हैदरअली आणि मराठा वीरांची लढाई
भाग 3
पुढें बारभाईच्या कारस्थानाचें वर्तमान ऐकून पुण्यास परत जातांना राघोबानें कल्याणदुर्ग येथें याशीं तह केला व त्यांत यानें दरसाल ६ लक्ष रुपयें राघोबास खंडणी म्हणून देण्याचें मंजूर केलें (१७७४). राघोबा उत्तरेकडे गेल्यावर पेशव्यांच्या गृहकलहाचा फायदा घेऊन, हैदरानें शिरें गुर्रमकोंडा काबीज केला, व तुंगभद्रेच्या दक्षिणेकडील मुलूख आपल्या ताब्यांत घेतला (१७७४). इ. स. १७७६ मध्यें यानें बल्लारी व गुत्ती विश्वासघातानें काबीज केली व मुराररावास रोगट हवेच्या एका डोंगरी किल्ल्यावर कैदेंत टाकलें. राघोबा पुणें दरबाराशीं झगडण्यांत गुंतला असतां यानें त्यास मदत म्हणून २४००० होन पाठविलें होते. राघोबानें सांगितल्यावरून कृष्णेच्या दक्षिणेकडील मराठयांचा सर्व मुलूख आपण कबजात घेणार आहों असें डोंग करनू १७७५ सालच्या पावसाळ्यास आरंभ होण्यापूर्वी त्यानें साबनूरच्या नबाबाच्या सरहद्दीपर्यंत सर्व मुलूख जिंकून घेतला. पुणें दरबारनें याजवर कोन्हेरराव व पांडुरंगपंत पटवर्धन याची रवानगी केली होती. परंतु त्याचा पराभव होऊन पाडुरंगपंत हैदराच्या हाती सापडला. यावेळी हैदराकडे राघोबाच्या वतीनें बाजीपंत बर्वे लढत होता. पावसाळा संपल्यावर पुण्याहून परशुरामभाऊ पटवर्धन याची याजवर रवानगी झाली. परंतु हैदरानें परशुरामभाऊच्या बरोबर आलेला निजाबाचा सरदार जो घौशा त्यास लाच दिल्यामुळें परशुरामभाऊ न लढतांच परत गेला. इ. स. १७७७ च्या पावसाळ्यानंतर हरिपंत फडक्याची याजवर रवानगी झाली होती. परंतु बाजीपंत बर्वे यानें याच्या सैन्यांत फितूर केल्यामुळें त्यास म्हणण्यासारखें यश आलें नाहीं. इकडे यानें तर कोपळ व बहादुरबेंडा घेऊन १७७८ च्या एप्रिल महिन्याच्या अखेरीस धारवाडासहि वेढा दिला होता.
No comments:
Post a Comment