मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 73
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेबांनी आग्र्याहून ब्रिटिश रेसिडेंट व हिंदुस्थान सरकार ह्यांना आपली दुःखें कळवून, त्यांनी राज्याधिकार परत द्यावा अशाबद्दल वारंवार खलिते पाठविले; परंतु त्यांचा कांहीं उपयोग झाला नाहीं. उलट, त्यांचे आग्यास राहणे ग्वाल्हेरच्या सरहद्दीनजीक असल्यामुळे त्यांच्या गुप्त कटानें ग्वाल्हेर संस्थानास अपाय पोहोंचेल, ह्मणून त्यांची रवानगी आग्र्यापासून दूर अशा फत्तेगड गांवीं केली. व त्याप्रमाणे त्यांस कांहीं दिवस फत्तेगड ऊर्फ फरुकाबाद येथे एका निळीच्या कारखान्यामध्ये राहण्याचा प्रसंग आला. त्यावेळच्या त्यांच्या स्थितीबद्दल “दिल्ली गॅझेट' मुफसल आखबार वगैरे पत्रांत जे लेख प्रसिद्ध झाले आहेत, त्यांत त्यांची शोचनीय स्थिति व हालअपेष्टा ह्यांचे वर्णन११ केलेले दृष्टीस पडते. फत्तेगड येथून बायजाबाईनीं, श्रीभागीरथीच्या तीरीं । शृंगीरामपूर क्षेत्रीं राहाण्याबद्दल आपला मानस गव्हरनर जनरलसाहेबांस कळविला, परंतु तीही त्यांची विनंति मान्य झाली नाहीं. बायजाबाईसाहेब ह्या इ. स. १८३५ सालच्या अखेरपर्यंत फत्तेगड येथेच होत्या. नंतर कोर्ट ऑफ डायरेक्टर ह्यांनीं त्यांना काशीस किंवा दक्षिणेत जाण्याबद्दल सक्तीचा हुकूम पाठविला; व तो अमलात आणण्यास त्यांस एक महिन्याची मुदत दिली. त्याप्रमाणे त्यांचे निघणे न झाल्यामुळे त्यांस क्याप्टन रॉस ह्यांनी लष्करी साहाय्याने फरुकाबादेहून अलहाबादेस आणिले. । नंतर कांहीं दिवस बायजाबाईसाहेबांनी अलहाबाद येथे व बनारस येथे वास केला. पुढे इ. स. १८४० सालीं हिंदुस्थान सरकारने मुंबई सरकारच्या परवानगीने त्यांस गोदावरी नदीच्या कांठीं नासिक येथे राहण्याची मोकळीक दिली व चार लक्ष रुपये पेनशन करून दिले. त्याप्रमाणे बायजाबाईसाहेब दक्षिणेत येऊन नासिक येथे राहिल्या. इ. स. १८४० पासून इ. स. १८४५ पर्यंत त्यांचे वास्तव्य दक्षिणेतच होते. मध्यंतरीं ता. ७ फेब्रुवारी इ. स. १८४३ रोजी महाराज जनकोजीराव शिंदे हे मृत्यु पावले. मृत्युसमयीं त्यांची इच्छा बायजाबाईसाहेब ह्यांस भेटावे अशी फार होती. परंतु त्यांस ब्रिटिश सरकारची परवानगी न मिळाल्यामुळे तो योग घडून आला नाहीं. मृत्यूपूर्वी महाराजांस आपल्या वर्तनाचा पश्चात्ताप होऊन, बायजाबाईसाहेबांची माफी मागावी व आपला राज्यकारभार पुनः त्यांचे स्वाधीन करावा, असाही सुविचार उत्पन्न झाला होता, असे ह्मणतात. महाराज जनकोजीराव ह्यांस औरस संतती नसल्यामुळे ब्रिटिश सरकारच्या परवानगीने दरबारचे मुत्सद्दी कृष्णराव मामासाहेब कदम ह्यांनी त्यांच्या अल्पवयी महाराणी ताराबाई ह्यांचे मांडीवर शिंद्यांच्या१ १२ वंशजांपैकीं हणमंतराव ह्यांचा मुलगा भगीरथराव ह्यांस ता. १९ फेब्रुवारी इ. स. १८४३ ह्मणजे माघ वद्य ५ शके १७६४ रोजी दत्तक देऊन त्यांचे नांव महाराज जयाजीराव असें ठेविलें, व राज्यकारभार आपल्या हाती घेतला. परंतु पुढे मामासाहेब व दादासाहेब खाजगीवाले ह्या दरबारांतील प्रमुख पुढा-यांचा बेबनाव होऊन सर्वत्र घोंटाळा झाला; व राज्यामध्ये अशांतता उत्पन्न होऊन ग्वाल्हेर दरबार व इंग्रज सरकार ह्यांच्यामध्येही तेढ उत्पन्न झाली.


No comments:
Post a Comment