विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 24 March 2019

#स्वराज्याचे_वैभव #होळीचा_माळ


#स्वराज्याचे_वैभव
#होळीचा_माळ
रायगडाच्या प्रभावळीतून लोक रायगडाकडे येत होते. सणाचा दिवस तो. होळीचा माळ अगदी गच्च भरून जाणार होता. जसजशी संध्याकाळ होत होती होळीच्या माळावर लगबग वाढत होती. कोण होळीची लाकडं जमा करत होत. कोण महाराजांच्या, आऊसाहेबांच्या आसनची व्यवस्था बघतंय. काही हवशे नवशे आपलं कर्तृत्व दाखवायला जमले होते. कोणी महाराजांचं रुपडं एकवार बघायला मिळेल म्हणून लांबून आले होते. गर्दी वाढतच होती. सणाचा दिवस असूनही पहारा करडा होता. त्यात तसूभरही कमी नव्हती. मावळतीकडे सूर्य कलत होता. आणि इथे होळीची सगळी सिद्धता होत होती. एक लांबलचक लाकूड मध्ये उभं करून त्या भोवती बाकी लहान लाकडं उभी केली होती. आणि त्यावर सुका पाला टाकला होता. ओलं लाकूड तोडू नका, सुखीच लाकडं घ्या हा स्वामींचा आदेश होता. त्यानुसार सगळी जय्यत तयारी झाली होती. मल्ल, तरवारबाज, पट्टेकरी, माशालवाले, सोंगाडे अगदी सर्व आपापल्या जागा घेऊन होते.
संध्याकाळी तर गर्दी थांबता थांबेना, त्या गर्दीला आवरता आवरता गडकऱ्यांचे नाकीनऊ आले. तरीही कोणी अदब सोडत नव्हते, हमरीतुमरीवर येत नव्हते. जमलेल्या प्रत्येकाल रायगडाची शान ठाऊक होती. हलगी वाजू लागली होती. वाढती गर्दी बघून वाजवणारा सुद्धा जोशात होता. त्यावर लहान पोर धुरळा उडवत नाचत होती. अचानक हलगी च्या आवाजाने आभाळ गाठलं. नागरखान्यात चौघडे वाजू लागले. आणि सगळ्या मावळ्यांच्या नजरा राजदरबाराच्या दिशेने वळल्या, शुभ्र सफेद रंगाचा पेहराव केलेले महाराज साहेब, कमरेला लटकलेली भवानी, भगवा जिरेटोप, कपाळी चंद्रकोर, आणि चेहऱ्यावर विलक्षण भाव आणि सोबतीला नारंगी रंगाचा पेहराव केलेले गोमटे युवराज शंभूराजे संथ पावलांनी होळीच्या माळावर येत होते. महाराजांच्या प्रत्येक पावलावर मुजरे झडत होते. त्या प्रत्येकाचा स्विकार करत स्वामी माळावर आले. व्यवस्था काय केलीय ह्यावर त्यांनी नजर फिरवली, आणि समाधानी होत आसनग्रहण केले. त्याचा बाजूलाच युवराज मांडी घालून बसले. लगोलग आऊसाहेब आल्या. त्यांची तेजस्वी मुद्रा बघून अस्ताला जाणारा सूर्य सुद्धा शरमून गेला असेल. त्यांच्यासाठी महाराजांच्या बाजूंचे आसन होते. बाकी राणीवसा चिकाच्या पडद्याआड बसून खेळ सुरू होण्याची वाट बघत होते. महाराज आसनावर बसल्यावर पुनः एकदा सर्वांनी लवुन मुजरे झाले. त्या सगळ्याचा हात उंचावून महाराजांनी स्वीकार केला. कार्यक्रमाला आता सुरवातच होणार होती. ह्याची सुरवात करणार होते वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले शाहीर. संबळ वाजवीत दिमाख्यात पोवाड्याची कवणे कानावर येऊ लागली. श्रोते मंत्रमुग्ध होऊ लागले. हलगी बेफाम वाजतच होती. एक एक शब्द कानावर येताच प्रत्येकाचे डोळे अगदी विस्फारत होते. स्वराज्याचे कार्य हेच देवाचे कार्य हे शाहीर सांगत होते. अगदी जशी हवी तशीच सुरवात झाली होती. आता समोर होता तो कुस्तीचा आखाडा. मल्लाच्या जोरानीं अक्खा माळ घुमून गेला. एकमेकांना अस्मान दाखवण्यासाठी कुस्तीगीर अगदी दातओठ खात होते. पण मागे कोणी हटेना. महाराजांनी धाकल्या धन्याला म्हंटल, काय युवराज कसं वाटतंय. शंभूराजे विस्फारून म्हणाले "असं वाटतं आताच उठावे आणि दोन डावात समोरच्या पठयाला चित करावं". ह्यावर महाराजांनी सुद्धा मनमोकळं हसून दाद दिली. तेवढ्यात विजेच्या चपळाईने डाव टाकत एका मावळ्याने कुस्ती जिंकली. महाराजांनी जवळ बोलावत त्याला स्वतःच्या हाताने पागोटे बांधले. अवघा कुस्तीचा फड तिथेच राजांनी जिंकला.
ह्यानंतर तरवारबाजानी आपली कला सादर केली. व्यवस्थित पावित्रे घेत एकमेकांवर वार करत तर समोरचा आपल्या ढालीने ते चुकवी. तरवरीचे सपासप वार काढत तरवारबाज लढत होते पण त्यांना बघून हात मात्र मावळ्यांचे सळसळत होते. सर्वात शेवटी नाईकांच्या पथकातील सोंगाड्यानी धमाल उडवून दिली. कोणी टोपीकर झाला होता. तर कोणी साधू. कोणी लाल बावट्यावाला इंग्रज तर कोणी मधूकरी मागणार गोसावी. कोण काय बनलंय कोणाच्याही कोणाला थांगपत्ता लागत नव्हता.
शेवटी ज्या साठी सगळे एकत्र आले तो कार्यक्रम सुरू झाला. आऊसाहेब आणि राणीवस्याने पूजा करून घेतली. लागोपाठ महाराजानीं होळीला नमन केलं. इतर सुहासिनीं नि पूजा करून मग होळी पेटवण्यात आली. हाहा म्हणता होळीने पेट घेतला सुद्धा. लालसर लाटा हवेत जात वातावरण अगदी गरम झालं. होळीला मनाची श्रीफळ अर्पण करण्यात आली. आता खरी गंमत होती. मानाचा नारळ कोण काढत ह्याची. दणकट काळजाचे काही मावळे पुढे आले. काहींचा त्या प्रचंड दाहापूठे निभाव लागेना. ते मागे फिरले. तर काही बंदुकीच्या गोळीप्रमाणे शिरले आणि आगीतून नारळ घेऊन आले. सगळ्या मैदानातुन एकच गलका झाला. ऐशा भले, ओ शाबास ओरडू लागले. स्वतः महाराज खुश होऊन उभे राहिले. महाराजांनी स्वतः सगळ्यांना सोन्याचं कडे घातलं. आऊसाहेब काही लागलं नाही ना विचारपूस करू लागल्या. त्यावर एक वीर उतरला, "नाही जी, महाराजांच्या हातून शाबासकी मिळावी ह्याची तर लय वाट बघितली म्या". त्या धगधगत्या होळीला नमन करून सर्व संकटाचा सामना करता यावा ह्याची प्रार्थना करून सगळे परतू लागले खरे पण सर्वांच्या डोक्यात आजची संध्याकाळच होती.
आजवर अशी अनेक सुख दुःख ह्या होळीच्या माळाने बघितली. मराठ्यांच्या पराक्रमाच्या गाथा येथे कोरल्या गेल्यात. आजही ३८८ वर्षानंतर त्याच होळीच्या माळावर लोक लांबून जमतात, गडकरी लाकडं जमा करून होळी उभी करतात. बोंब मारली जाते. आणि ह्याच शिवभूपतींना साक्षी ठेवून ही होळी साजरी केली जाते. सद्या हे स्वरूप अगदी साधं जरी असेल तरी इतके वर्ष परंपरा जपणं आणि पुढेही चालू ठेवणं म्हणजे दुर्लभ. ही इथे होळी पेटवली जाते ती छत्रपतींची सेवा म्हणूनच. आणि अशी सेवा प्रत्येकाच्या आयुष्यात येवो.
✍️स्वराज्याचे वैभव.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...