विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 15 January 2025

निजामशाही, अहमदनगरची (१४८९-१६३७),

 निजामशाही, अहमदनगरची (१४८९-१६३७), 

मलिक अहमद- हा अहमदनगरच्या निजामशाही घराण्याचा मूळ पुरुष होता. याचा आजा बहिरंभट नांवाचा ब्राह्मण असून तो गोदेच्या उत्तरेस वर्‍हाडांतील पाथरी नांवाच्या शहराचा देशपांडे होता. दुर्गादेवीच्या दुष्काळांत याचा आजा आपल्या तिमाजी नांवाच्या मुलास घेऊन विजयानगराकडे गेला. बहामनी सुलतान अहमदशहा वली याच्या शिपायांनी विजयानगरच्या स्वारींत तिमाजीस कैद केले व गुलाम म्हणून सुलतानाकडे आणलें. सुलतानानें त्यास मुसुलमानी धर्माची दीक्षा दिली व त्याचें मलिकनायन नांव ठेवलं (१४६०). पुढें सुलतान महंमद यानें त्यास आपला कारभारी जो खानेजहान त्याच्या शिफारशीवरून मोठ्या योग्यतेस चढविलें व त्यास निजाम-उल्मुल्क ही पदवी देऊन तेलिंगणच्या सुभ्याच्या जागीं त्याची नेमणूककेली (१४७०). परंतु निजामउल्मुल्कनें मलिक अहमद नांवाच्या आपल्या मुलास नेमणुकीच्या जागीं पाठविलें, व आपण स्वत: सुलतानाच्या दरबारींच राहिला. येथें त्यानें खानेजहानविरुद्ध कारस्थान रचून सुलतानाच्या हुकूमानें त्याचा वध करविला व आपण स्वत: कारभारी झाला. यानंतरचा सुलतान जो महंमदशहा याच्या कारकीर्दीत निजामउल्मुल्कनें आपल्या अगोदरच मोठ्या असलेल्या जहागिरींत बीड व दुसर्‍या कित्येक जिल्ह्यांची भर टाकली व आपल्या मुलास तेलिंगणच्या सुभेदारीवरून परत बोलावून त्याची दौलताबाद सुभ्यावर नेमणूक केली. निजामउल्मुल्काचा वध झाल्यानंतर त्याचा मुलगा मलिक अहमद यानें बंड करून तो स्वतंत्र झाला (१४८९), व स्वत:स निजामशाहा ही पदवी त्यानें लावून घेतली. तीच पुढें अहमदनगरच्या सर्व राजांनीं लाविली व त्यांच्या राज्यास यामुळएंच निजामशाही असें नांव पडलें. शिवाय मूळ पुरुष बहिरंभट याच्या स्मरणार्थ या वंशांतील प्रत्येक शहा आपल्याला बहिरी अशी पदवी लावून घेत असे.


दौलताबाद सुभ्यावर नेमणूक झाल्यानंतर स्वतंत्र होण्यापूर्वी मलीक अहमद यानें कोंडाणें, शिवनेर, लोहगड, वगैरे पुण्याच्या आसपासचे सर्व किल्ले, व कोंकणांत दंडाराजपुरी पावेतोंचे बरेचसे किल्ले, बंडखोर किल्लेदारांपासून आपल्या कब्जांत घेतले; पैकी शिवनेरी किल्ल्यांत त्याला पुष्कळ द्रव्य सांपडलें. त्यावेळीं तो जुन्नरास राही. त्यानें आपल्या राज्यांत सर्वत्र शांतता केली. त्याच्यावर बहामनी शहानें स्वारी केली असतां उलट त्याचाच पराभव झाला. नंतर अहमदनें अहमदनगर हें शहर वसवून तेथें आपली राजधानी केली (१४९४). पुढें तो १५०८ सालीं मेला. तो सद्गुणी व एकपत्नीव्रतस्थ होता असें फेरिस्ता म्हणतो. द्वंद्वयुद्ध करून तंट्याचा निकाल लावण्याची चाल दक्षिणेंत त्यानेंच पाडली.

पहिला बुर्‍हाणशहा (१५०८-५३)- हा अहमदचा मुलगा ७ वर्षांचा असतांना गादीवर आला. हा विद्वान होता; १० व्या वर्षीच तो फारशीत निबंध वगैरे लिही. इस्माईल आदिलशहाची बहीण याला दिली होती. इस्माईलशीं व वर्‍हाडच्या इमादशहाशी याचीं युद्धें होऊन त्यांत याचा पराभव झाला. कंबरसेन नांवाचा ब्राह्मण पुष्कळ वर्षे याचा प्रधान होता. त्याच्या हुषारीनें त्याच्या राज्याची भरभराट झाली. त्याच्यामुळें मराठे लोक राजदरबारी पुढें येऊं लागले व त्यांनां मोठमोठ्या जागा मिळाल्या. पुढें पुढें निजामशाहींत मराठ्यांचा जो प्रसार झाला तो एव्हांपासून होय. संभाजीपंत नांवाचा दुसरा एक ब्राह्मण याचा परराष्ट्रमंत्रि होता. शहा ताहीर नांवाचा एक विद्वान याच्या पदरीं होता, त्याच्या सल्ल्यानें यानें राज्यांत शियापंथाचा जबरीनें प्रसार केला. त्यामुळें सुनींनीं दंगा आरंभला. गुजराथ, खानदेश व विजापूर येथील बादशहा सुनींनांच मिळाले. तेव्हां बुर्‍हाणनें दिल्लीच्या हुमायूनची मदत मागितली, पण तो अडचणीत असल्यानें ती मिळाली नाही. हे धार्मिक तंटे पुष्कळ दिवस चालले. एकदां बुर्‍हाणनें विजयनगरकरांच्या साहाय्यानें आदिलशहावर स्वारी केली. त्याचें बहुतेक आयुष्य लढण्यांत गेलें. तो स. १५५३ त मेला; त्याला ५ मुलें होतीं.

हुसेनशहा पहिला (१५५३-६५)- हा बुर्‍हाणचा वडील पुत्र. हा गादीवर बसल्यानंतर याच्या भावांचा व त्याचा तंटा लागला. विजापूर, गोवळकोंडे व विजयनगर येथील राजे याच्यावर चालून येऊन त्यांनीं नगरास वेढा दिला. तेव्हां यानें अंगी सामर्थ्य नसल्यानें त्यांच्याशीं तह केला. त्यानंतर दख्खनमधील सर्व मुसुलमान शहांनीं विजयनगरकरांवर स्वारी करून तालीकोट येथें हुसेनशहाचा व त्याच्या राज्याचा नाश केला (१५६५). या युद्धांत हुसेनच्या तोफखान्यानेंच विशेष कामगिरी केली. लढाईहून परतल्यावर थोड्याच दिवसांत हा मेला; याला बरीच मुलें होतीं. प्रसिद्ध चांदबिबी ही याचीच मुलगी होय. विजयनगरच्या विरुद्ध मुसुलमानी संघ स्थापण्यासाठी हुसेननें चांदबिबीस आदिलशहास दिले होतें.

मूर्तुझा पहिला (१५६५-८६)- हा हुसेनचा पुत्र; हा लहानपणीं गादीवर बसला. तेव्हां त्याची आई खुदिजा हीच कारभारी झाली. पुढें तिनें वशिल्याचे लोक कारभारांत नेमल्यानें ती प्रजेस अप्रिय होऊन तिला पकडण्याचा कट झाला. पण तो फुटून तिनें कटवाल्यांस शिक्षा केल्या. इतक्यांत विजयनगरच्या राज्यवांटणीबद्दल मुसुलमान पातशाह्यांत भांडणें जुंपली, तेव्हां मूर्तुझानें कारभार आपल्या हाती घेऊन विजापूरवर स्वारी करून आदिलशहाचा धारूर किल्ला घेतला; त्यामुळें आदिलशहीनें तह केला (१५६९). या सुमारास पोर्तुगीजांनीं रेवदंड्याच्या निजामी अधिकार्‍यास दारू पाजून ते बंदर व किनार्‍यावरील बरीचशीं ठाणीं बळकाविली. त्यावेळई याचें राज्य बराचसा वर्‍हाड, सर्व दौलताबादसुभा, जालना प्रांत, खानदेश, बाणकोट ते वसईपर्यंतचें कोंकण इतक्या भागावर पसरलें होतें.

यानंतर आदिलशहानें विजयानगरचें राज्य व निजामशहानें सर्व वर्‍हाडचें राज्य घेण्याचें ठरविलें. या सुमारास वर्‍हाडची गादी तोफलखान नांवाचा एक माणूस बळकावून बसला होता. इमादशाहीबरोबरच बेदरची बेदरशाहीहि जिंकून घेण्याचें मूर्तुझानें आदिलशहाच्या मदतीनें ठरविलें. प्रथम तोफलखान व इमादशहा यांस ठार मारून मूर्तुझानें इमादशाही आपल्या राज्यास जोडली. अकबरानें त्याबद्दल तक्रार केली होती, पण मूर्तुझानें तिकडे दुर्लक्ष्य केलें. खानदेशच्या शहानेंहि आडकाठी घेतल्यानें त्याचा पराभव करून मूर्तुझानें त्याच्यापासून खंडणी घेतली. बेरीदशहानें आपलें राज्य राखण्याबद्दल प्रथम मूर्तुझाचा दिवाण जंगीझखान यास लांच देण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न फसला. तेव्हां त्याच्या विरुद्ध मूर्तुझाचे कान फुंकले. त्यामुळें मूर्तुझानें त्याला विषप्रयोग केला. पुढें खरा प्रकार समजल्यावर त्यास वाईट वाटलें व त्यानें सर्व राज्यकारभार एका कारभारी मंडळाच्या हवाली करून आपण ईश्वरसेवेंत काळ घालवूं लागला. पुढें त्यास वेड लागलें, त्यांत तो आपल्या मिरन नांवाच्या मुलाचा जीव घेण्याचा प्रयत्न करी. पण तो न साधतां मूर्तुझाच अखेरीस वेडांत मेला; कोणी म्हणतात मिरननें त्याचा खून केला.

मिरनशहा (१५८६-८९)– हा मूर्तुझाचा पुत्र; हा फार दुर्व्यसनी होता. याची सर्व कारकीर्द केवळ दरबारी भानगडींतच गेली. राज्यांत दक्षिणी व परदेशी असे पक्ष प्रबळ होऊन दाक्षिणात्यांनीं परदेश्यांची व त्याबरोबरच वजिराची व मिरनशहाचीहि कत्तल केली व मिरनचा चुलत भाऊ इस्माईल यास गादीवर बसविलें (१५८९).

इस्माईल शहा (१५८९-९०)- मूर्तुझाचा बुर्‍हाण नांवाचा भाऊ होता, त्याचा हा मुलगा; हा प्रथम लोहगडावर कैदेंत होता. हा गादीवर आल्यानंतर दक्षिणी पक्षाचा जमालखान हा वजीर बनला; त्यानेंच याला गादीवर बसविलें होतें. इस्माईलचा बाप बुर्‍हाण हा मागेंच अकबराच्या आश्रयास जाऊन राहिला होता. त्यानें संधि पाहून अकबराची मदत घेऊन इस्माईलवर स्वारी केली व त्यास कैद करून आणि जमालाला ठार करून गादी बळकावली.
बुर्‍हाणशहा दुसरा (१५९१-९४)- हा शियापंथी असल्यानें त्यानें सुनी लोकांचा पुष्कळ छळ केला. रेवदंड्यास पोर्तुगीजवर यानें केलेली स्वारी प्रसिद्ध आहे. तींत बुर्‍हाणचा पराभव झाला. पोर्तुगीजांच्या व याच्या नेहमीं चकमकी होत. हा १५९४ साली मेला.

इब्राहीम शहा (१५९४)- हा बुर्‍हाणचा दुसरा पुत्र; हा दुर्व्यसनी होता. दरबारांत दुफळी होऊन विजापुरकरांशी युद्ध सुरू झालें त्यांत हा मारला गेला. यानें चाह महिने राज्य केलें. याच्या मागून वजीर मियान अंजू यानें अहंमद नांवाचा एक मुलगा गादीवर बसविला.

अहंमद शहा (१५९५)- हा निजामशाहीचा खरा वारस नाहीं असा वाद माजला, तेव्हां अंजूनें दिल्लीकर अकबराचा पुत्र मुराद याच्या मदतीनें नगरास वेढा दिला. या वेळी अहंमदशिवाय आणखी तीन इसम निजामशाही राज्यावर आपला हक्क सांगत होते. त्यास पाठिराखेहि मिळाले होते. पैकी बहादुर नांवाच्या हक्कदारास चांदबिबीचा पाठिंबा होता. मुरादनें वेढा दिला. त्यावेळी चांदबिबीनें तो मोठ्या शौर्यानें उठविला. तिच्या मदतीस विजापूर व गोवळकोंड्याच्या फौजा आल्या होत्या. (चादंबिबी पहा).

बहादुर शहा (१५९५-१६००).- हा इब्राहीमचा पुत्र. चांदबिबीनें याला गादीवर बसवून आपण कारभार हाती घेतला. परंतु महंमद नांवाच्या वजिरानें मुरादास (तिच्या विरुद्ध) पुन्हां बलाविलें. मोंगलांनीं येतां येतां निजामशाहीचा पुष्कळ प्रांत काबीज केला. चांदबिबीच्या विनंतीवरून गोवळकोंडे व विजापूर येथील मदत पुन्हां आली. सोनपत येथें दोन दिवस मोंगल व निजामशहा यांत तुंबळ युद्ध होऊन मोंगल जय पावला (जानेवारी १५९७). पुढें नगरावर एकदम चाल करण्याच्या बाबतींत मुराद व त्याचा सेनापति यांत वाद पडला. इकडे चांदबिबी व वजीर नेहंगखान यांच्यातहि कारभाराबद्दल तंटा माजला. इतक्यांत मुराद एकाएकी मेल्यामुळें अकबरानें दानियल यास नगरावर पाठविलें (१५९९). नेहंगखान पळून गेला. चांदबिबी एकटी राहिली. तिच्या मनांत मोंगलांच्या अफाट फौजेस तोंड देण्यापेक्षां तूर्त बालराजासह जुन्नास जाऊन रहावें व पुढें प्रसंग आला म्हणजे लढाई करावी असा विचार होता; परंतु यामुळें ती मोंगलांस फितूर आहे, असें ठरवून हमीद खोजा व त्याची मंडळी यांनीं तिचा खून केला. अर्थात अहमदनगर आयतें मोंगलांस मिळालें. बहादूरशहास अकबरानें ग्वालेरीस कैदेंत ठेवून दख्खनचा कारभार दानियल यास दिला (१६००).

मुर्तुझा दुसरा (१६०१-०७)- पहिल्या बुर्‍हाणचा नातू; याच्या बापाचें नांव शहाअली. याला निजामशाही सरदारांनीं परिंड्यास गादीवर बसविलें. त्यांत शहाजी राजे, मिआन राजू व मलिकंबर हे मुख्य होते. त्यांनीं पुन्हां निजामशाही वाढीस लाविली. पुढें मलिकंबर व राजू यांत भांडणें होऊन मोंगल चालून आला, तेव्हा मलिकंबरने त्यांच्याशी तह करून राज्य राखिलें व राजधानी नगरहून हालवून दौलताबादेस नेली. त्याच्या वशिल्यानें बरेंच मराठे सरदार पुढें आले. या सुमारास अकबर मेल्यानें अंबरनें मोंगलांचा पराभव करून नगर व बराचसा प्रांत परत मिळविला. पुढें त्याचें व मुर्तुझाचें जमेना म्हणून त्यानें त्यांस पदच्युत केलें (१६०७).

बुर्‍हाण तिसरा (१७०७-३०)- मलिकंबरनें मुर्तुझास पदच्युत करून बुर्‍हाणास गादीवर बसविलें आणि तोडरमल्लाप्रमाणेंच जमाबंदी करून राज्यांत सर्वत्र सुधारणा केल्या. जहांगीरनें पाठविलेल्या फौजांचा त्यानें पराभव केला; पुढें शहाजहान प्रत्यक्ष आला व त्यानें निजामी दरबारांत बरीच फितुरी केली. त्यामुळें लढाईंत मलिकंबरचा पराभव झाला, तेव्हां नगर व थोडासा प्रांत मोंगलांस देऊन त्यानें त्यांच्याशी तह केला. अंबर मेल्यावर (१६२६) त्याचा मुलगा फत्तेखान वजीर झाला. पण त्याच्या अंगीं बापासारखी मुत्सद्देगिरी नव्हती. पुढें तो आंतून मोंगलास फितूरहि झाला. त्यामुळें त्याला शहानें कैदेंत टाकिलें. लखुजी जाधवहि बुर्‍हाणास त्रासून मोंगलांस मिळाला; तव्हां बुर्‍हाणनें लखुजीचा खून करविला. बुर्‍हाण हुषार नसल्यानें राज्यांत गोंधळ माजला. प्रांताधिकारी स्वतंत्र बनले. तेव्हां त्यांस शहाजीनें एकत्र करून व आपण मुख्य वजीर बनून निजामशाही तगविली आणि मोंगलांपासून पुष्कळसा प्रांत परत मिळविला. विजापुरकरांनीं कोंकणांतील निजामशहाचा कांहीं भाग घेतला होता तोहि शहाजीनें परत घेतला. इतक्यांत शहाजहानचा बंडखोर सरदार खानजहान लोदी यास बुर्‍हाणनें आश्रय दिल्यानें शहाजहाननें त्याचा पराभव केला. पुढच्या वर्षी दख्खनमध्यें भयंकर दुष्काळ पडून निजामशाही ओसाड पडत चालली; ती संधी साधून लोदीस ठार करून पुन्हां मोंगलानें चाल केली. तेव्हा बुर्‍हाणनें कैदेतून फत्तेखानास सोडलें. आणि आदिलशहाशीं परस्परांनीं परस्परांस मदत करावी असा तह केला. फत्तेखानानें लगेच बुर्‍हाणास कैदेत टाकून व पुढें त्याचा खून करून सर्व राज्यासह तो मोंगलांस शरण गेला. तेव्हा शहाजहाननें त्याला मोठी जहागीर दिली.

हुसैन दुसरा (१६३०-३३)- हा दुसर्‍या मुर्तुझाचा पुत्र; याला फत्तेखानानें गादीवर बसविलें, तेव्हा हा १० वर्षांचा होता. फत्तेखानानें निजामशाही मोंगलांच्या हवाली केल्यानें शहाजीस राग येऊन, त्यानें आदिलशहाच्या मदतीनें दौलताबादेवर हल्ला केला व फत्तेखानाची समजूत करून दौलताबाद परत घेतलें. मोंगल चिडले व त्यांनीं ५८ दिवस तुंबळ युद्ध करून दौलताबाद परत घेतलें. फत्तेखान व हुसेनशहा यांस पकडून दिल्लीस पाठविलें व निजामशाही ताब्यांत घेतली (१६३३). हुसेनला ग्वालेरीस कैदेंत ठेविलें व फत्तेखानाची उत्तरेकडे नेमणूक झाली.

मुर्तुझा तिसरा (१६३३-३७)- हुसेननंतर शहाजी राजें याला गादीवर बसवून चार वर्षे आटोकाट प्रयत्न करून आणि मोंगलांशीं टक्कर देऊन निजामशाही तगविली. खरें म्हटल्यास शहाजीच मलिकंबराच्या नंतर मुख्य वजीर व राजनिर्माता होता. त्यानें सर्व कोंकण व नीरा नदीपासून चांदोर टेंकड्यामधील सर्व प्रांत परत मिळविला व परांड्यास राजधानी केली (१६३४). दक्षिणेंतील युद्धाचा पुन्हां पहिलाच दिवस आला असें पाहून व शाहिस्तेखानादि सरदारांची शहाजीपुढें डाळ शिजत नाहीसें पाहून खास शहाजहान दख्खनमध्यें आला; व शहाजीला त्यानें तोंड दिलें. आदिलशहाच्या मदतीनें मोंगलांचा अनेक ठिकाणीं समाचार घेतला. शेवटीं शहाजहाननें आदिलशहास अर्धी निजामशाही देण्याची लालूच देऊन फोडलें. तरीहि दीड दोन वर्षे शहाजीनें एकट्यानें मोंगलांस दाद लागूं दिली नाही. अखेर मुर्तुझासह तो माहुलीस असतांना, शहाच्या आईनेंच शहाजहानशीं बोलणें लावल्यानें शहाजीनें निजामशाही तगविण्याचा प्रयत्न सोडला; नंतर मुर्तुझास शहाजहाननें ग्वाल्हेरीस कैदेंत ठेवून सर्व निजामशाही खालसा करून, अर्धी आदिलशहास दिली (१६३७). याप्रमाणएं साधारण १५० वर्षे निजामशाही राज्य महाराष्ट्रांत सुरू होतें. आदिलशाहींत हिंदूंचा जितका छळ झाला अथवा त्यांनां जितकें हलकें लेखण्यांत आलें तितकें निजामशाहींत झालें नाहीं. निजामशाहीचा बहुतेक कारभार मराठ्यांच्याच हातीं होता म्हटलें तरी चालेल. मध्यकालीन (ज्ञानेश्वरानंतर व रामदासापूर्वीच्या) महाराष्ट्र सारस्वताचा उगम बहुधां निजामशाहींत झाला. [ग्रँट डफ; फेरिस्ता; बुसातिनेसलातीन; साउथ इंडियन डिनॅस्टिज; मुसुलमानी रिसायत; माबेल डफ.]

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...