विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 30 October 2019

पानिपत युध्दानंतरच्या काळात पुण्यात एक तोतया पेशवा



तोतयेगिरी इतिहासापासून प्रसिद्ध आहे . तालिबान मध्ये सुद्धा मुल्ला अख्तर मोहम्मद मन्सूर म्हणून मानली गेलेली ही व्यक्ती प्रत्यक्षात एक तोतया असल्याचे आता उघडकीस आले आहे.मुल्ला मन्सूर याला प्रत्यक्ष बघितलेल्या एका व्यक्तीने ही तोतयेगिरी उघडकीस आणली.आता अमेरिकन, ब्रिटिश व अफगाणी अधिकारी आपण मूर्ख बनवलो गेल्याचे मान्य करत आहेत.
त्या काळीं अशा तोतयांचा बराच सुळसुळाट होई. जनकोजी शिंदे, रामराजा छत्रपति वगैरे मोठमोठ्या लोकांचे तोतये तर निघालेच होते.त्या काळात छायाचित्रे वगैरे काढण्याची शक्यता नसल्याने, एखाद्या माणसाला ओळखायचे कसे? हे इतर चार चौघे काय सांगतात यावरच अवलंबून असे. महत्वाच्या व्यक्तींची चित्रे काढली जात असत. परंतु त्यावरून तशीच दिसणारी एखादी व्यक्ती खरी तीच आहे की तोतया हे सांगणे शक्य होत नसावे.
सदाशिवराव भाऊ यांचे निधन 14 जानेवारी 1761 मधे कुरूक्षेत्र येथे झाल्याचे .परंतु सदाशिवराव भाऊ यांची द्वितीय पत्नी पार्वतीबाई यांचा सदाशिवरावभाऊ यांचे निधन झाले यावर कधीच विश्वास बसला नाही. पार्वतीबाई व इतर काही सरदार मंडळींच्या या समजूतीचा फायदा घेऊन पेशव्यांचे राज्य लाटण्याचा प्रयत्न, सदाशिवराव भाऊ यांच्याप्रमाणेच दिसणारी एक व्यक्ती व तिच्या मागचे काही कारस्थानी यांच्या कडून केला गेला होता. ही घटना, तोतयाचे बंड या नावाने प्रसिद्ध आहे. ही तोतया व्यक्ती खुद्द सदाशिवराव भाऊच आहे असे मानणारे बरेच मराठी सरदार या तोतयाला जाऊन मिळाले होते व हे तोतयाचे बंड वाढतच चालले होते.
बुंदेलखंडातं छत्रपूर जवळील कनोल गांवीं सुखलाल नांवाचा कनोजा ब्राह्मण होता; त्याच्या बापाचें नांव रामानंद व आईचें नांव अन्नपूर्णा. भाऊबंदांच्या तंट्यास त्रासून सुखलाल घरून निघून नरवर येथें आला. तेथें थकून एका वाण्याच्या दुकानीं बसला असतां दोन तीन दक्षिणी माणसांनीं त्याला पाहून म्हटलें कीं, तू भाऊसाहेबासारखा दिसतोस, तुला पेशवाई देऊं, चल. सुखलाल धाडशी व धूर्त होता. त्यानें या साम्याचा फायदा घेऊन त्यांच्या म्हणण्याप्रमाणें भाऊ म्हणून आपल्यास जाहीर केलें. नरवर येथें शंभुपुरीपंथाच्या गोसाव्यांचा एक मठ होता, तेथील पुष्कळ गोसावी सुखलालास मिळाले व हें खूळ झपाट्यानें वाढलें; तोतयानें फौजहि जमविली. या खुळांत जे बडे लोक मिळाले त्यांच्या वर्तनांत लबाडी किंवा भोळेपणा किती होता हें ठरविणें बरेंच कठिण आहे. एवढें खरें कीं, पार्वतीबाईशिवाय पेशवेकुटुंबांत व पेशवाई सरदारांतहि कोणींहि तोतयावर विश्वास ठेविला नाहीं.
नरवरहून जवळ करेरा येथें झांशीचा सुभेदार नारोशंकर याचा पुतण्या विश्वासराव राहत होता. त्याला तोतयानें तेथील किल्ला आपल्याला देण्याबद्दल कळविलें. त्यानें दोनदां माणसें पाठवून खात्री करून घेऊन मग किल्ला स्वाधीन केला. शिंद्यांच्या चिटणिसाकडूनहि तोतयानें पैका घेऊन फौज चाकरीस ठेवली. त्यानें खरोखरीच्या पेशव्याप्रमाणें फौज, तोफा, गारदी, डेरे-राहुट्या, हत्ती, पालख्या वगैरे सारा सरंजाम ठेवून तो दक्षिणेकडे आला. या स्वारीच्या खर्चासाठी त्यानें वाटेंतील मराठ्यांचेच गांव लुटले.
समशेर बहादुराच्या मेव्हण्यानें नारायणराव पेशवे यास व दोन भिक्षुकांनीं खुद्द पार्वतीबाईस पत्रें लिहिलीं कीं, भाऊ खरे आहेत. शिवाय उत्तरेकडून अनेक सरदारांच्याकडे भाऊ खरे असल्याबद्दल पत्रें आलीं. तोतया नर्मदा व तापी उतरुन खानदेशांत दंगा करूं लागला; तेव्हां थोरल्या माधवरावांनीं फौज पाठवून त्याला पकडून धनगडास कैदेंत टाकलें. पुढें त्यांची व जनकोजीच्या तोतयाची पुणें येथें जाहीर चौकशी करुन ते खोटे असें नक्की ठरल्यावर त्यांनां प्रतिबंधांत ठेविलें . भाऊच्या तोतयास नगरच्या किल्यांत पाठविलें.
तोतयाला एके जागीं न ठेविता निरनिराळ्या किल्ल्यांवर ठेवीत. दौलताबाद, मिरज, रत्‍नागिरी वगैरे ठिकाणीं त्याला ठेविलें . रत्‍नागिरीचा सुभेदार रामचंद्र नाईक परांजपे हा होता, त्यानें फितूर होऊन तोतयाला सोडून त्याची द्वाही फिरविली . तोतयाने फौज जमवून कोंकणांत धुमाकूळ घातला. सरकारचें सर्व आरमारहि त्याच्या स्वाधीन झालें. कोंकणांतील बहुतेक किल्ले व मुलूख काबीज करुन बोरघांट चढून त्यानें राजमाची घेतली व सिंहगडाकडे प्रेष लाविला (आक्टोबर). यावेळीं त्याला इचलकरंजीकर घोरपडे, इंग्रज, कोल्हापूरकर, हैदर यांनीं मदत केली. इतकें झाल्यावर नाना फडणिसानें शिंदे, होळकर व पानशे यांनां तोतयावर पाठविलें. महादजीनें प्रथम सिंहगडचा बंदोबस्त केला; पानशे यानें तोतयावर हल्ले करून त्याला मागें हटविलें व राजामाचीहून त्याला हांकलून दिलें; तेव्हां तो कोंकणांत पळाला. त्याच्या मागें शिंद्यानें आपला दिवाण बाळाराव यास पाठविलें. तोतया बेलापुरास येऊन गलबतांतून इंग्रजांकडे मुंबईस निघाला. राघोजी आंग्य्रानें बातमी राखून त्याचें गलबत मध्येंच पकडलें व त्याच्या सर्व लोकांनिशीं त्याला पुण्याला आणलें तोतयानें पुन्हां आपली चौकशी करावी म्हणून विनंति केल्यावरून नानानीं, रामशास्त्री, गोपीनाथ दीक्षित, हरिपंत फडके, बाबूजी नाईक बारामतीकर वगैरे पंच नेमून जाहीर चौकशी केली.
(याबाबत एक कथा प्रसिद्ध आहे , मला माहित नाही कि हि खरी आहे कि दंतकथा आहे . पण हे शक्य आहे त्याला पुण्यात आणलं तेव्हा त्याचा खेळ संपण्याच्या मार्गावर होता. त्याची दुसऱ्यांदा चौकशी झाली. नानांनी त्याला अनेक प्रश्न विचारले आणि सगळ्या प्रश्नांची त्याने अचूक उत्तरं दिली. तो तोतया आहे हे सिद्ध होणे कठीण दिसत होते. सुखलाल म्हणजे तोतायाची चौकशी चालली असताना पार्वतीबाई चिकाच्या पडद्याआडून सगळं ऐकत होत्या. तोतया खोटा आहे हे सिद्ध होत नाही हे बघून नानासाहेब पार्वतीबाईंकडे आले आणि त्यांनी पार्वतीबाईंना तोतयाला त्यांच्या खाजगीतला प्रश्न विचारण्याची विनंती केली. इथे तोतयाची खरी परीक्षा होती.
पार्वतीबाईनी प्रश्न विचारला की “तुम्हाला पानिपतावर जाणारपूर्वीची रात्र आठवते का”ह्या प्रश्नावर तोतयाने म्हटले, “हो आठवते ना !”पार्वतीबाईनी पुढे विचारलं, “ त्या रात्री आपण मध्यरात्रीपर्यंत बोलत बसलो होतो. अंत:पुरात अत्तराचे दिवे जळत होते, पण अत्तराचं तेल संपलं आणि काळोख झाला. त्यानंतर तुम्ही काय केलं ? सांगा.”या प्रश्नावर सुखलाल म्हणाला “हा काय प्रश्न आहे. त्यांनतर आपण झोपी गेलो.”हे उत्तर ऐकून पार्वतीबाई ओरडून म्हणाल्या, “हा तोतया आहे”. नाना फडणविसांनी खात्री करण्यासाठी पार्वतीबाईंना त्यावेळी काय घडलं होतं हे विचारलं. पार्वतीबाई म्हणाल्या की “त्यानंतर मी कपाटातल्या अत्तराच्या कुप्या काढल्या आणि दिवे पुन्हा प्रज्वलित केले आणि पहाटेपर्यंत बोलत बसल
१८ डिसेंबर १७७६ , तोतया सर्वानुमतें खोटा ठरल्यावर त्याची धिंड काढून व शहरांतील सर्व लोकांस दाखवून नंतर मेखसूनें त्यानें डोकें फोडून त्यास देहांतशासन दिले . जे फितुरांत सामील होते त्यांचे सरंजाम जप्‍त केले व दंड किंवा कैद अशा त्यांनां शिक्षा दिल्या. पुढें १।२ महिन्यांत सर्व कोकण पुन्हां कारभार्‍यांनीं जिंकून घेतलें
. (ग्रँड डफ)
-(विश्वकोश)

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...