होयसळ राज-
होयसळ हे इतर प्रसिद्ध घराण्यांप्रमाणे सोमवंशी यदु कुलांतील होत. पोयसळ, चोयसळ, होयसळ, व होयसण वगैरे त्यांचीं निरनिराळीं नांवे आहेत. ह्या घराण्याची पौराणिक वंशावळ प्रथम इ. स. १११७ च्या एका ताम्रपटांत, म्हणजे बहुधां हें घराणें उदायास आणणारा विष्णुवर्धन याच्या वेळी, दिलेली आढळते. ऐतिहासिक वंशावळ विनयादित्यापासून (इ.स. १०४८) सुरू होते. त्यांचा इतिहासप्रसिद्ध पहिला राजा बिट्टिदेव उर्फ बिट्टिग ह्यानें द्वारसमुद्र शहर स्थापून तेथें सन ११११ पासून ११४१ पावेतों राज्य केलें. आरंभीं या राजाचा आश्रय जैन धर्मास होता, आणि त्याचा प्रधान गंगराज यानें पुष्कळ जैन मंदिरें बांधिलीं. परंतु रामानुजानें (१०१६-११३७) यावेळीं भक्तिमार्ग सुरू केला, त्याचा परिणाम बिट्टिदेवावर होऊन तो वैष्णव धर्माचा उपासक बनला. त्यानंतर विष्णुचीं उत्कृष्ट मंदिरें त्यानें द्वारसमुद्र व इतरत्र बांधिली. त्यानें स्वत: आपलें नांवहि विष्णुवर्धन असें धारण केलें. विष्णुवर्धनानें व त्याच्या अनुयायांनीं होयसळ यादवांची सत्ता पुष्कळच वाढविलीं. विष्णुवर्धनाचा नातू वीरबल्लाळ हा फार पराक्रमी होता. त्यानें उत्तरेस देवगिरीपावेतों आपल्या राज्याचा विस्तार वाढविला. चालुक्यवंशी सोमेश्वर (चवथा) याचा सेनापति ब्रह्मा म्हणून होता, त्यास काबीज करून सोमेश्वराचें बहुतेक राज्य त्यानें जिंकलें. पुढें सेऊणदेशच्या यादववंशांतील भिल्लम यानें वीरबल्लाळ यादव व सोमेश्वर चालुक्य या दोघांचाहि पाडाव करून त्यानें आपल्या वंशाचें नवीन राज्य देवगिरी येथे स्थापन केलें (स. ११८७), ह्याच भिल्लमाचा यादववंश महाराष्ट्रांत पुढें प्रतापशाली झाला. इ. स. १३१० मध्यें दिल्लीचा बादशहा अलाउद्दीन यानें मलिकाफर यास द्वारसमुद्र येथील होयसळ यादव राजावर पाठविलें. त्यानें राजधानीचा नाश केला, देवळें लुटली व या घराण्याचें उच्चाटण केलें. इ.स. १३२६-२७ मध्यें मुसलमानांची दुसरी स्वारी आली. मुसुलमानांनी द्वारसमुद्र ही राजधानी अगदीं उदध्वस्त करून टाकली तेव्हा होयसळ राजा तिसरा बल्लाळ हा श्रीरंगपट्टण जवळ तोंडनूर येथें जाऊन राज्य करूं लागला. त्याच्या हातीं खरी सत्ता अशी मुळींच उरली नव्हती, परंतु पुढे सुमारें ५० वर्षेपर्यंत तो व त्याचे वंशज राज्य करीत असावे. (फ्लीट) वं शा व ळ.-(१) विनयादित्यास १ ला-त्रिभुबनमल्ल देखील म्हणत. हा पश्चिमेकडील चालुक्य विक्रमादित्य ६ वा, याचा मांडलिक. मुलगा (२) ऐरयेंग किंवा एरेगंग. याचा एक मुलगा (३) बल्लाळ १ ला व दुसरा (४) विष्णुवर्धन; ह्याला उदयादित्य, बिट्टदेव, बिट्टिग, त्रिभुवनमल्ल २ रा भुजबलगंग, वीरगंग आणि विक्रमगंग देखील म्हणत. (५) एरेयंगचा तिसरा एक मुलगा उदयादित्य नांवाचा होता. विष्णुवर्धनाचा मुलगा (६) नरसिंह १ ला; याला वीरनरसिंह किंवा विजयनरसिंह असें देखील म्हणतात. मुलगा (७) बल्लाळ २ रा किंवा वीरबल्लाळ. मुलगा (८) नरसिंह २ रा किंवा वीरनरसिंह, याला देवगिरीच्या यादवांनीं जिंकलें. मुलगा (९) सोमेश्वर; हा चोळ देशांत विक्रमपूर येथें राज्य स्थापन करून राहिला. मुलगा (१०) नरसिंह ३ रा; यानें द्वारसमुद्र येथें राज्य केलें, मुलगा (११) बल्लाळ ३ रा किंवा वीरबल्लाळदेव; यानें इ. स. १३१० च्या मुसुलमानांच्या जयापर्यंत राज्य केलें. (फ्लीट)
No comments:
Post a Comment