विनोद जाधव एक संग्राहक

Monday 30 October 2023

मराठा स्वराज्यातील निष्ठावंत घराणीशाही मधील एक महत्वाचे कर्तबगार मराठा घराणे म्हणजेच ‘घोरपडे’ घराणे.

 


मराठा स्वराज्यातील निष्ठावंत घराणीशाही मधील एक महत्वाचे कर्तबगार मराठा घराणे म्हणजेच ‘घोरपडे’ घराणे..
“शस्त्रशास्त्रात म्हणजे रणविद्येत प्रवीण होऊन जो एकथा क्षत्रिय दहा हजार योद्ध्यांबरोबर लढू शकतो त्या रणधुरंधरासच मरहट्टा- महारथ महारथी म्हणतात”
उपरोक्त श्लोकात वर्णनकेले प्रमाणे ‘महारथ’ या शब्दापासूनच मराठा या शद्बाची उत्पती झाली असे डॉ. भांडारकर नमूद करतात. डॉ. भांडारकर नमूद करतात आपल्या विवेंचनात नमूद करतात “महारथ, महारथी, मरहट्टा व मराठा” असे या उत्पतीचे विश्लेषण करता येईल. मराठा ह्या शब्दाचा जरी एका जात समुहासाठी उपयोग केला जात असला, तरी इतिहासात या शब्दास फार मोठी मान्यता आहे. मराठा या शब्दात स्वराज्याची कित्तेक यज्ञकुंड-अग्निहोत्र सामवलेली, शेतकऱ्याच्या नांगराची तलवार बनविण्याची क्षमता आणि महाराष्ट्राधर्माची केसरी पताका यामध्ये सामावलेली आहे. महाराष्ट्रात यादवांचे राज्य नष्ट झाल्यानंतर जवळजवळ तीनशे वर्ष महाराष्ट्रात स्वातंत्र्याचा सुर्य उगवलाच नव्हता. अशा परिस्थितीत स्वराज्य निर्मीती आणि आत्म गौरवासाठी बेलभंडारा हाती घेणारी इतिहास प्रसिध्द अशी क्षत्रिय जमात म्हणजेच “मराठा” होय..!
कित्येक काळांपासून चालत आलेले धर्म अनेक वेळेस नष्ट झालेले आहेत, परंतू क्षात्र धर्माने त्यांचा उद्धार आणि प्रसार केलेले आहे. युगा-युगात आदिधर्म (क्षात्रधर्म) ची गरज दिसून आलेली आहे, म्हणूनच क्षात्रधर्म लोकांमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. या क्षत्रिय धर्माची जोपासणा आणि वृध्दी महाराष्ट्राती प्रत्यकाने आपल्यापरीने करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. राष्ट्रकुट, चालुक्य, मोर्य, परमार इत्यादी पासून ते भोसले, पवार, शिंदे, मोहिते, होळकर अशा अनेक कुळांनी या यज्ञकुंडात आपल्या आहुती दिलेल्या आहेत. भगव्या झेंड्यासाठी आणि महाराष्ट्र धर्मासाठी आपले जीवन सुध्दा तुच्छ मानले. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या इतिवृत्त शके १८३७ नुसार, छ.संभाजीनगर येथील भगवंतराव यादव मुनशी नावाच्या कवीने चौपन्न श्लोकांचे एक लहानसे स्तुतिपर काव्य रचून ते श्रीमंत नानासाहेब पेशवे यांस अर्पण केले होते. त्यात बाळाजी विश्वनाथापासून नानासाहेबांपर्यंत झालेल्या ऐतिहासिक पुरुषांचे काव्यमय वर्णन आले आहे. तसेच आपल्या कुलधर्माचे पालन करत स्वराज्याच्या सेवेत कर्तृत्व गाजवणाऱ्या काही घराण्याचा उल्लेख केलेला आहे..
● कवि मराठा साम्राज्यातील निष्ठावंत घराणी याबद्दल उल्लेख करताना लिहतो :
ज्याच्या दुंदुभिचा ध्वनी करितसे दिग्व्याळ बाधिर्यता ।
शौर्ये वीर्ये पराक्रमे निज यशें शोभे ध्वजा उन्नता ॥
गायकवाड पवार जाधव भले ब्रीदें जया साजती ।
सेनाधीप असंख्य थोर कुळिचे वर्णू तयातें किती ॥
.
ढमढेरे कवडे हि भापकर ते समरंगणीचे गडे ।
शस्त्राचे रगडे करुनि दभिती शत्रुदळा रोकडे ॥
शिंदे होळकरादि सैनिक बळी वीरश्रिये शोभले ।
अश्वी धारकरी अनेक चढती भारी शतायाकळे ॥
.
शिवपूर्व कालखंड हा आत्मविस्मृति आणि पारतंत्र्याचा कालखंड म्हणून इतिहासात ओळखला जातो. यवनी राजसत्तेचा अमंल हिंदुस्थानावर होता. दिल्ली, मालवा, गुजरात, बंगाल, बहामनी इत्यादी अनेक हिंदुस्थानच्या प्रदेशावर सुलतानशाही तख्त नशीन होत्या. ‘तख्ता या ताबूत’ चा सुलतानशीत बोलबाला असल्याने सामान्य जनता यामध्ये भरडली जात होती. अनेक कर्तुत्वान मराठा घराणी आपल्या पराक्रमाचा उपयोग ह्या शह्यांच्या सत्तेच्या सरंक्षणासाठी करीत होत्या. मुळातच सुलतांनाच्याकडे मराठे हे एकटे आपली सेवा देत नसत, शिया-सुन्नी मुसलमाना बरोबरच पठाण, अफगाण सारख्या मुस्लिम जमातीसुध्दा होत्या. मुसलीमातील शिया-सुन्नी त्याच बरोबर इतर जमाती मधील वादात मराठा घराण्याचा वापर करुन प्रबल होवू पाहणाऱ्या सुलतांनामुळे अनेक मराठ्यांना उत्कर्षाची संधी मिळाली. या परिस्थितीचा योग्य वापर करत, कर्तुत्वाच्या जोरावर अनेक मराठा घराणी उदयास आली..
सतराव्या शतकाच्या आरंभी भोसले घराणे दक्षिण हिंदुस्थानात उदयास येण्यापुर्वी घाटगे, शिर्के, फलटणचे निंबाळकर, मलवडीकर, मोरे, महाडीक वगैरे मराठा घराणी प्रसिध्दीच्या आणि समृध्दीच्या मार्गावर होती. यातील एक महत्वाचे कर्तबगार मराठा घराणे म्हणजेच ‘घोरपडे’ घराणे होय..!
मराठ्यांच्या इतिहासात घोरपडे घराण्याने बजावलेली कामगिरी अनेक अर्थांनी गौरवास्पद ठरावी अशीच होती. हे घराणे उत्तरेकडून राजपुतांच्या इतिहासाशी निगडित, तर महाराष्ट्रात मराठ्यांच्या इतिहासाशी ते निकटचे संबंधित. दक्षिण भारतात या घराण्याने स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतंत्रपणे आपला इतिहास घडवला. एवढ्या विविध क्षेत्रात शौर्य गाजवणाऱ्या घराण्याचे ऐतिहासिक महत्त्व अनेक थोर इतिहासकारांनी गौरवाने उल्लेखले आहे. विशेषतः शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात ज्या शर्थीने या घराण्याच्या थोर पुरुषांनी तलवार गाजवली तिची प्रशंसापर वर्णने फार्सी इतिहासकारांनाही करावी लागली. त्यांना संताजी, बहिर्जी आणि मालोजी या घोरपडे बंधूंचे पराक्रम आपल्या इतिहासात नमूद करणे अपरिहार्य वाटावेत एवढे मोठे होते..
――――――――――
चित्रकार : Ram Deshmukh 👌🏼♥️🔥

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...