विनोद जाधव एक संग्राहक

Monday 30 October 2023

दक्षिणेतील तंजावर च्या भोसले राजघराण्याचा दैदिप्यमान इतिहास-

 






























दक्षिणेतील तंजावर च्या भोसले राजघराण्याचा दैदिप्यमान इतिहास-
लेखक ::जयदीप भोसले
सन १६२४ ला भातवडीच्या लढाई मध्ये निझामशहा चे वजीर शहाजीराजे भोसले यानी अवघ्या वीस हजार फोजे ने शहाजहान बादशहा आणि आदिलशहा च्या दोन लाख फौजेचा पराभव केला. शहाजीराजे भोसले यांचे किर्ती अवघ्या भारतात दुमदुमली. पण १६२६ ला निझामशहा आणि त्यांच्या कुटुंबीयांना फतेह खान याने कपटाने मारले त्या नंतर शहाजीराजे भोसले यांनी फतेह खान चा बंदोबस्त करून निझामशहा चा वारसदार म्हणून मुर्तजा याला बादशहा नेमुन राज्यकारभार हातात घेतला. पण पुढे तीन वर्षांत शहाजहान ने ४८००० फौजेकडून अहमदनगर वर हल्ला करून मुर्तजा ला आणि त्याची आई ला कैद केले. त्यामुळे शहाजीराजे यांनी शहाजहान शी तह करून मुर्तजा च्या सुरक्षेसाठी हमी घेतली आणि तहा प्रमाणे शहाजीराजे आदिलशाहीत सरदार झाले. त्याना पुणे सुपे चाकण इंदापूर प्रांताची जहागिरी देण्यात आली. त्या जहगिरीचे शहाजीराजे याचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य घडवले. १६३८ ला आदिलशहा सरदार रणदुल्ला खान आणि शहाजीराजे यांनी बेंगळुरू च्या नायक चा बंदोबस्त करून बेंगरूळ ताब्यात घेतले. आदिलशहा ने शहाजीराजे यांचा फर्जंद किताब देऊन त्यांना बेंगरूळ ची जहागीर देण्यात आली. त्यानी आणि शहाजीराजे यांचे थोरले सुपुत्र संभाजी राजे यांनी नंतर दक्षिणेतील नायकांचा बंदोबस्त करून बेंगरूळ ची जहागीर वाढवली.
इ स१६७४ नंतर शहाजीराजे यांच्या दुसऱ्या पत्नी तुकाबाई ( मोहिते घराण्यातील) यांचे चिरंजीव व्यंकोजी राजे यांना बेंगरूळ ची जहागीर देण्यात आली. १६७५ ला व्यंकोजी राजे यांनी अलगिरी च्या नायकावर हल्ला करून तंजावर ताब्यात घेऊन राज्याची राजधानी बेंगळुरू हुन तंजावर ला हलवली.
इ.स १६८४ ला व्यंकोजी राजे यांच्या नंतर त्यांचे पुत्र शहाजीराजे हे तंजावरच्या गादी वर बसले स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे याना शहाजीराजे यांनी वेळोवेळी मदत केली. संभाजी महाराज यांनी जिंजी चा किल्ला आणि सुभेदारी आपले महुणे हरजीराजे महाडीक यांच्या कडे सोपवली. हरजीराजे महाडीक यांनी दक्षिणेत भागानगर चा अनेक सुभे जिंकून घेऊन स्वराज्याला जोडले. त्यावेळी तंजावरचे महाराज शहाजी राजे (शाहूजी) यांची मोठी मदत झाली.
पुढे छ संभाजीराजे यांच्या मृत्यूनंतर इ स१६९० ला छत्रपती राजाराम महाराज यांनी जिंजी येथे स्वराज्याची राजधानी म्हणून घोषित केली. मुघल सरदार झुल्फिकारखानने जिंजी ला वेढा टाकला तेव्हा तंजावर महाराज शहाजी राजे यानी मराठ्यांना रसद पुरवठा केला. झुल्फिकारखान याच्या वर सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजीराव जाधव यांच्यासह तंजावरच्या शहाजीराजे यांच्या सैन्याने सतत हल्ले करुन जिंजीचा वेढा काही वर्षांसाठी उठवण्यात यश मिळवले. त्रिचनापल्ली चा नायक आणि तंजावर चे शहाजीराजे यांचे हाडवैर होते. शिवाय तो झुल्फिकारखान आणि मुघलांना मदत करत असे. राजाराम महाराज आणि संताजी घोरपडे यांनी १६९३ ला त्रिचनापल्ली वर हल्ला केला. आणि त्रिचनापल्ली किल्ल्याला वेढा टाकला. मराठ्यांचा राजा , सरसेनापती सह त्रिचनापल्ली वर चालून आला हे पाहून नायक मराठ्यांना शरण आला. २३ एप्रिल १६९३ ला त्रिचनापल्ली मराठ्यांच्या ताब्यात आले.
इ स १६९४ तंजावरचे महाराज शहाजीराजे यांच्या सहकार्याने राजाराम महाराज यांनी पांडेचेरी चे फ्रेंच, मद्रासचे इंग्रज पोर्तुगीज डच यांचा बंदोबस्त करून खंडण्या वसुल करायला सुरुवात केली. आणि त्यांच्या वर जरब बसवली. शहाजीराजे यांचे नंतर तंजावर च्या गादीवर सरफोजी राजे बसले.
इ स १७१३ ला छत्रपती शाहू महाराज यांनी कर्नाटक चा सुभा शाहू महाराज यांचे मानस पुत्र अक्कलकोट चे फत्तेसिंह भोसले यांच्या कडे सोपवले. आर्काट चा नवाब सादुल्ला खान आणि तंजावर चे तत्कालीन महाराज सरफोजी राजे यांचे हाडवैर होते. नागपूरकर रघुजीराजे भोसले अक्कलकोट चे फत्तेसिंह भोसले आणि तंजावर चे सरफोजी महाराज यानी एकत्रित मोहीम काढुन कोप्पळ करनूर , कडप्पा, तिरुपती व्यंकटगिरी जिंजी अशा तंजावर ला स्वराज्यला जोडणार्या प्रदेशाची साखळी पुन्हा स्वराज्यात आणली. १७२३ ला छत्रपती थोरले शाहू महाराजांनी फत्तेसिंह भोसले आणि रघुजीराजे भोसले यांना निजामाचा उपद्रव कमी करण्यासाठी पाठवले. तंजावर कर राजांनी या मोहिमेत त्याना वेळोवेळी मदत केली. फत्तेसिंह भोसले आणि रघुजीराजे भोसले यांनी चित्रदुर्ग पासुन बिदनुर पर्यंत खंडण्या वसुल केल्या. आणि हा प्रदेश अंमला खाली ठेवला. सरफोजी महाराज यांच्या नंतर तुकोजी, प्रतापसिंह आणि तुळोजी यांची तंजावर चे महाराज म्हणुन कारकीर्द घडली. त्यानंतर १७८७ पासुन व्यासंगी विद्वान विद्याविभूषित प्रसिद्ध सरफोजी राजे दुसरे यांची कारकीर्द घडली.
शरभोजी उर्फ सरफोजी दुसरे यांचा जन्म २४ सप्टेंबर १७७७ साली तंजावरच्या राजघराण्यात झाला. तंजावरचे राजे तुळजाजी भोसले यांनी स्वतः ला वारस नसल्याने सरफोजीना दत्तक घेतले.
त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी जर्मन रेव्हरंड श्वार्ट्झ यांना देण्यात आली. या श्वार्ट्झला भारतीय संस्कृती आणि इतिहासात खूप रस होता . इंग्लिश, ग्रीक,लाटिन सोबतच संस्कृत, तमिळ, उर्दू या भारतीय भाषा सुद्धा त्याला अवगत होत्या. तल्लख सरफोजिंचा श्वार्ट्झला लळा लागला. सरफोजीनी सुद्धा वरील सर्व भाषांमध्ये प्राविण्य मिळवलं. त्याने श्वार्टझकडून राज्यकारभाराचे धडे घेतले.
सरफोजीना शिकवण्याच्या निमित्ताने तंजावरला आलेल्या श्वार्ट्झला तंजावर मध्ये असलेल्या “नायक” घराण्याच्या “सरस्वती महाल” लायब्ररीचा शोध लागला. या लायब्ररीमध्ये अनेक मौलिक ग्रंथ, हस्तलिखिते धूळ खात पडली होती. श्वार्ट्झला भारतीय भाषा येत असल्याने त्याने ती वाचून काढली. त्याला त्या ग्रंथांचे महत्त्व लक्षात आले. या ग्रंथांचे व्यवस्थित वर्गीकरण करून ते ग्रंथालय पुन्रोजीवीत करण्यात आले.
सरफोजी महाराजांना इथेच वाचनाची सवय लागली.
१७८७ साली महाराज सरफोजी हे तंजावरच्या गादीवर आले. सावत्र भाऊ अमरसिंग याच्या बंडामुळे काही काळ सरफोजी यांना सत्तेवरून बाजूला जावे लागले होते. मात्र श्वार्टझने इंग्रजांकडून सरफोजिंचा हक्क मिळवून दिला. १७९८ साली राजे सरफोजी ना परत राजगादी वर आले मात्र इंग्रजांनी त्यांना मांडलिकत्व स्वीकारायला लावले.
येथून पुढे सरफोजी राजांनी आपला वेळ युद्धलढाई राजकारण याच्यात घालवण्यापेक्षा सुसूत्र राज्यकारभार आणि विद्यासंचय या मध्ये घालवला.
तंजावरला विद्येचे माहेरघर बनवण्याचा मान सरफोजी महाराजांना जातो.
त्यांनी सरस्वती महाल लायब्ररीसाठी जगभरातून ४००० पुस्तके विकत आणून ग्रॅंथालय समृद्ध केले. अरबी फारसी भाषेतील पुस्तकांचे अनुवाद केले. ग्रॅंथालयानध्ये अनेक ग्रॅंथासोबतच अनेक नकाशे आणि डिक्शनरी त्यांनी जमवल्या होत्या. १४ भाषा अवगत असणाऱ्या महाराजांनी लायब्ररीमधील सर्व म्हणजे जवळपास ३० हजार पुस्तके अभ्यासली होती. याचा वापर फक्त अभ्यास करण्यासाठी नाही तर जनतेच्या भलाईसाठी देखील केला.
तामिळ, मराठी, तेलगु भाषेतून विपुल वाङ्मयीन रचना सरफोजीराजांनी स्वत: केल्या आणि दरबारी पंडितांकडूनही करून घेतल्या. गोविंदकवी, विरुपाक्षकवी, गंगाधरकवी, अंबाजी पंडित, अवधूतकवी हे त्यांचे दरबारी होते.
सरफोजी महाराज यांना आयुर्वेदाचे ज्ञान होते. त्यांनी धन्वंतरी महाल बांधला होता जिथे आयुर्वेद, अलोपेथी, युनानी चिकित्सा पद्धती यावर संशोधन चाले. महाराज स्वतः रुग्णांवर उपचार करीत.
“महाराजांना नेत्रचिकित्से मध्ये विशेष रुची होती. महाराज फक्त औषधोपचार करत नव्हते तर ते शस्त्रक्रिया ही करायचे. साधीसुधी नाही तर मोतीबिंदू वरील शस्त्रक्रिया. १७८२ साली मोतीबिंदूवरील शस्त्रक्रियेचा शोध फ्रान्समध्ये लागला होता. त्याकाळात भारतामध्ये अतिशय कमी लोकांना या अवघड ऑपरेशनचे ज्ञान होते.”
महाराज सरफोजी त्या पैकी एक. त्यांनी फक्त ऑपरेशन केले नाही तर प्रत्येक ऑपरेशनचे डोक्यूमेंटेशन करून ठेवले. प्रत्येक रुग्णाच्या डोळ्यांची उपचारापूर्वी आणि उपचारानंतर अशी चित्रे काढून ठेवण्यात आली होती. आपल्या वैदकीय अनुभवावर महाराजांनी शरभेन्द्र वैद्य मुरगळ हा ग्रंथ लिहिला. यात अनेक रोग व त्यावरील उपचार यांचे व्यवस्थित वर्णन करून ठेवले आहे.”
संगीत नृत्य नाट्य चित्रकला या प्रत्येक कलेमध्ये सरफोजी महाराजांनी योगदान दिले. कर्नाटकी शास्त्रीय संगीताला व्हायोलिन आणि सनईची ओळख त्यांनी करून दिली.
कुमारसंभव चम्पू, मुद्राराक्षसछाया ,आणि देवेंद्रकुरुंजी या सारखे संगीतावरील ग्रंथ लिहिले. कर्नाटक संगीताला विकसित कलेचा दर्जा प्राप्त करून देणारे प्रसिद्ध संगीतकार त्यागराज, शामशास्त्री व मुथुस्वामी दीक्षितार हे तिघेही सरफोजींचे दरबारी गायक होते. पाश्चात्य संगीतकारांचे तंजोर बंड त्यांनी उभारले होते. हिंदुस्तानी राग आणि संगीताला पाश्चात्य नोटेशन वर बसवण्याची अभिनव कल्पना सरफोजी महाराजांचीच. कर्नाटकीसंगीत आणि भरतनाट्यमला सुवर्णकाळ त्यांनी मिळवून दिला. भरतनाट्यम मध्येही काही नवीन नृत्यरचना सरफोजी महाराजानी बसवल्या. तंजावर चित्रशैलीचा उगम, प्रसार त्यांनी केला. दरबारासाठी त्यांनी बनवून घेतलेली चित्रे आजही याची साक्ष आहेत.
तमिळ, तेलगु आणि तमिळ या भाषामध्ये अनेक ग्रंथ महाराजांनी स्वतः लिहिले अथवा पंडितांकडून लिहून घेतले. गोविंदकवी, विरुपाक्षकवी,अवधूतकवी हे त्यांच्या दरबारची शान होते...
अशा या मराठा साम्राज्याची सेवा करणार्या आणि मराठी संस्कृती दक्षिणेस रूजवणार्या तंजावरकर भोसले राजघराण्याला मानाचा मुजरा...

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...