मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 74
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
- अखेर हिंदुस्थानचे गव्हरनरजनरल ह्यांस ग्वाल्हेर दरबारातील राजकारणाचे घोंटाळे नाहीसे करण्याकरिता ग्वाल्हेर येथे स्वतः येण्याचा प्रसंग आला. त्याप्रमाणे त्यांची स्वारी ग्वाल्हेरजवळ हिंगोणा येथे आली. तेथे त्यांच्याशी तडजोड करण्याकरितां दरबारच्या वतीने बापू शितोळे हे गेले होते. परंतु सुलभ रीतीने व सरळपणाने ह्या राजकारणाचा निकाल न लागतां, शिंद्यांचे सैन्य व इंग्रजांचे सैन्य ह्यांची महाराजपूर व पनियार येथे लढाई झाली. * महाराजपूर व पनियार येथे शिंद्यांच्या पक्षास अपयश आल्यानंतर, गव्हरनरजनरलसाहेबांनी महाराज जयाजीराव शिंदे ह्यांस आपल्या ताब्यात घेऊन, त्यांस ता. १३ जानेवारी इ. स. १८४४ रोजीं पुनः गादीवर बसविले; व ते अज्ञान आहेत तोपर्यंत त्यांचा राज्यकारभार पाहण्याकरितां रामराव फाळके, देवराव जाधव, मुनशी राजे बळवंतराव बहादुर, उदाजीराव घाटगे, मुल्लाजी शेट आणि नारायणराव भाऊ पोतनीस ह्या सरदारांचे मंत्रिमंडळ नेमिलें. ह्या मंत्रिमंडळाशीं तह करून, शिंदे सरकाराने सैन्याच्या खर्चाकरितां १८ लक्षांचा मुलूख कंपनी सरकाराकडे नेमून द्यावा, व ग्वाल्हेर संस्थानांत फक्त ६००० स्वार, ३००० पायदळ, ३२ तोफा आणि २०० गोलंदाज इतकें सैन्य ठेवावे वगैरे महत्वाचे मुद्दे ठरविले. ह्याप्रमाणें तह झाल्यानंतर ग्वाल्हेर येथे शांतता स्थापित झाली व संस्थानचा राज्यकारभार इ. १ १३ स. १८५३ पर्यंत मंत्रिमंडळाचे विद्यमाने चालला. नंतर महाराज जयाजीराव शिंदे हे वयांत आले, व त्यांस हिंदुस्थान सरकाराने सर्व राज्याची मुखत्यारी दिली. । येणेप्रमाणे स्थिरस्थावर झाल्यानंतर बायजाबाईसाहेब ह्या पुनः उत्तर हिंदुस्थानांत गेल्या, त्या मग अखेरपर्यंत तिकडेच राहिल्या. महाराज जयाजीराव शिंदे ह्यांनी आपल्या वृद्ध आजीबाईचा परामर्ष उत्तम रीतीने घेऊन, त्यांस जनकोजीरावांच्या कारकीर्दीत जीं दुःखें भोगावी लागली, त्यांचा विसर पडेल अशा रीतीने प्रेमादरपूर्वक वागविले, हे त्यांस अत्यंत भूषणावह होय. बायजाबाईनी आपली नात जयाराजा ही खानविलकर घराण्यांत दिली होती; तिची कन्या चिमणाराजा ही जयाजीराव शिंदे ह्यांस देऊन ह्या उभयतांशीं वात्सल्यभावाचे वर्तन केले. बायजाबाईसाहेब ह्या जयाजीराव महाराजांच्या कारकीर्दीत उज्जनी व लष्कर येथेच राहत असत. ब्रिटिश सरकारानेही इ. स. १८४४ नंतर त्यांचे सर्व प्रतिबंध दूर करून, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. त्याचे फळ त्यांस इ. स. १८५७ सालीं फार उत्तम प्रकारचे मिळाले.
No comments:
Post a Comment