विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 15 January 2025

चालुक्य घराणें -

 चालुक्य घराणें -

 चालुक्य घराण्याचें राज्य मोठें विस्तीर्ण असून यांनीं इ. स. सहाव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत सहा शतकें राज्य केलें. या कालापैकीं बराचसा काल हें एक बलिष्ठ राष्ट्र समजलें जात असे. चालुक्य दक्षिणेंत आल्याबद्दलची माहिती प्रथम आपणांस सुमारें इ. स. ५५० च्या सुमाराची मिळते. पहिला पुलकोशी यानें इ. स. ५५० च्या सुमारास आपली सत्ता स्थापन केली. या घराण्याचे पुष्कळ शिलालेख आहेत व त्यांपैकीं शेवट शेवटच्या राजांच्या शिलालेखांतून या घराण्याची वंशावळ दिली आहे. तसेंच यांच्या मूठपुरुषाबद्दल, अयोध्येमध्यें राज्य करीत असलेला सोमवंशांतील ५९ पुरूष विजयादित्य ( अयोध्येस ५९ पुरूष होऊन गेल्यावर विजयादित्य हा दक्षिणेत आला ) हा मुलुख जिंकण्याकरितां दक्षिणेंत आला पण लढाईंत मारला गेला अशी माहितींहि दिली आहे. या विजयादित्याची स्त्री गरोदर असून आपला जीव बचावून पळून गेली व एका ब्राह्मणाच्यां घरीं आश्रयास राहिली. तेथें तिला विष्णुवर्धन नांवाचा पुत्र झाला. यानें विष्णुगिरीवर तप करून गौरीला प्रसन्न करून घेतलें व मग राज्य स्थापून पुष्कळ विजय संपादन केले व कांची येथील पल्लव राजाच्या कन्येशीं विवाह करून आपल्या राज्यास बळकटी आणली. याचा पुत्र विजयादित्य व त्याचा पुत्र पुलकेशिवल्लभ हा होय. ऐहोळ येथील शिलालेखांत पुलकेशीचा पिता रणराग व आजा जयसिंहवल्लभ नामक होता असा उल्लेख आहे ( फ्लीट म्हणतो कीं या सर्व दंतकथा असून, चालुक्य राजे हे पल्लव राजे राज्य करीत असतां दक्षिणेंत आले व त्यांचें राज्य त्रिलोचन ( त्रिनेत्र ) यानें स्थापिलें. एवढें मात्र ऐतिह्य आहे ). यालाच पुलिकेशी असेंहि म्हणत असत. पुलकेशी याचे नातू विभक्त होऊन त्यांनीं पूर्व व पश्चिम चालुक्य घराण्याची स्थापना केली. यांपैकीं वडील नातू हा पश्चिमेकडे राहिला व धाकटा कुव्जिष्णुवर्धन यानें वेंगी येथील पल्लवराजा शालंकायन यास जिंकून व पूर्वकिनारा काबीज करून पूर्व घराण्याची स्थापना केली.

वेंगी येथील पल्लव राजे हे आंध्रभृत्य यांच्यानंतर कृष्णा नदीच्या प्रदेशांत राज्य करीत असून बुद्धधर्मी होते. तेव्हां हा विजय म्हणजे बुद्धधर्मावरील ब्राह्मणधर्माचा विजयच होय. कारण चालुक्य हे वैष्णव होते. चालुक्य घराण्याला कल्याणचे चालुक्य असें म्हणण्याचा जो प्रघात आहे, त्याबद्दल फ्लीट म्हणतो कीं, पूर्वकालीन चालुक्य राजांच्या  शिलालेखांत कल्याणच्याबद्दल कांहींच उल्लेख नाहीं. अगदीं प्रथमच कल्याणचा उल्लेख पश्चिम चालुक्य घराण्यांतील राजा त्रैलोक्यमल्ल ( सोमेश्वर पहिला ) याच्या शा. श. ९७५ ( इ. स. १०५३-५४ ) च्या शिलालेखांत सांपडतो.  

चा लु क्य पू र्व घ रा णें.- पूर्वचालुक्य वंशाच्या राज्याला वेंगी देश म्हणतात. याच्या चतु:सीमा.-पश्चिमेस पूर्वघांट, पूर्वेस समुद्र, उत्तरेस गोदावरी नदी व दक्षिणेस कृष्णा नदी अशा आहेत. या चतु:सीमेंत असलेल्या मुलुखाचें क्षेत्रफळ सुमारें ८००० चौरस मैल होतें. या देशाचें खरें नांव आंध्र देश असें असून त्याची राजधानी वेंगी ही होती.

पूर्व चालुक्य वंशाची स्थापना :-चालुक्य साम्राज्यावर दुसरा पुलिकेशी हा इ. स. ६०९ अथवा १० सालीं गादीवर आला. हा बलाढ्य राजा असल्यामुळें यानें दक्षिणेकडे आपलें राज्य वाढविलें व येथील पल्लव राजाचा पराभव केला. पुलकेशीला आपल्या राज्यांतून इतक्या लांब मुलुखगिरीवर जावें लागलें म्हणून त्यानें आपला भाऊ पहिला विष्णुवर्धन याला आपल्या देशांत युवराज करून ठेविलें ( ६१५). या स्वारींतच बहुधा वेंगीं देश चालुक्य साम्राज्याला जोडला गेला असावा. राजधानीला आल्यावर पुलिकेशी यानें आपल्या भावाला नवीन जिंकलेल्या मुलुखावर सुभेदार नेमून पाठविलें. थोड्याच काळांत ( ६३२ ) परस्परानुमतानें विष्णुवर्धन यानें पूर्व किनार्‍यावर स्वतंत्र साम्राज्य स्थापिलें; व चालुक्य वंशाचें पूर्व घराणें सुरू केलें. कोणी म्हणतात कीं त्यानें बंड करून स्वतंत्र राज्य स्थापिलें. हें राज्य ५०० वर्षें तरी या भागावर होतें. या घराण्यांतील निरनिराळ्या राजांनीं किती किती वर्षें राज्य केलें त्याबद्दलच्या शिलालेखांतील माहितींत फरक दिसून येतो. तसेंच शिलालेखांतील माहिती नुसती वंशावळीपुरतीच आढळते.

पूर्वचालुक्य वंशांत होऊन गेलेले राजे:-( १ ) पहिला विष्णुवर्धन ( ६१५ ते ६३३ ). हा पश्चिम चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचा धाकटा भाऊ होय. याच्या बापाचें नांव पहिला कीर्तिवर्मा असें होतें. याला कुब्जविष्णुवर्धन, कुब्जविष्णु व बिट्टीदेव असेंहि म्हणतात. याला पृथ्वीवल्लभ असें उपपद असून विषमसिद्धि असें विरूद होतें. याच्या राज्याला बॅगीदेश म्हणतात. यानें वेंगीराज शालंकायण याचा पराभव करून आपलें राज्य स्थापिलें. यानें ओरिसापर्यंतचा मुलूख जिंकून राजमहेंद्री येथें राजधानी केली. याचें राज्य सर्व कलिंग देशावर होतें. यानें वेंगीवर स्वरी ६०५ च्या सुमारास केली व ६१० त हा स्वतंत्र झाला असें एके ठिकाणीं म्हटलें आहे तर दुसर्‍या ठिकाणीं ६१५ मध्यें गादीवर आला असें म्हटलें आहे. याच्या आज्त्रेवरून याचा दरबारी कवि नानय्याभट्ट यानें महाभारताचें तेलगू भाषांतर केलें होतें. ( २ ) पहिला जयसिंह ( ६३३ ते ६६३ ), जयसिंह हा विष्णुवर्धनाचा वडील मुलगा होता. याला सर्वसिद्धि असें विरूद्ध होतें. एका ताम्रपटावरून यानें ३३ वर्षें राज्य केलें तर दुसर्‍यावरून ३० वर्षें केलें असें दिसतें. ( ३ ) इंद्र ( भट्टारक ) ( ६६३ ). हा जयसिंहाचा धाकटा भाऊ. कोठें कोठें याला इंद्रराज असेंहि म्हटलें आहे. एका राजसंघानें याला गादीवरून काढण्याचा प्रयत्‍न केला त्यांत अधिराजेंद्र हा मुख्य होता. अधिराजेंद्र बहुधा कलिंगनगरच्या गंगवंशाचा इंद्रवर्मा असावा. इंद्रानें ७ दिवसच राज्य केलें असें एके ठिकाणीं म्हटलें आहे. ( ४ ) दुसरा विष्णुवर्धन ( ६६३ ते ६७२ ),हा इंद्राचा मुलगा होय. याला सर्वलोकाश्रय हें उपपद होतें व विषमसिद्धि हें बिरूद होतें. यानें नऊ वर्षें राज्य केलें. याचे २ शिलालेख नेलोर व मट्टेवाडा येथें आहेत. ( ५ ) मंगि युवराज ( ६७२ ते ६९६ ), हा दुसर्‍या विष्णुवर्धनाचा मुलगा होता. याला युवराज हा किताब होता. यालाहि सर्वलोकाश्रय व विजयसिद्धि हीं बिरूदें होतीं. याचा एक शिलालेख सांपडला आहे. ( ६ ) दुसरा जयसिंह ( ६९६ ते ७०९ ), हा मंगीचा सर्वांत वडील मुलगा होता. यानें १३ वर्षें राज्य केलें. ( ७ ) कोक्किली, हा दुसरा जयसिंहाचा धाकटा सावत्र भाऊ असून यानें सहा महिनेच राज्य केलें. ( ८ ) तिसरा विष्णुवर्धन ( ७०९ ते ७४६ ), हा कोक्किलीचा वडील भाऊ होता. हा सावत्र कीं सख्खा याचा स्पष्ट उल्लेख नाहीं. कोक्किलीला गादीवरून काढून टाकून हा गादीवर बसला. ( ९ ) पहिला विजयादित्य ( ७४६ ते ७६४ ). हा तिसर्‍या विष्णुवर्धनाचा मुलगा होय. याला विजयादित्य भट्टारक असेंहि म्हणत. यानें १८ वर्षें राज्य केलें. ( १० ) चवथा विष्णुवर्धन ( ७६४ ते ७९९ ), हा पहिल्या विजयादित्याचा मुलगा होता. यानें ३६ वर्षें राज्य केलें. एका शिलालेखांत यास विष्णुराज नामाभिधान दिल्याचें आढळतें. ( ११ ) दुसरा विजयादित्य ( ७९९-८४३ ), हा चवथ्या विष्णुवर्धनाचा मुलगा. याला त्रिभुवनांकुश नरद्रेंमृगराज असेंहि म्हणत. यानें ४०, ४४ व ४८ वर्षें राज्य केलें असा निरनिराळ्या ताम्रपत्रांत उल्लेख आहे. यांतील ४४ वर्षें हा उल्लेख विश्वसनीय असावा. हाच या घराण्यांतील पहिला सार्वभौम राजा असावा. एका शिलालेखावरून असें म्हणतात कीं, यानें बारा वर्षांत गंग व रट्ट राजांच्याबरोबर १०८ लडाया केल्या व तितकींच देवळेंहि बांधलीं. हे बहुधा मालखेडचे राष्ट्रकूट असावेत. यांचा समकालीन रट्ट राजा तिसरा गोविंद होता. विजयादित्याच्या नंतर रट्ट राजांनीं वेंगीवर स्वारी करून तेथें कांहीं काळ आपला अंमल बसविला होता. याचे दोन शिलालेख उपलब्ध आहेत. ( १२ ) पांचवा विष्णुवर्धन अथवा कालविष्णुवर्धन ( ८४३ ते ८४४ ), हा दुसर्‍या विजयादित्याचा मुलगा होता. याला महाराज ही पदवी लावीत असत. यानें अठरा महिनेच राज्य केलें. ( १३ ) तिसरा विजयादित्य उर्फ गुणांक ( ८४४-८८८ ), हा पांचव्या विष्णुवर्धनाचा वडील मुलगा. याला एका ताम्रपत्रांत गुणांक असें म्हटलें आहे. रट्टांच्या राजानें मदतीस बोलाविल्यावरून यानें त्यास मदत देऊन गंगांचा मंगीराज यास लढाईंत ठार मारिलें. तसेंच पुढें मालखेडच्या ( राष्ट्रकूट ) दुसर्‍या कृष्णराजाचा पराभव करून त्याची राजधानीहि यानेंच गाळली. ( १४ ) पहिला भीम ( ८८८ ते ९१८ ), हा मागील राजाचा भाऊ पहिला विक्रमादित्य याचा मुलगा होता. तिसर्‍या विजयादित्याच्या मृत्यूनंतर रट्ट लोकांनीं बेंगी देशावर स्वारी करून तो देश घेतला. पुढें भीमानें आपलें राज्य त्यांच्यापासून परत जिंकून घेतलें व कृष्णराष्ट्रकूटाचा पराभव केला. याचें दुसरें नांव द्रोहार्जुन असें होतें. ( १५) चवथा विजयादित्य कोल्लभिगंड ( ९१८ ), हा पहिल्या भीमाचा मुलगा. याच्या बायकोचें नांव मेलांबा. यानें सहा महिने राज्य केलें. यानें कलिंगांच्या राजांनां जिंकलें. ( १६ ) पहिला अम्म ( अप्प? ), सहावा विष्णुवर्धन ( ९१८-९२५ ), हा चवथ्या विजयादित्याचा वडील मुलगा याचें नांव विष्णुवर्धन असें होतें. याच्या कारकीर्दीत राजमहेंद्री शहर चालुक्यांनीं जिंकलें. राष्ट्रकूटांबरोबर याच्या आप्तांनीं याच्याविरूद्ध कट केला होता परंतु तो सिद्धीस गेला नाहीं. ( १७ ) पांचवा विजयादित्य ( ९२५ ). हा पहिल्या अम्माचा मुलगा. याचें दुसरें नांव बेट्ट. याला तैलप्पनें गादीवरून काढलें. याचा कारभार महिनाभरच झाला. ( १८ ) तालप ( ९२५ ), हा पहिल्या भीमाचा मुलगा जो युद्धमल्ल ( पहिला ) त्याचा पुत्र होय. याच्या नांवाचा उल्लेख तारप, तालप ( तैलप्प ) असा निरनिराळ्या ठिकाणीं आहे. हा पांचव्या विजयादित्याला गादीवरून काढून गादीवर आला. याला विक्रमादित्य ( दुसरा ) यानें गादीवरून काढलें यानें १ महिनाच कारभार केला. तालप व विक्रमादित्य ( दुसरा ) यांच्या झटापटींत तालप ठार झाला असें एके ठिकाणीं म्हटलें आहे. ( १९ ) दुसरा विक्रमादित्य ( ९२५-९२६ ), हा पहिल्या भीमाचा दुसरा मुलगा. यानें तैलप्पाला जिंकून राज्य कमाविलें यानें ११ महिने राज्य केलें. ( २० ) दुसरा भीम  ( ९२६-९२७ ), हा पहिल्या अम्माचा दुसरा मुलगा. यानें दुसर्‍या विक्रमादित्याला जिंकून राज्य मिळविलें. तैलप्पाचा मुलगा दुसरा युद्धमल्ल यानें याची कत्तल करून राज्य घेतलें. यानें ८ महिने कारभार केला. ( २१ ) दुसरा युद्धमल्ल ( ९२७-९३४ ), हा तैलप्पाचा वडील मुलगा. यानें दुसर्‍या भीमाचा पराभव करून राज्य कमाविलें. परंतु याचा पराभव करून तिसर्‍या भीमानें याच्यापासून राज्य घेऊन याला हाकून लावलें. ( २२ ) तिसरा भीम.-सातवा विष्णुवर्धन ( ९३४-९४५ ), हा चवथ्या विजयादित्याचा मुलगा व पहिल्या अम्माचा सावत्र भाऊ. यानें बारा वर्षें राज्य केलें. याच्या राणीचें नांव लोकमहादेवी होतें. यानें राजमय्य, ढळग, ब्रिज्ज व अय्यप यांचा वध केला. राष्ट्रकूट ( पांचवा ) गोविंद याचा व भीमानेंच पराभव केला. ( २३ ) दुसरा अम्म; सहावा विजयादित्य ( ९४५ ते ९७० ), हा दुसरा भीम याचा धाकटा मुलगा होता. याचें दुसरें नांव सहावा विजयादित्य असें होतें. यावेळीं पांचव्या विजयादित्यापासून चालत आलेला गृहकलह थांबला. कामराज व नायमोबा यांची मुलगी ती याची राणी होय. हा ९४५ च्या दिसेंबरच्या पांचव्या तारखेला शुक्रवारीं गादीवर बसला. त्यावेळेला तो बारा वर्षांचा होता. ( २४ ) दानार्णव ( ९७०-९७३ ), हा दुसर्‍या अम्माचा वडील सावत्र भाऊ होता. याला घनार्णव असेंहि म्हणत. कांहीं लेखांत दानार्णव यानें तीस वर्षें ( ९७३-१००३ ) राज्य केलें असें आहे. परंतु पुष्कळ लेकांत यानें तीनच वर्षें राज्य केलें व बाकीचीं २७ वर्षें चोळ राजांच्या स्वार्‍यांच्या अंदाधुंदीत गेलीं व त्यावेळीं वेंगी देशावर कोणीहि राजा नव्हता असें आहे. तसेंच कांहीं लेखावरून असें अनुमान निघतें कीं, सदर अवधींत चोल राजांनीं हा मुलूख जिंकला असावा  ( २५ ) शक्तिवर्मा (१००३-१०१५ ), हा दानार्वणाचा सर्वांत वडील मुलगा होता. याला चालुक्यचंद्र असें म्हणत. अनुपलब्ध माहितीचीं ३० वर्षें संपल्यानंतर हा राज्यावर आला. ( २६ ) विमलादित्य. ( १०१५-१०२२ ), हा शक्तिवर्म्याचा धाकटा भाऊ. याच्या बायकोचें नांव कुंदवा महादेवी होतें. चोल राज राजराजा याची ही कन्या होती. विमलादित्यास विमलार्क असें दुसरें नांव होतें. ( २७ ) राजराज ( पहिला )-आठवा विष्णुंधन ( १०२२ १०६३ ), हा विमलादित्याचा मुलगा होता. कांहीं लेखांत यानें ४१ वर्षें राज्य केलें असें आहे तर कांहींत ४० वर्षें आहेत. याची राणी राजेन्द्र चोलाची कन्या होती. ही याची मामेबहीण असून तिचें नांव अम्मंगदेवी होतें. सातवा विजयादित्य ( राज प्रतिनिधी १०६३-१०७७ ) हा कुलोत्तुंग देव याचा चुलता होय ( पहिल्या राजराज याचा भाऊ ). हा आपल्या पुतण्याच्या हाताखालीं त्याचा प्रतिनिधी होता. ( २८ ) कुलोत्तुंग पहिला ( १०६३-१११२ ), हा पहिला राजराज याचा मुलगा होता व याला पहिला राजेन्द्रचोल असें म्हणत. यानें चोलांचें राज्य जिंकलें ( १०६३ ) व वेंगी प्रांतावर प्रतिनिधी नेमून आपण चोलाचें राज्य पाहूं लागला. याचा पहिला प्रतिनिधी सातवा विजयादित्य ( १०६३-१०७७ ), दुसरा प्रतिनिधि दुसरा राजराज ( १०७७-७८ ) व तिसरा वीरनाथ उर्फ वीरदेव ( १०७८ ते ११०७ ) होता. कुलोत्तुंगापासून वेंगीचें राज्य हा चोल देशाचा एक प्रांत झाला. कुलोत्तुंगाचा समकालीन पश्चिम चालुक्य राजा सहावा विक्रमादित्य होय. कुलोत्तुंगानें आपला मांडलिक कलिंग देशचा राजा याच्यावर खंडणी न दिल्यामुळें १०७१ मध्यें स्वारी केली होती. याची राजधानी यावेळीं गंगापुरी होती. विक्रमांकदेवचरित्र या काव्यावरून असें दिसतें कीं, चोल राज्यांतील अंत:कलहामुळें कुलोत्तुंग देव याला चोल राज्य बळकाविण्यास संधि मिळाली. ( २९ ) विक्रमदेव ( १०१२-११२७ ),  पहिला कुलोत्तुंगदेव याचा मुलगा. यानें १५ वर्षें राज्य केलें. आपल्या भावाप्रमाणें हाहि युवराज असतांना वेंगी देशाचा राजप्रतिनिधि असावा. व त्याचा हा काल वीरदेव यानंतरचा असावा. दुसरा राजराज ( वेंगी राजप्रतिनिधी १०७७-७८ ), पहिल्या कुलोत्तुंगदेवाचा हा दुसरा मुलगा. सातव्या विजयादित्यानंतर याला वेंगीवर पाठविण्यांत आलें. परंतु एक वर्षानें हा कंटाळून परत आला. वीरदेव उर्फ नववा विष्णुवर्धन वेंगीचा राजप्रतिनिधि ( १०७८-११०० ) हा पहिल्या कुलोत्तुंगाचा तिसरा मुलगा. ह्याचा प्रतिनिधीत्वाचा काल खात्रीलायक उपलब्ध नाहीं. याच्या राज्यकारभाराचें ठाणें जनन्नाथ नगरी होतें. ( ३० ) दुसरा कुलोत्तुंगदेव, हा विक्रमदेवाचा मुलगा होता. हा पूर्वचालुक्य वंशांतील शेवटचा पुरूष होय. हा ११२७ त गादीवर आला. यानें ११३२ मध्यें दिलेलें एक तम्रपत्र उपलब्ध आहे. याच्या वेळीं वारंगळचे गणपती राजे हे या सर्व चालुक्यांचा प्रदेश हळू हळू घशाखालीं उतरीत होते, शेवटीं त्यांनीं स. ११२८ ( डॉ. बर्नेलच्या मतें ) या सुमारास या चालुक्यांचें राज्य खालसा केलें असावें. पुडें हे राजे फार तर मांडलिक म्हणून असावेत.

[ संदर्भग्रंथ:-इंडियन अँटिक्वेरी, पु. ४, ५, ७, ८, १२, १३ व २०; हुल्ट्झ्-साऊथ इंडियन इन्स्किप्शन्स; माबेल डफ-इंडि. कॉनॉलजी; बाँबे गॅझे. पु. १. भा. २; एपि. इंडिका, पु. ६; सेनेल-डिनॅस्टीज ऑफ सदर्न इंडिया ].

पूर्व चालुक्य घराण्याची वंशावळ.

[ ही वंशावळ, इंडियन अँटिक्वेरीच्या तिसर्‍या पुस्तकांत ( पृ. १-१५; ९३-१०४; २६६-२८५ ) या घराण्याची जी माहिती आली आहे तिच्यावरून व सेवेलच्या ‘दक्षिण हिंदुस्थानांतील घराणीं’ या पुस्तकांत जी वंशावळ दिली आहे तिच्यावरून तयार केली आहे. हींत नांवांमागें दिलेला अंक गादीवर बसलेल्या राजांचा अनुक्रमांक होय]

 पूर्व चालुक्य घराण्याची वंशावळ.

प श्चि म चा लु क्य घ रा णें.- ब्रह्मदेवाच्या हातांतील चुल्लू ( अर्ध्या ) पासून चालुक्य घराणें उत्पन्न झालें अशी एक कथा आहे. या घराण्याचा मूळपुरूष जयसिंह पहिला हा होय. या घराण्याची पहिली राजधानी इंदुकांती ही होती. तेथून पहिल्या पुलकेशीनें ती वातापी ( वदामी ) येथें बदलली. जयसिंहास दोन पुत्र होते, वडील बुद्धवर्मा व धाकटा रणराग, पैकीं बुद्धवर्मा यास विजयराज ( विजयवर्मा ) नांवाचा पुत्र होता. हा इ. स. ५७२ च्या सुमारास हयात होता. याच्या वंशाची माहिती मिळत नाहीं. रणरागाचा पुत्र पुलकेशी ( अथवा पुलिकेशी ) असून त्यास वल्लभ अशी पदवी होती. हाच खरोखर या बदामीच्या पश्चिम चालुक्य घराण्याचा संस्थापक होय. याला सत्याश्रय, रणविक्रम असेंहि म्हणत. याच्या राणीचें नांव दुर्लभदेवी होतें.

पुलकेशी वल्लभानें कदंब वंशांतील एका शाखेची राजधानी वनवासी ही जिंकल्याबद्दल ऐहोळ येथील शिलालेखांत उल्लेख आहे. त्यानें बदामी ( वातापी ) सुद्धां काबीज केलें. याच शिलालेखांत कीर्तिवर्मा ( वातापी ) सुद्धां काबीज केलें. याच शिलालेखांत कीर्तिवर्मा ( पहिला ) याला नळ, मौर्य, कादम्ब यांची “काळरात्र” असें म्हटलें आहे. त्यानें कादम्बांचा पूर्ण पराजय केला असें म्हणतात. कीर्तिवर्मा ( पहिला ) हा पुलकेशीचा वडील पुत्र असून त्यास पृथ्वीवल्लभ म्हणत. ह्याची कारकीर्द इ. स. ५६७ ते ५९७ होती. यानें अंग, वंग, कलिंग, मगध, केरळ, मद्रक, गंग, मूषक वगैरे देशांवर स्वार्‍या केल्या. याच्या नंतर याचा धाकटा भाऊ मंगलीश गादीवर आला. यानें कच्छूरीस ( कलचुरीस ) जिंकल्याबद्दल त्याच शिलालेखांत उल्लेख आहे. त्यानें आपल्या मुलास ( सत्याश्रय इंद्रवर्म्यास ) गादी मिळवून देण्याचा प्रयत्‍न केला, त्यांत हा मारला गेला. यानें रेवती द्वीप, कोंकणचा कांहीं भाग हे प्रदेश व मातंग लोक, व चेट्टीचा शंकरगण याचा पुत्र बुद्ध इत्यादिकांस जिंकलें. यास मंगलीश्वर, मंगलराज, रणविक्रांत अशीं नांवें होतीं. यानें स. ५९७ ते ६१० पर्यंत राज्य केलें. याच्या मागून पहिला सत्याश्रय गादीवर बसला. या घराण्यांत सत्याश्रय ( पहिला ) हा फार बलिष्ठ राजा होऊन गेला. हा पहिल्या कीर्तिवर्म्याचा पुत्र असून त्यास वल्लभेंद्र, पृथ्वीवल्लभ किंवा दुसरा पुलकेशी म्हणत. हा या वंशांतील पहिला सार्वभौम राजा होय. याची कारकीर्द स. ६१०-६४२ पर्यंत होती. याच्या वंशजांस याचेंच नांव पुष्कळदां कवीनीं दिलेलें आहे. यानें कनोजचा राजा हर्षवर्धन यांस व उत्तरेकडील एका गोविंद नांवाच्या राजास जिंकलें ( हा बहुतेक कोणी राष्ट्रकूट वंशांतील राजा असावा असें फ्लीट याचें मत आहे ). पुष्कळशा शिलालेखांतून यानें कोंकणचे मौर्य, लाट, कदंब, मालव, गुर्जर इत्यादि राजांस जिंकल्याचा उल्लेख आहे. तसेंच यानें पिष्ठपुर ( पिठापुरम् ) व पुरी हस्तगत करून महाराष्ट्र व वेंगी देश काबीज केला. कलिंग व कोसल येथील राजे त्यास भीत असत. तसेंच त्यें चोल, पांड्य व केरळ लोकांवर स्वार्‍या केल्या; इत्यादि गोष्टी शिलालेखांतून आढळतात. म्हैसूरकर गंग व अलुप हे त्याचे दोस्त होते. एकंदरींत तो फार बलाढ्य असून त्यानें बराचसा मुलुख जिंकला असावा. नंतर यानें परमेश्वर बिरूद धारण केलें. पल्लव ( पहिला महेंद्र ) याचा यानें पराभव केला. ह्युएनत्संग हा याच्या राज्याबद्दल व राज्यांतील चालीरीति व वैभव यांच्याबद्दल फार सुरस वर्णन देतो. तो त्यास पुलोकिशे म्हणतो. फर्ग्युसन असें म्हणतो कीं या वेळीं इराणच्या गादीवर असलेला खुश्रु ( दुसरा ) व पुलकेशी दुसरा यांच्यामध्यें नजरनजराणे जात येत असत ( ६२५ ). एका शिलालेखांत सत्याश्रयास अंबेरा नांवाची मुलगी होती असा उल्लेख आहे. याच्याच धाकट्या भावानें ( कुब्जविष्णुवर्धनानें ) वेंगीस पूर्वचालुक्य घराणें स्थापना केलें. याचा वडील पुत्र आदित्यवर्मा यानें कृष्णतुंगा दुआबांत राज्य केलें होतें. दुसरा पुत्र चंद्रादित्य यानें सावंतवाडीस राज्य केलं. पुलकेशीचा धाकटा भाऊ जयसिंह यानें नाशिक येथें राज्य केलें व ध्रुवइंद्रवर्म्यानें रेवतीद्वीपास राज्य केलें. पुलकेशीच्यावेळीं रविकीर्ति नांवाचा जैन कवि होता. यानेंच पुलकेशीचा ऐहोळ शिलालेख लिहिला आहे. त्यांत तो आपल्याला कालिदास व भारवी यांच्या बरोबरीचा मानतो. सत्याश्रयानंतर पल्लव, पांड्य, चोल व केरळ यांनीं बंड केलें. त्यांत कांहीं काळंपर्यंत त्यांनां जय मिळाला. पण विक्रमादित्य ( पहिला ) यानें त्यांचा पराजय करून व कांची घेऊन आपल्या पूर्वजांची गादी मिळविली. हा दुसर्‍या पुलकेशीचा तिसरा पुत्र होय. यानें सन ६५५ ते ६८१ पर्यंत राज्य केलें. याला सत्याश्रयरण रसिक ही पदवी होती. सेन्द्रकांचा राजा याचा मांडलिक असल्याबद्दल एका शिलालेखांत उल्लेख आहे. याचा पुत्र युद्धमल्ल ( पहिला ) उर्फ विनयादित्य ( सत्याश्रय ) हा बापामागून गादीवर आला. यानें प्रचंड सैन्य घेऊन पल्लवांचें राज्य जिंकलें. विनयादित्य हा सर्व दक्षिण देशचा राजा असून यानें कळंभ्र ( कदंब? ), केरळ, हैहय, पल्लव, विळ, मालव, चोल, पाण्ड्य इत्यादि राजे जिंकल्याचा उल्लेख आढळतो. तसेंच कावेर, सिंहल व पारसीक या राजांनां मांडलिक बनविल्याचें तो सांगतो. कदाचित हें सर्व खरें नसलें तरी तो बलाढ्य राजा होऊन गेला एवढें खरें आहे. यानें इ. स. ६८१-६९६ पर्यंत सार्वभौम राज्य केलें.

विनयादित्याचा पुत्र विजयादित्य याची विशेष माहिती मिळत नाहीं. त्यावरून त्याची कारकीर्द ( ६९६-७३३ ) साधारण शांततेंतच गेली असावी. यानें पट्टदकल येथें एक शिवालय बांधलें. याचा वडील पुत्र विक्रमादित्य ( दुसरा ) हा आपण पल्लव राजास मारून कांचीमध्यें प्रवेश केला, असें म्हणतो व त्याप्रमाणें एका शिलालेखांत त्यानें कांची येथील राजास तीन वेळ जिंकलें असा उल्लेखहि आढळतो. यानें पांड्य, चोळ, केरळ व कदंब यांनां जिंकलें होते. याच्या म्हणण्याप्रमाणें यानें कांची येथील राजा नन्दिपोतवर्मा यास ठार मारून कांचींत प्रवेश केला होता. तेथें त्यास पूर्वींचा राजा नरसिंह पोतवर्मा यानें केलेलीं पुष्कळ कारागिरीचीं कामें आढळलीं, असें एके ठिकाणीं म्हटलें आहे. याच्या राणीचें नांव लोकमहादेवी असून आनें इ. स. ७३३ ते ७४७ पर्यंत राज्य केलें. नंतर याचा पुत्र कीर्तिवर्मा ( दुसरा ) हा गादीवर आला. यानें पल्लवांवर जय मिळविल्याचा उल्लेख आहे. पण लवकरच याच्या राज्यांत बंडाळी होऊन व बाजूच्या राष्ट्रकुटादि राजांनीं स्वारी करून त्याचें राज्य डबघाईस आणलें. यानें स. ७४७-७५७ पर्यंत राज्य केलें. विक्रमादित्य ( दुसरा ) गादीवर असतां राष्ट्रकूट, कलचुरी, यादव वगैरेंनीं या राज्यास पुष्कळ उपद्रव दिल्यामुळें यांची सत्ता अगदीं डळमळीत झाली होती. ती पुढें तैलप ( दुसरा ) यानें पुन्हां प्रस्थापित केली. या राजांबद्दल बिल्हणकृत विक्रमांकदेवचरित या काव्यांत पुष्कळ माहिती दिली आहे.

कीर्तिवर्म्याच्या मागून पहिला भीम, तिसरा कीर्तिमान, पहिला तैल, तिसरा विक्रमादित्य, दुसरा भीम, पहिला अय्यण व चवथा विक्रमादित्य हे गादीवर बसले. या विक्रमादित्याचा मुलगा तैल ( दुसरा ) यानें कक्कराष्ट्रकूटापासून पुन्हां आपलें राज्य मिळविल्यामुळें पश्चिम चालुक्य घराण्याची सत्ता साधारणत: दोन शतकांनीं पुन्हां प्रस्थापित झाली. यालाहि विक्रमादित्य पदवी होती व पहिला आहवमल्ल असेंहि यास म्हणत. याला कल्याणशाखेचा पहिला पुरूष असें फ्लीट म्हणतो व याची कारकीर्द इ. स. ९७३-९९७ अशी तो देतो. यानें माळव्याच्या मुंज राजाला ठार मारिलें यानें कक्कराष्ट्रकूटाची मुलगी जाकलदेवी इच्याशीं लग्न लाविलें. व कल्याण येथें पुन्हां आपलें राज्य स्थापिलें ( शके ८९६ श्रीमुखसंवत्सर ). यावेळीं याच्या हाताखालीं चेदी, चोल, हानगल, बेळगोळ, कुंतल वगैरे प्रांत होते. याचा पुत्र सत्याश्रय दुसरा व याची राणी अंबिकादेवी होय. यानें स. ९९७-१००८ पर्यंत राज्य केलें. याच्या मागून याचा पुतण्या विभुविक्रम ( विक्रमादित्य पांचवा उर्फ त्रिभुवनमल्ल पहिला ) यानें १००८-१०१८ पर्यंत राज्य केलें व त्याच्यामागून त्याचा भाऊ जगदेकमल्ल पहिला उर्फ जयसिंह ( तिसरा ) हा गादीवर आला. यानें माळवा ( भोजराज ), चेर ( राजेंद्र ) व चोल या राजांस जिंकल्याचा व सप्तकोंकण घेतल्याचा उल्लेख आढळतो. यानें १०१८-१०४२ पर्यंत राज्य केलें. याच्या बायकोचें नांव सुग्गलदेवी. याचा मुलगा सोमेश्वर ( पहिली )किंवा आहवमल्ल ( दुसरा ) उर्फ पहिला त्रैलोक्यमल्ल. यानें चोल राजाचा एकदां पराभव केला, तेव्हां चोल राजा कुलोत्तुंग ( पहिला ) यानें याच्यावर स्वारी करून याचाहि पराभव केला.

बिल्हण म्हणतो कीं, सोमेश्वर यानें दोन वेळां चोल राजाचा पराभव केला. यानें भोजाचा पराभव करून धार घेतलें. याच कारकीर्दींत कदम्ब वगैरे लोकांनीं स्वतंत्र होण्याचा उपक्रम सुरू केला. बिल्हणानें याच्या पराक्रमाचें फार वर्णन केलें आहे. त्यानें कांची, गौड, बंगाल, कामरूप वगैरे देशांवर स्वार्‍या केल्या व कल्याण ही राजधानी केली. मैळालदेवी  ( त्याची राणी ) ही बनवासी प्रांतावर सन १०५० च्या सुमारास राज्य करीत होती व दुसरी राणी केतलदेवी ही १०५४ त पोन्नवाड जिल्ह्यावर राज्य करीत होती. यानें बच्चलदेवी, चन्दलकब्बे ( चन्द्रिकादेवी ) व मैळालदेवी व केतलदेवी या चार राण्या केल्या होत्या. हा इ. स. १०४२ ते १०६८ पर्यंत राज्यावर होता. याच्या मागून याचा पुत्र सोमेश्वर ( दुसरा ) हा राजा झाला. यानें कादम्ब, अलुप व चोल यांवर वचक बसविला. यास सोयीदेव उर्फ भुवनैकमल्ल असें म्हणत. याची राणी चोलकन्या होती. यानेंच चोल राजास गादीवर बसण्यास मदत केली होती. याची कारकीर्द . १०६९ ते १०७६ पर्यंत होती. नंतर याचा भाऊ विक्रमादित्य ( सहावा ) राजा झाला. यानें कदंबांचा कांहीं मुलूख घेतला. यास परमादिकलि विक्रम उर्फ दुसरा त्रिभुवनमल्ल विक्रमांक म्हणत. यानें १०७६ ते ११२६ पर्यंत राज्य केलें. यानें ( चालुक्य ) विक्रमशक फाल्गुन शुद्ध पंचमी शके ९९७ ( तारीख १४ फेब्रु. इ. स. १०७६ ) रोजीं चालू केला. यानें आपली मुलगी मैळलदेवी ही जयकेशी कदम्ब राजास देऊन आपण चोल राजकन्येशीं विवाह केला. यानें राज्यारोहण केल्यावर लगेच वरील आपला शक सुरू केला. पण त्याच्या मृत्यूनंतर तो नाहींसा झाला. यानें पुष्कळ लढाया मारल्या. याला आपल्या राज्याकरितां शत्रूंप्रमाणें आपल्या भाऊबंदाबरोबरहि नेहमीं युद्ध करावें लागलें. द्रविड, पांड्य, कोंकण होयसळ या राजांचा यानें पराभव केला. याची राणी मलयमतीदेवी ही केरेयूर प्रांतावर १०९५ च्या सुमारास राज्य करीत होती व दुसरी राणी लक्ष्मीदेवी ही धर्मपुरास राज्य करीत होती. हा फार बलाढ्य असून पुष्कळशा शिलालेखांवरून याच्या राज्याचा विस्तार अजमावतां येतो. याच्या नंतरच्या राजांनीं विशेष कांहीं केलें नाहीं. त्यांच्या सत्तेस येथून उतरती कळा लागली. या विक्रमादित्याचा मुलगा सोमेश्वर ( तिसरा ) हा त्याच्या नंतर गादीवर आला. यानें बिज्जल व कलचुरि यांनीं डळमळित केलेली चालुक्यसत्ता तात्पुरती पुन्हां प्रस्थापित केली. यानें आंध्र, द्रविड, मगध, नेपाळ येथील राजांवर स्वारी केली व मानसोल्लास ( अभिलषितार्थ चिंतामणी ) ग्रंथ रचिला ( ११२७ ). पुढें कालचुरी व गणपति या घराण्यांची वाढती सत्ता व म्हैसूरच्या होयसळ बल्लाळ राजाचा उदय यामुळें या चालुक्य सत्तेस यावेळीं ग्रहण लागलें.

सोमेश्वरास भूलोकमल्ल असें म्हणत. यानें ११२६-११३८ पर्यंत राज्य केलें. नंतर त्याचा पुत्र जगदेकमल्ल ( ११३८-५० ) व त्याचा भाऊ तिसरा तैल ( तिसरा त्रैलोक्यमल्ल ) यानें ( ११५०-६२ ) राज्य केलें. याचा सेनापति बिज्जण ( बिज्जल ) कलचुरी यानें याला ११५७ पर्यंत कैदेंत ठेविलें. होतें. हा केव्हां मेला तें समजत नाहीं. स. ११६३ च्या पूर्वीं बहुधां तो मेला असावा. त्यानें कल्याण सोडून अण्णेगिरी ही राजधानी केली व ११६२ त सार्वभौम सत्ता स्थापिली. याचा पराभव काकतीय प्रोल राजानें केला होता. पुढें याचा पुत्र सोमेश्वर चवथा ( त्रिभुवनमल्ल तिसरा, वीर सोमेश्वर ) यानें ११६३ ते ११८९ पर्यंत राज्य केलें. याच्या वेळीं हें पश्चिम चालुक्य घराणें नामशेष झालें. हा या घराण्याचा शेवटचा राजा होय. याच्या उत्तरेकडील राज्यांत वर्‍हाड व माळवा हीं सुद्धां येत असत. हे निरनिराळ्या प्रांतांवर आपले राजपुत्र, राण्या व इतर नातलग यांनां राजप्रतिनिधी नेमीत असत. अशा प्रतिनिधींचीं नांवें निरनिराळ्या शिलालेखांतून, व ताम्रपटांतून पुष्कळ आलीं आहेत. शेवटीं यांच्या उत्तरेकडील राज्य देवगिरीचे यादव व दक्षिणेकडील राज्य द्वारसमुद्राचे होयसल यांनीं जिंकून घेतलें.

(संदर्भग्रथ : इंडियत अॅंटिक्वेरी पु. ४,५,६,७,८,१० २१ व ३९ फ्लीट-डिनॅस्टीज ऑफ दि कॅनरीज डिस्ट्रिक्टस् राईस - इन्स्किप्शन्स; बॉम्बे ग्याझे पु. १. भा. २; मावेल डफ- इंडियन कॅनॉलॉजी; जर्नल रा. ए. सोसायटी पु. ४.११; अमरावती डिस्ट्रिक्ट ग्याझे; सेवेल - डिनॅस्टीज ऑफ सदर्न इंडिया )

पश्चिम चालुक्य घराण्याची वंशावळ
( शिलालेख, ताम्रपट व फ्लीट ( दक्षिण हिंदुस्थानांतील घराणी ) यांनी उद्धत केलेल्या वंशावळीवरुन ही वंशावळ तयार केली आहे )

पश्चिम चालुक्य घराण्याची वंशावळ

कन्नड कवीपैकी रन्न नांवाचा एक प्रख्यात कवि, पश्चिम चालुक्य दुसरा तैल याच्या पदरी होता. यानें स. ९८२ व स. ९९३ मध्यें गदायुद्ध व अजित पुराण दे ग्रंथ रचिले. हा जैनमर्धी वैश्य जातीचा होता. याने या चालुक्य घराण्याची जी वंशावळ दिली आहे तींत व वर दिलेल्या वैशावळीत थोडासा फरक पडतो. याने दिलेली वंशावळ अशी: (इंडि. अॅंटि. पु. ३९)

चालुक्य घराण्याची जी वंशावळ

पश्चिम चालुक्यशक : पश्चिम चालुक्य राजा साहवा विक्रमादित्य यान शालिवाहनशकाऐवजीं आपला एक शक प्रचारांत आणला. याला त्याच्या नावावरुन चालुक्यविक्रमकाल व चालुक्यविक्रमवर्ष म्हणत असत. या शकाचें पहिलें वर्ष म्हणजे त्याच्या कारकीर्दीचे ( राज्यरोहणाचें) पहिलें वर्ष होय. अनल अथवा नल संवत्सर, शालिवाहन शक ९९७ म्हणजे इ. स. १०७५-७६ होय. पंरतु मागें दर्शविल्याप्रमाणे हा शक फाल्गुन शुद्ध पंचमी शालीवाहन श. ९९७ ( तारीख १४ फेब्रुवारी इसवी स. १०७६ ) रोजी सुरु झाला असें दिसतें. ही तारीख माबेल डफनें शिलालेखाच्या आधारे दिली आहे. इलियटन यानें हिरेमुद्दनूर. कुर्तकोटी, अरलेश्वर, लक्ष्मेश्वर, नरेगळ वगैरे ठिकाणच्या शिलालेखांवरुन या शकाच्या आरंभाचे ( १०७५ इसवी सनाचें ) वर्ष दिलें आहे. परंतु हें वर्ष याप्रमाणे एक येत नसून निरनिराळे येतें. मात्र त्यात फारसा फरक न येतां एखाद्या वर्षाचेंच अंतर येतें. ( इंडि अॅंटि. पु. २२ )

लाट देशाचें चालुक्य घराणें - या घराण्याची स्थापना बारप्प यानें इ.स. ९७५ च्या सुमारास केली. हा अनहिलवाडच्या चालुक्य घराण्याचा मूळपुरुष मूलराज ( सोळंखी ) याचा नातेवाईक असावा. फोर्बस म्हणतो की हा पश्चिम चालुक्य दुसरा तैलप याचा सेनापति होता; परंतु संस्कृत संकीर्तनांत याला कान्यकुब्ज येथील राजाचा सेनापति म्हटलें आहे; यानें राष्ट्रकूटाशीं सोयरीक केली होती. याने मूळराज ( सोळंखी ) याच्यावर स्वारी करुन त्याचा पराभव केला. तेव्हां मुळराज हा कंथकोटकडे पळून गेला. परंतु कांही दिवसांनी त्यानें मोठ्या सैन्यांनशी बारप्पावर स्वारी केली. या लढाईंत बारप्प हा ठार झाला. त्याच्या नंतर गोंगीराज, कीर्तिराज, वत्सराज व त्रिलोचनपाल हे राजे लाट देशावर राज्य करीत होते. त्रिलोचनपाल इ. स. १०५१ तह्यात होता ( माबेल डफ; रासमाला).

पिठापुरम्चें चालुक्य घराणें. - मद्रास इलाख्यांतील पिठापुरम् येथें एक चालुक्य घराणें नांदत होतें. हे स्वत:ला वेंगीच्या पूर्वचालुक्यांतील पहिला विजयादित्य बेट्ट याचे वंशज मानीत असत. यांचा पहिला राजा विजयादित्य नांवाचा होता. या वंशात मल्लपदेव नावाचा एक शूर राजा इ.स. १२०२ मध्ये होऊन गेला. ( माबेल डफ)

गुजराथेंतील तीन चालुक्य घराणी - फ्लीटच्या मतें गुजराथेंत चालुक्यांच्या तीन शाखा राज्य करीत होत्या पहिलींत ( जयसिंह, त्याचा पुत्र ) बुद्धवर्मा व (नातु) विजयराज हे झाले. पहिल्या कीर्तिवर्म्याचा पुत्र जयसिंह धराश्रय यानें दुसरी शाखा स्थानप केली. त्याचा पुत्र नागवर्धन नांवाचा होता. तिस-या शाखेचा मूळपुरुष जयसिंह धाराश्रय दुसरा हा होय. हा दुस-या पुलकेशीचा मुलगा होता. यांच्या वंशावळी मुख्य वंशावळींतील (पश्चिम चालुक्यांची वंशावळ) मूळ पुरुष जो पहिला जयसिंह त्याच्यापासून खाली देतों.

 गुजराथेंतील तीन चालुक्य घराणी

तिसर्‍या घराण्यांतील शिलादित्य धराश्रय हा इ. स. ६७१ मध्यें आपल्या बापाच्या राजवटींत युवराज असून एका प्रांताचा सुभेदार होता. याच्याच वंशांत मंगलराज हा राजा स. ७०० च्या सुमारास झाला. त्याच्यानंतर त्याचा धाकटा भाऊ जनाश्रय पुलकेशीवल्लभ हा गादीवर बसला. ताजीक ( अरब ) या लोकांनीं या सुमारास सिंध, काठेवाड वगैरे देशांत स्वार्‍या केल्या होत्या. त्यानंतर ते नवसरी ( गुजराथ ) वर स्वारी करून गेले; त्यावेळीं या पुलकेशीनें त्यांचा पराभव करून त्यांनां हांकलून लाविलें ( ७३९ ). [ माबेल डफ; रासमाला ]

अ न हि ल वा ड चे चा लु क्य उ र्फ सो ळं खी घ रा णें.- या घराण्याचा मूळपुरूष मूळराज म्हणून होता. या चालुक्य घराण्यास सोळंखी असेंहि म्हणतात. मूळराज हा कल्याणच्या एका चालुक्यराजाचा पुत्र होता. यानें गुजराथ इ. स. ९४१ त जिंकलें व अनहिलवाडच्या चावडा घराण्याचा पाडाव करून तेथें आपली गादी स्थापिली. यानें अनेक युद्धें करून सभोंवतालच्या राजांस मांडलिक बनविलें. हा ९९६ त वारला. त्याच्यानंतर त्याच मुलगा चामुंड हा राजा झाला ( चामुंड पहा ). त्यानें राज्यत्याग केल्यानंतर त्याचा वडील पुत्र वल्लभसेन व नातु भीमदेव यांनीं गिझनीकर महंमूद याचा लढाईंत पराभव केला व तीन हजार मसुलमन कापून काढिले. तेव्हां महंमूद सोमनाथ लुटून परत जात असतां त्यानें अनहिलवाड्यावर स्वारी केली व भीमदेवाचा पराभव केला आणि त्याचा चुलता दुर्लभराय यास गादीवर बसविलें. चामुंडाचा वडील पुत्र वल्लभसेन यानें सारें सहाच महिनें राज्य केलें. त्यानें माळव्यावर स्वारी केली होती. त्याच्यामागून त्याचा धाकटा भाऊ दुर्लभसेन यानें ( १००९ ते १०२२ ) राज्य केलें. यानें लाटदेशावर स्वारी केली होती. हा साधुवृत्तीनें राहत असे. याच्यामागून याचा पुतण्या भीमदेव पहिला, हा राजा झाला. हा फार पराक्रमी होता. यानें चेदिराज कर्ण यास माळव्याच्या भोजराजाच्या विरूद्ध मदत केली होती. या स्वारींत भोजराज मेला असें म्हणतात. याची राणी उदयमती. हिनें अनहिलवाडास ‘राणीनी बाव’ ( राणीची विहीर ) बांधविली ( १०४५ ). यानें १०६३ पर्यंत राज्य केलें. यानें अबूच्या पहाडावरील प्रख्यात जैनमंदिरें, व पालिठाणा व चंदावती येथील देवालयें बांधिलीं. अजमीरच्या वीसलदेवानें याच्यावर स्वारी करून याच पराभव केला व वीसलनगर ( वीसनगर ) स्थापिलें. पुढें भीमदेवानें आपल्या कर्ण ( पहिला ) नांवाच्या पुत्राच्या स्वाधीन राज्य करून आपण वानप्रस्थाश्रम स्वीकारला. पहिल्या कर्णानें १०६३ ते १०९३ पर्यंत राज्य केलें. याची राणी मयाणल्लदेवी ( मैनलदेवी ) ही जयकेशी कदंबाची मुलगी होय. कर्णानें हल्लीं जेथें अहमदाबाद शहर आहे तेथें कर्णावती नांवाचें शहर स्थापिलें ( १०७० ); यानें शांततेनें राज्य केलें व लोकोपयोगी अनेक कृत्यें केलीं, व कर्णसागर नांवाचा एक तलाव बांधलां. मैनलदेवीचा मुलगा प्रसिद्ध सिद्धराज जयसिंह होय. यानें कर्णानंतर १०९३-११४३ पर्यंत राज्य केलें. यानें मालवराज यशोवर्मा यास जिंकून अवंतीचें राज्य घेतलें व बर्बरक नांवाच्या एका अनार्य राजालाहि जिंकलें. याच्या पदरीं श्रीपाल नांवाचा एक कवि होता; त्यानें वैरोचनपराजय नांवाचें काव्य केलें होतें. सिद्धराजाच्या लहानपणीं त्याची आई मैनलदेवी ही कारभार पाहत असे. जयसिंहानें हुशारीनें राज्य करून अनेक तलाव व इमारती बांधल्या. सौराष्ट्रदेश यानें जिंकला होता. याचवेळीं जैनधर्माचा प्रसार याच्या राज्यांत विशेष होता. हेमचंद्र नांवाचा एक विद्वान जैन याच्या पदरीं होता. त्यानें ह्याश्रय नांवाचें काव्य केलें आहे. त्यांत गुजराथचा बराच इतिहास येतो. जयसिंह अनेक गुणांनीं संपन्न असूनहि स्त्रीलंपट होता; तरीहि त्यास गुजराथदेशाचें भूषण व चालुक्यवंशदीप असें फोर्बसनें म्हटलें आहे. तो स्वत:विद्वान व विद्वानांचा पोशिंदा होता. त्याचा राज्याचा विस्तार मोठा होता. हा निपुत्रिक वारल्यानें याच्या मागून क्षेमराजाचा नातु कुमारपाल हा गादीवर बसला. या कामीं त्याला प्रधान कान्हरदेव व अनेक जैनधर्मी साधू व लोक यांची मदत होती. त्यामुळें पुढें त्यानें जैनधर्माला फार मदत केली ( ज्त्रा. को. विभाग. ११ वा. कुमारपाल पहा ). याच्या मागून याचा पुतण्या अजयपाल हा राजा झाला ( ११७४-११७६ ); याच्या बापाचें नांव महीपाल.  हा शैवपंथी असल्यानें यानें जैनांच्या विरूद्ध वागणूक ठेविली, तेव्हां त्यांनीं याचा खून केला. त्याच्या पश्चात् त्याचा वडील पुत्र दुसरा मूलराज हा गादीवर आला. यानें दोन वर्षेंच ( ११७६-७८ ) राज्य केलें. तो अज्त्रात असल्यानें त्याची आई नैकीदेवी ही कारभार पाही. हा मेल्यावर त्याचा धाकटा भाऊ दुसरा भीमदेव हा राजा झाला ( ११७८-१२४१ ). याला भोळा असें उपपद होतें. याची माहिती चंदभाटाच्या रासाग्रंथांत बरीच आढळते. हा फार शूर होता; याचें सैन्यहि फार होतें. याचीं जहाजें सिंधदेशापर्यंत वावरत असत. अमरकोशकार अमरसिंह हा याच्या पदरीं होता. याचें व पृथ्वीराज चव्हाणाचें हाडवैर माजल्यानें मुसुलमानांची धाड हिंदुस्थानावर कायमची आली. यांचें भांडण तोडण्याचा प्रयत्‍न झाला पण तो फसला. अबूचा राजा जैत परमार यांच्या इच्छिनीकुमारी या मुलीला या दोघांनीं मागणी घातली व त्यामुळें यांच्यांत कलह पेटून पृथ्वीराजानें भीमाचा पराभव केला. 
पण ही संधि साधून शहाबउद्दीनानें पृथ्वीराजावर स्वार्‍या करून शेवटीं त्यास पकडून नेलें. कुत्बुद्दीन ऐबक यानें गुजराथवर स्वारी केली होती. पण भीमानें त्याला धुडकावून दिलें. याच्या व मालवराज सुभटवर्मा व अर्जुनदेव यांच्या लढाया झाल्या होत्या. याच्या कारकीर्दीच्या अखेरीस वाघेल लोकांच्या सरदारांनीं याच्या राज्याचे बरेचसे प्रांत काबीज केले. हा सन १२४१ त मेला. याच्यानंतर याचा पुत्र त्रिभुवनपाल हा राजा झाला. यानें दोन वर्षें राज्य केलें. हा दुर्बल असल्यानें वीसलदेव वाघेलानें याचें राज्य १२४३ मध्यें घेतलें. याप्रमाणें या चालुक्य घराण्याचा यावेळीं शेवट झाला. [कीर्तिकौमुदी; सुकृतसंकीर्तन; वडनगर प्रशस्ति; व्द्याश्रय; रासमाला; पृथ्वीराजरासा;  माबेल डफ.]

धोलकाचें (वाघेल) चालुक्य घराणें — या घराण्यानें  इ. स. १२१९ पासून १३०४ पर्यंत गुजराथेंत राज्य केलें. अनहिलवाडचा राजा कुमारपाल याचा मावसभाऊ अरूणराज म्हणून होता. कुमारपालानें त्यास बाघेल वगैरे कित्येक गांवांचीं जहागीर दिली होती. म्हणून या घराण्यास (व्याघ्र पल्लीय)  वाघेल म्हणत. अरूणाचा मुलगा लवणप्रसाद यानें दुसर्‍या भीमदेवाच्या वेळीं स्वपराक्रमावर बराच प्रांत लूटालुट करून मिळविला. हा भीमाचा प्रधानहि झाला होता. वाघेल व धोलका हे परगणे त्यांच्या ताब्यांत होते. यानें स. १२१९ मध्यें धोलका येथें आपलें राज्य स्थपिलें व वस्तुपाल आणि तेजपाल या जैनधर्मीय भावांनां आपले प्रधान केले. लवणाचा पुत्र वीरधवल हा फार शूर व धाडसी होता. यानें देवगिरीकर यादव व उत्तरेकडील रजपूत राजे यांचा पराभव केला होता. मुसलमानांचेहि यानें कांहीं चालू दिलें नाहीं. हा न्यायी, कर्तबगार, दयाळू, व धर्मनिष्ठ होता. त्यानें प्रजेस फार सुख दिलें. हा सन १२३५ मध्ये मेला. तेव्हां त्याच्या चितेवर त्याच्या १८० सेवकांनीं अग्निकाष्टें भक्षण करून जीव दिला असे सांगतात. वस्तुपाल व तेजपाल यांनीं अनेक देवळें व वाडे बांधिले. वस्तुपाल विद्वान व कल्पक होता. गिरनार पर्वतावर यानें बांधलेल्या अनेक इमारती आहेत. वीरधवलानंतर त्याचा वडील पुत्र वीरम हा गादीवर बसत असतां त्यास अडथळा करून वस्तुपालाच्या मदतीनें त्याचा धाकटा भाऊ वीसलदेव हा राजा झाला. तेव्हां वीरम हा आपला सासरा जबालीपूरचा उदयसिंह याच्याकडे पळून गेला;  परंतु वस्तुपालानें त्याचा खून करविला. वीरमनें वीरमगांव स्थापिलें. वस्तुपाल पुढें लवकरच मेला (१२४१).  मेरूतुंग म्हणतो वीसलदेव हा १२३५त गादीवर न येतां १२४३त आला. यांस विश्वमल असें उपपद होतें. यानें अन्हिलवाडच्या त्रिभुवनपालास पदच्युत करून तें ठिकाण आपली राजधानी केले (१२४३). यांवरून धोलकाच्या गादीवर १२३५त व अनहिलवाडच्या गादीवर १२४३त हा बसला असें ठरतें व मेरूतुंगाचें म्हणणेंहि खरें ठरतें.  यानें देवगिरीकर दुसरा सिंघण, मालवराज पूर्णमल्ल व मेवाडराज गुहिल यांचा पराभव केला. कर्नाटकची राजकन्या याची राणी होती. यानें १२६३ पर्यंत राज्य केलें. याच्या मागून वीरमचा मुलगा अर्जुनदेव यानें (१२६३-७५) राज्य केलें. हा शैव होता. याचा वेरावळ येथें एक शिलालेख आहे. याच्या पश्चात् याचा पुत्र सारंगदेव हा राजा झाला. त्यानें १२७५-१२९६ पर्यंत राज्य केलें.  याच्या कारकीर्दीत काव्यप्रकाशावरील जयंतीटीकाकार जयंत हा होऊन गेला (१२९३). त्याच्यामागून त्याचा पुत्र कर्णदेव गादीवर आला. यानें १२९६ ते १३०४ पर्यंत राज्य केलें. याचें राज्य अल्लाउद्दीन खिलजीनें घेतलें व या (वाघेल) चालुक्य घराण्याचा येथें शेवट झाला. (कर्णाची माहिती, करणवाघेला ज्त्रा. को. विभाग दहावा, याठिकाणी पहा). [रासमाला; मॉबेल डफ; वडनगर प्रशस्ती; मुसुलमानी रियासत.]

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...