगुजा, जसपूर व उदेपूर यांचा समावेश होता. येथून भोसल्यांना तीन हजार रुपये खंडणी मिळत होती. काशी, गया, मिर्झापूर व बंगाल प्रांतातून नागपुरास येण्याचा रस्ता तेथून असल्यामुळे तो सांभाळून त्याची आवकजावक करण्याची जबाबदारी सिरगुजाच्या मांडलिकावर होती. कोरिया हे लहानसे संस्थानही छत्तीसगड सुभ्यात होते.
संबलपूर- हे संस्थान भोसल्यांचे मांडलिक म्हणून होते. आजूबाजूला दहा ते पंधरा लहान संस्थाने होती. याशिवाय बस्तर हे मोठे संस्थान व कांकर व कालाहंडी ही लहान संस्थानेही या सुभ्यात मोडत असत. १८०३ च्या देवगावच्या तहाने भोसल्यांना या सर्व संस्थानांवर पाणी सोडावे लागले.
रघूजीराजे भोसले प्रथम- नागपूर साम्राज्याचे मराठा शासक
📷
(चित्रस्रोत: विकिपीडिया)
विदर्भाचे आद्य इतिहासकार कै.यादव माधव काळे म्हणतात-
मराठी साम्राज्यात अगर हिंदुस्थानातील दुसऱ्या कोणत्याही संस्थानिकांच्या ताब्यात यावेळेस एवढ्या मोठ्या विस्ताराचा प्रदेश नव्हता. "रघुजी भोसल्यांच्या अंगी पहिला रघुजी अगर महादजी शिंद्यांप्रमाणे धडाडी, पराक्रम, बुद्धिबळ व संघटन चातुर्य असते तर तो संपूर्ण हिंदुस्थानातील अत्यंत प्रबळ असा संस्थानिक झाला असता व हिंदुस्थानच्या राजकारणात त्याचा शब्द निर्णायक ठरला असता!"
सामान्यपणे मध्य भारतातील तत्कालीन विदर्भ, नागपूर, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यांसह मध्यप्रदेशातील जबलपूर, शिवनी, गढा-मंडला, छपरा, रेवा, सिरगुजा, होशंगाबाद, बैतुल हा प्रमुख भूभाग, छत्तीसगडमधील रायपूर, रतनपूर व ओरिसा-कटक हे प्रांत नागपूरकर भोसल्यांच्या नियंत्रणाखाली होते. जो रेसिडेंटच्या माध्यमातून हळूहळू ब्रिटिशांच्या वर्चस्वाखाली जाऊन पुढे ब्रिटिश साम्राज्याचा भाग बनला.
संदर्भ/माहितीस्रोत:
नागपूर राज्याचा अर्वाचीन इतिहास-डॉ. श.गो.कोलारकर, गो.मा.पुरंदरे, विकासपीडिया, विकिपीडिया

 

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...