विनोद जाधव एक संग्राहक

Monday 31 July 2023

बडोद्यातील शिवाजी महाराजांचा पुतळा

 



बडोद्यातील शिवाजी महाराजांचा पुतळा
- सुरक्षा घोंगडे, वारणानगर
(७५०७३९९०७२)
आदर्शवत समाज निर्माण व्हावा यासाठी योग्य प्रेरणा व मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते. एखाद्या महान व्यक्तीचे स्मारक अथवा पुतळा समाजाचे प्रेरणास्थान असू शकते. महान व्यक्तीच्या जीवन चरित्रातून मिळणारा आदर्श, शिकवण व प्रेरणा ही सतत प्रवाहित रहावी या उद्देशाने पुतळ्यांची निर्मिती केली जाते. महापुरुष हा कोणत्याच जातीचा, धर्माचा, पंथाचा नसतो तर तो जात, धर्म, पंथ, वंश या सर्वांच्या पलीकडे जाऊन ‘मानवता’ हा एकच ‘धर्म’ मानून आपले कार्य उत्तम रीतीने पुढे नेत असतो, त्याचबरोबर आपले सर्वसमावेशक विचार समाजामध्ये ‘रुजवत’ असतो म्हणून तो महापुरुष होतो हे आपण जाणतोच.
आपल्या पूर्वजांचा दैदिप्यमान इतिहास पुढील पिढीला ज्ञात व्हावा, त्यांची ध्येयधोरणे, सर्वसमावेशकता, धर्मनिरपेक्षता ही सर्व मुल्ये आणि त्यांचा आदर्श पुढच्या पिढीत रुजवण्याच्या उद्देशाने महापुरुषांच्या पुतळ्यांचे अनावरण करण्यात येते. हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे शिवाजी महाराज त्यांच्या कार्य आणि कर्तृत्वामुळे आजही जनमानसांत जिवंत आहेत. त्यामुळेच महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर त्यांचे अनेक पुतळे आपल्या दृष्टीस पडतात. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी ८ मार्च १९३४ रोजी बडोद्यात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. या निमित्ताने या पुतळ्यामागील इतिहास व सयाजीरावांची भूमिका जाणून घेणे हे सयाजीरावांमधील संवेदनशील माणूस आणि चिकित्सक विचारक समजून घेण्याची सुसंधी ठरेल.
सयाजीराव व्यक्तीपुजक नव्हते. तर महापुरुषांच्या कालबाह्य विचारांशी फारकत घेवून त्यांच्या कालसुसंगत विचारांचे पाईक होते. महत्वाचे म्हणजे महापुरुष जेथे येवून थांबले होते तेथून पुढे त्या महापुरुषांच्या विचाराला विकसित करण्याची दृष्टी बाळगणारेही होते. जगातील सर्वसमावेशक आणि समतावादी व्यक्ती, विचार, धोरण यांचा ‘कालसुसंगत’ समन्वय साधणारे महान ‘तत्वचिंतक प्रशासक’ होते. महाराजांनी त्यांच्या ५८ वर्षाच्या कारकिर्दीत दोनच महापुरुषांचे पुतळे बडोद्यात बसवले. त्यापैकी पहिले गौतम बुद्ध, ज्यांचा पुतळा १९१० मध्ये महाराजांनी ज्युबिली बागेत बौद्ध वचनांसह बसवला. त्यानंतर १९३४ चा शिवाजी महाराजांचा पुतळा हा दुसरा अपवाद आहे.
या दोन महापुरुषांच्या कालातीत विचारधारांचा संस्कार आपल्या प्रजेवर व्हावा हाच उदात्त हेतू या पुतळ्यामागे होता. मूर्तीपूजा आणि कर्मकांडे यापासून सतत अलिप्त असणारे महाराज आपल्या अभ्यासाच्या टेबलवर बुद्धाचा पुतळा जेव्हा ठेवतात तेव्हा बुद्धाच्या वैज्ञानिक विचारधारेप्रतीचा तो आदर असतो. भारतातील तत्कालीन आणि त्यानंतरच्या कर्तबगार राज्यकर्त्यांशी आपण जेव्हा सयाजीरावांची तुलना करतो तेव्हा बुद्ध आणि शिवाजी महाराज या दोघांच्याही विचाराला कृतीशील करण्याची क्षमता बाळगणारे म्हणून सयाजीराव जेवढे परिपूर्ण ठरतात तेवढा इतर कोणताही राज्यकर्ता अगर नेता परिपूर्ण ठरत नाही. यातच महापुरुषांच्या बौद्धिक स्वीकाराची सयाजीरावांची क्षमता आपल्या लक्षात येते.
सयाजीरावांनी ८ मार्च १९३४ ला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बडोद्याच्या मध्यभागी सार्वजनिक बागेत बसविला. बडोद्यातील या भव्य पुतळ्याचा इतिहास रंजक आहे. स्मारक प्रभारी समितीच्या मागणीनुसार पुणे येथील शिवाजी मेमोरियल पार्कमध्ये बसवण्यासाठी मुंबईचे शिल्पकार म्हात्रे यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा तयार केला. परंतु पुतळा तयार झाल्यानंतर मात्र पुतळ्यासंदर्भात शिल्पकार आणि पुण्यातील स्मारक प्रभारी समिती यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यातून या समितीने म्हात्रे यांनी बनविलेला शिवाजी महाराजांचा हा पुतळा नाकारून अन्य शिल्पकाराला शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तयार करण्याची जबाबदारी दिली.
समितीने नाकारलेल्या म्हात्रेंच्या अश्वारूढ पुतळ्याला अचानकपणे नवा खरेदीदार मिळणे केवळ अशक्य होते. म्हात्रे यांनी हा पुतळा तयार करण्यासाठी दोन वर्षे मेहनतीबरोबरच बराच खर्च केला होता. परंतु ऐनवेळी पुण्याच्या स्मारक समितीने आपली भूमिका बदलल्यामुळे म्हात्रेंना आर्थिक नुकसान सहन करावे लागणार होते. भारतातील आद्य शिल्पकारांपैकी एक असणाऱ्या म्हात्रेंच्या या कठीण स्थितीची माहिती मिळताच पुण्याच्या समितीने ठरवलेल्या रकमेइतकीच रक्कम देवून हा पुतळा खरेदी करण्याची तयारी सयाजीराव महाराजांनी दर्शवली. महाराजांच्या या निर्णयाला दोन बाजू आहेत. पहिली बाजू म्हणजे कलाकारांना संकटकाळी मदत करणे आणि दुसरी बाजू म्हणजे महापुरुषांचा वैचारिक वारसा चिरंतन जपण्याचा प्रयत्न करणे.
बडोदा येथे शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा अनावरण समारंभात केलेल्या भाषणात महापुरुषांचा ‘भक्तीमुक्त’ विचार कसा करावा याचे उदाहरण महाराजांनी घालून दिले आहे. या भाषणात सयाजीराव म्हणतात, “वादविवादाच्या दंगलीच्या धुरळयातही उग्रस्वरूप शिवरायाची मूर्ती उभी असलेली स्पष्ट दिसत आहे. आज आम्ही त्यांचा निःशंकपणे सन्मान करतो. तो करताना त्यांना प्रत्यक्ष देव-शंकराचा प्रति अवतार समजण्याच्या अंधभक्तीने आम्ही विवेकशून्य झालो नाहीत किंवा त्यांना ‘डोंगरातला उंदीर’, ‘राजद्रोही’ असे म्हणणाऱ्या दूषित पूर्वग्रहानेही आम्ही अंध नाहीत.” सयाजीराव महापुरुषांचे दैवतीकरण न करता त्यांचे खरे अनुयायी होणे पसंत करतात. आजच्या भारतातील महापुरुष भक्तीच्या ‘महासागरात’ सयाजीरावांचे विचार ‘दीपस्तंभा’ची भूमिका बजावतील. याचे अनुकरण करण्यासाठीच ‘सयाजी विचाराचा जागर’ ही आपली मुलभूत गरज झाली आहे.
पुढे याच भाषणात शिवचरित्र आपल्याला काय शिकवते हे सांगताना सयाजीराव म्हणतात, “जन्माच्या किंवा दर्जाच्या दृष्टीने शिवाजी महाराजांना मोठीशी अनुकूलता नव्हती. एका सामान्य मराठ्याने एका संबंध राष्ट्राचा भाग्यविधाता व्हावे व तिला प्रबळ सत्ताधीशांचा विरोध असताना आपल्या विस्कळीत व दुर्बळ लोकांना सुसंघटित राष्ट्राच्या पदवीला पोचवावे, ही कामगिरी काय सामान्य आहे? केवळ पोटार्थी वाटणारे लोक चाकरीस ठेवावे व त्या सर्वांना देशभक्तीने प्रेरित करून सोडावे, हीच शिवचरित्राची शिकवण आपल्याला अखंड स्फूर्तिदायक ठरणारी आहे.” शिवाजी महाराजांचा विचार सरंजामी आणि मराठा श्रेष्ठत्वाच्या भावनेतून करण्याचा प्रयत्न ‘पुरोगामी’ इतिहास संशोधकांकडून झाला. अठरापगड जातींचे नेतृत्व शिवाजी महाराजांनी केले असे भाषणात सांगायचे आणि उरात मात्र ‘मराठ्यांचा राजा’ हा अभिमान बाळगायचा हे धोरण शिवाजी महाराजांच्या प्रतिगामी मांडणीला उत्तर म्हणून राबविल्याचा परिणाम असा झाला की, शिवाजी महाराजांचे रुपांतर आपण एका ‘देवा’त केले आणि त्यांचे क्रांतिकारक धोरण भाषणात बंदिस्त करून कृतिशीलतेला तिलांजली दिली. परिणामी शिवाजी महाराजांच्या धोरणातील समाजाभिमुखता जनमानसांत रुजवण्यामध्ये आपण अपयशी ठरलो. म्हणूनच महाराजांची ही मांडणी आजही तितकीच ‘समकालीन’ वाटते.
शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारणीच्या कार्यात सर्व जातीधर्मियांना सामावून घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. शिवाजी महाराजांचे सैन्य कुणबी, सुतार, वाणी व हीन जातीयांनी बनले होते. विविध जातींच्या लोकांचा समावेश करून शिवाजी महाराजांनी प्रशासकीय पातळीवर जातीय समानतेचा अनोखा आदर्श प्रस्थापित केला. हाच आदर्श घेऊन सयाजीरावांनी ५८ वर्षे आपला राज्यकारभार सुरळीतपणे चालविला. सयाजीरावांच्या कोणत्याही धोरणाचा विचार केला तर त्या धोरणामध्ये शिवाजी महाराजांच्या सुराज्याचे प्रतिबिंब सापडते हा योगायोग नाही. या दृष्टीने संशोधन झाले तर सयाजीरावांमधील समाजक्रांतिकारक अधिक ठोसपणे पुढे येईल. म्हणूनच चक्रवर्ती राजगोपालचारी म्हणतात, “हिंदुस्थानात आतापर्यंत दोनच खरे राजे झाले आहेत, ते आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि सयाजीराव महाराज.”
हबशी गुलामांद्वारे भारतात आलेल्या गनिमी काव्याच्या परंपरेचा विकास हबशी गुलाम असणाऱ्या मलिक अंबरने केला. हा गनिमी कावा त्याच्याकडून शहाजीराजांमार्फत शिवाजी महाराजांकडे आला आणि शिवाजी महाराजांनी तो क्रांतिकारक पद्धतीने वापरला. या मलिक अंबरचे पहिले चरित्र मराठी भाषेत १९४१ साली बडोद्यातील सयाजी ग्रंथमालेत प्रकाशित झाले. शिवाजी महाराजांचा गनिमी कावा कालानुरूप यशस्वीपणे वापरण्याचे श्रेय केवळ सयाजीरावांना जाते. कारण ५८ वर्षे ब्रिटीश गुप्तहेर पाठीवर घेवून भारताच्या स्वातंत्र्यचळवळीला भक्कम मदत करणाऱ्या सयाजीरावांना ‘राजद्रोही’ ठरवणे ब्रिटीश सरकारला शेवटपर्यंत शक्य झाले नाही. बाबा भांड यांचे ‘स्वातंत्र्यलढ्याचे पाठीराखे महाराजा सयाजीराव’ या पुस्तकात हा इतिहास अंशतः पुढे आला आहे. लंडनच्या इंडिया हाऊसमधील सयाजीरावांसंदर्भांतील गुप्त फायली जेव्हा प्रकाशात येतील तेव्हा या गनिमी काव्याचे क्रांतीकारकत्व जगाला कळेल. ज्या लॉर्ड कर्झनशी सयाजीरावांचा सर्वाधिक संघर्ष झाला होता तो लॉर्ड कर्झन शाहू महाराजांना म्हणाला होता, ‘सयाजीराव हे एक वाफेचे इंजिन आहे... सयाजीरावांचा आदर्श इतर संस्थानिकांनी घ्यावा.’
शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावेळी प्रशासकीय सोयीसाठी ‘राज्यव्यवहारकोश’ तयार करुन घेतला होता. शिवाजी महाराजांच्या पुढे एक पाऊल टाकत सयाजीरावांनी इंग्रजी, मराठी, गुजराती, संस्कृत, उर्दू, पारशी, हिंदी आणि बंगाली या ८ भाषांतील ‘श्रीसयाजीशासनशब्दकल्पतरू’ हा राज्यव्यवहार कोश तयार करून घेतला. १९३३ मध्ये पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात ७२ संस्थांतर्फे सयाजीराव महाराजांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगीच्या भाषणात सयाजीरावांच्या राज्यव्यवहार कोशाबद्दल बोलताना न.चिं. केळकर म्हणतात, “नुकताच अनेक प्रांतीय भाषांचा उपयोग करून, थोरल्या शिवछत्रपतींचे अनुकरण करून सयाजीराव महाराजांनी एक प्रकारचा नवा राज्यव्यवहार कोशच निर्माण केला आहे. त्यावरून त्यांचे भाषांविषयीचे निःपक्षपातीत्व दिसून येते.” केळकरांचे सयाजीरावांच्या राज्यव्यवहार कोशाबद्दलचे भाष्य महत्वाचे आहे. कारण शिवाजी महाराजांनंतर असे काम करणारे सयाजीराव हे एकमेव प्रशासक आहेत.
सयाजीराव हे शिवाजी महाराजांचे कृतीशील वारसदार होते याचा पुरावा म्हणजे सयाजीरावांनी शिवाजी महाराजांसंदर्भातील साहित्य प्रकाशित करण्यासाठी केलेली मदत होय. फक्त शिवाजी महाराजांसंदर्भातील साहित्यच नव्हे तर मराठ्यांचा संपूर्ण इतिहासच सयाजीरावांच्या पाठबळामुळेच प्रकाशित होऊ शकला. शिवाजी महाराजांचे मराठीतील पहिले आणि अधिकृत चरित्र केळुसकर गुरुजींनी लिहिले. या चरित्राच्या २०० प्रती सयाजीरावांनी विकत घेऊन केळुसकरांना सहाय्य केले. प्रा. ताकाखान यांनी १९२१ मध्ये या चरित्राचा इंग्रजीत अनुवाद केला. या अनुवादाच्या छपाईसाठी निधी संकलनामध्ये बडोद्याच्या खासेराव जाधव यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. हा इतिहास देखील आजपर्यंत अज्ञात राहिला. १९१९ मध्ये सीताराम पेंडसे यांचा ‘शिवाजी महाराज’ हा ग्रंथ सयाजीरावांच्या आश्रयाने प्रकाशित झाला. १९२० साली रावलीन्सनकृत ‘Shivaji the Maratha’ या इंग्रजी ग्रंथाचे मुकुंदराव मेहता यांनी गुजराती भाषेत भाषांतर केले. बडोदा लष्करातील जनरल नानासाहेब शिंदे यांनी लिहिलेला ‘मराठ्यांच्या प्रसिद्ध लढाया’ हा ग्रंथ १९२२ मध्ये सयाजी साहित्य मालेत प्रकाशित करण्यात आला.
आजही मराठ्यांच्या इतिहासाबाबत सरदेसाईंच्या रियासती टाळून पुढे जाता येत नाही. या रियासती सयाजीरावांमुळे तयार झाल्या. रियासतकार सरदेसाई हे ३७ वर्षे सयाजीरावांकडे नोकरीस होते. ‘सरदेसाई ते रियासतकार’ या त्यांच्या वाटचालीत सयाजीराव महाराजांची भूमिका स्पष्ट करताना रियासतकार सरदेसाई लिहितात, “आज मी रियासतकार म्हणून मिरवतो त्याचे श्रेय मुख्यतः सयाजीराव महाराजांचे आहे.” रियासतकार सरदेसाईकृत ‘मराठा रियासत मध्य विभाग भाग पहिला (इ.स. १७०७ – १७४०)’ या मराठी ग्रंथाचा गुजराती अनुवाद भरतराम मेहता यांनी १९२८ मध्ये केला. १९३३ मध्ये विनायक सदाशिव यांचा ‘तंजावरचे मराठी राज्य’ हा ग्रंथ प्रकाशित झाला. ‘शिवकालीन पत्रसंग्रह भाग १ व २’(१९२९), ‘शिवाजी निबंधावली भाग १ व २’ (१९२९), ‘इंग्लिश रेकॉर्डस ऑन शिवाजी’ (१९३१), ‘बाल शिवाजी’ (१९४२) इ. अनेक शिवाजी महाराज व मराठ्यांच्या इतिहासासंदर्भातील पुस्तके बडोद्यातून प्रकाशित झाली.
​ सयाजीरावांनी मराठ्यांच्या इतिहासविषयक पुस्तकांच्या प्रकाशनाबरोबरच शिवाजी महाराजांसंदर्भातील वेगवेगळ्या कार्यांसाठीही मदत केली. १८९५ मध्ये रायगडावरील शिवसमाधी जीर्णोद्धारासाठी सर्वाधिक १००० रु. चा निधी सयाजीरावांनी दिला. १९२७ साली रायगड किल्यावरील धर्मशाळेसाठी ५००० रु. ची देणगी दिली. १९०४ मध्ये पुण्यातील शिवजयंती महोत्सवासाठी सयाजीरावांनी १००० रु.ची मदत केली. १९३० मध्ये सर एफ. ई. वाच्छा यांना श्री. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकरिता ३०,००० रुपये सयाजीरावांनी दिले.
कोल्हापुरात इतिहास संशोधनाचा पाया घालणारे मराठ्यांचे इतिहासकार आणि शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. अपासाहेब पवार यांना मराठ्यांच्या इतिहासावर लंडन येथे संशोधन करण्यासाठी सयाजीरावांनी १९३२ साली २००० रुपये शिष्यवृत्ती दिली. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम ३८ लाख ९६ हजार रु. हून अधिक भरते. ही शिष्यवृत्तीसुद्धा महाराष्ट्रासाठी फलदायी ठरली. कारण पुढे अप्पासाहेब पवारांनी करवीरच्या महाराणी ताराबाई यांच्या कारकीर्दीतील कागदपत्रांचे तीन खंड १९६९ ते १९७२ मध्ये संपादित करून शिवाजी विद्यापीठातर्फे प्रकाशित केले. अप्पासाहेब पवारांमुळे कोल्हापूर हे इतिहास संशोधनाचे एक महत्वाचे केंद्र म्हणून विकसित झाले आहे. याबाबत आपण सदैव कृतज्ञ राहिले पाहिजे. शिवाजी महाराजांसंबंधी कार्यासाठी सयाजीरावांनी दिलेली ही आर्थिक मदत एकूण ३९,००० रु. इतकी होती. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम सुमारे ९ कोटी ६९ लाख रु. हून अधिक भरते. एकूणच शिवाजी महाराजांचा विचार आणि आदर्श पुढे नेण्यासाठी सयाजीरावांमधील आंतरिक तळमळ आणि आदरभाव यातून स्पष्टपणे अधोरेखित होतो.
१४ एप्रिल १९३३ रोजी सातारा म्युनिसिपालिटीच्या मानपत्रास उत्तर देताना सयाजीरावांनी केलेले भाषण महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात अब्राहम लिंकनच्या पत्रासारखे लावायला हवे असे आहे. या भाषणात सयाजीराव म्हणतात, “सातारचा व आमचा संबंध नवा नाही, तो जुनाच आहे. राजकीय संबंधाप्रमाणेच आमचे शारिरीक संबंध झाले आहेत, असे इतिहासावरून तुम्हांस आढळुन येईल. या इतिहासाचा पोकळ अभिमान धरण्यात हशील नाही. त्याचे निःपक्षपातीबुद्धीने निरीक्षण करून त्यापासून जरूर तो बोध आपण घेतला पाहिजे. शिवाजीमहाराजांचा सन १६६० ते ६५ च्या सुमारास राज्याभिषेक सोहळा झाला. तारखेत कदाचित चूक असेल, कारण मी अंदाजाने बोलत आहे, व सन १८१८ त पेशवाईबरोबर मराठ्यांचे राज्य बुडाले, म्हणजे मराठी राष्ट्र अवघे १५०-२०० वर्षच टिकले. हा काळ इतिहासांत किती अल्प आहे? मनुष्याप्रमाणे राष्ट्रालाही कार्य करण्यांस इतिहासात ‘काल आणि स्थल’ (Time and Space) यांची जरूरी असते. या दोन्ही गोष्टी दुर्दैवेकरून मराठी राज्यास मिळाल्या नाहीत. ज्या राष्ट्राला आपले सामर्थ्य व सत्ता १५०-२०० वर्षेही नीट टिकविता आली नाही, त्यास जगाच्या इतिहासांत राष्ट्र म्हणून कोणते स्थान मिळेल? मराठी सत्तेचे स्मारक म्हणून आज एकतरी चांगली इमारत किंवा राज्यपद्धतीचे एखादे वैशिष्ट्य आपणांस दाखविता येण्यासारखे आहे काय? तेव्हा असल्या अल्पजीवी राष्ट्राबद्दल पोकळ अभिमान धरण्यापेक्षा ते इतक्या लवकर व थोड्या काळांत का नाहीसे झाले याचा तुम्हांस उपयोग होईल.”
शिवाजी महाराजांचे साम्राज्य अल्पजीवी का ठरले या प्रश्नाची ८८ वर्षापूर्वी सयाजीरावांनी केलेली चर्चा मराठ्यांच्या एकाही इतिहासकाराने आजवर केलेली नाही. सयाजीरावांच्या या चिंतनात राज्य कसे करायचे आणि राज्य कसे करायचे नाही या दोन्हीही प्रश्नांची उत्तरे लपलेली आहेत. शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील सुराज्य सयाजीरावांनी बडोद्यात प्रस्थापित केले. त्यामुळे सयाजीराव हे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य धोरणाचे खऱ्या अर्थाने पहिले निर्माते होते. त्यामुळेच पंडित मदन मोहन मालवीय यांचे ‘महाराजा सयाजीराव हे हिंदुस्थानातील शिवाजीनंतरचे शेवटचे आदर्श राजे होते.’ हे विधान सयाजीरावांचे सर्वात योग्य मूल्यमापन ठरते.
अलीकडे महापुरुषांचे दैवतीकरण हा एक मोठा उद्योगच झाला आहे. यातून समाजाचे कधीही न भरून येणारे नुकसान होत आहे. कारण महापुरुषांच्या दैवतीकरणातून जात, धर्म, प्रदेश, भाषा असे अनेक संघर्ष टोकदार होवून समाजातील द्वेषाची मात्रा कमालीची वाढली आहे. ज्या महापुरुषांनी आयुष्यभर व्यापक भूमिकेतून ‘समाजसंवाद’ निर्माण केला त्यांचे नाव घेत ‘विसंवादा’कडे होणारा आपला प्रवास हा कोरोनाच्या प्रादुर्भावापेक्षाही महाभयंकर आहे. म्हणूनच ‘सयाजीचिंतन’ आवश्यक आहे.
३१ ऑक्टोबर २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेलांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण केले. महाराष्ट्रात शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे प्रस्तावित आहेत. महापुरुषांचे असे पुतळे उत्सव आणि अभिमानापुरते मर्यादित राहू नयेत याची काळजी आपण घेतली पाहिजे.
महाराष्ट्रातील आजचे सर्वात मोठे आणि राष्ट्रीय मान्यता असणारे महत्वाचे नेते शरद पवार यांचे ‘सयाजीचिंतन’ नव्या राजकारण्यांनी स्विकारण्यासारखे आहे. शरद पवार म्हणतात, “या देशात अनेक राजे निर्माण झाले, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला राज्यकारभार चालविताना सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवला म्हणून ते अजरामर झाले. त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांचा वारसा श्रीमंत सयाजीराव महाराजांनी चालविला.” शरद पवारांकडे सयाजीरावांचा हा वारसा त्यांचे गुरु यशवंतराव चव्हाण यांच्यामार्फत आला होता हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवे.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...