विनोद जाधव एक संग्राहक

Friday 29 May 2020

मराठ्यांचा गनिमीकावा आणि पेडगाव चा शहाणा

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जेष्ठ शुद्ध त्रयोदशीला म्हणजे ६ जून १६७४ रोजी रायगडावर संपन्न झाला. रयतेच्या हक्काच ३२ मण सुवर्ण सिंहासन मोठया दिमाखात उभे राहिले.

फक्त रायगडावरच नाही तर संपूर्ण स्वराज्यच आनंदात न्हाऊन निघाल. कारण लोकांच्या मनातलं लोककल्याणकारी स्वराज्य अभिमानाने उभं राहत होतं. कित्येक वर्षांचा घनदाट अंधार हटवून राज्याला स्वातंत्र्य मिळालं होतं. आणि स्वराज्याची जडण घडण च मुळी शून्यातून झाली होती.

शिवाजी महाराज राज्यभिषेक करणार ही बातमी औरंगजेबास समजली. सोहळ्याच्या अगोदर औरंगजेबाने आपला दुधभाऊ खानजहां बहादूरखान कोकलताश जफरजंग याला महाराजांचा राज्यभिषेकास विघ्न आणण्यासाठी दक्षिणेत पाठवले.

कोकलताश श्रीगोंदयाजवळ भीमेच्या काठी एक गाव आहे पेडगाव. आता या पेडगाव चा थोडक्यात इतिहास म्हणजे इथे पूर्वी खूप मोठा पेठ वसवली होती या पेठ च अपभ्रंश होऊन पेडगाव झालं तर या पेडगाव येथील बहादूरगड येथे आला होता. तर या बहादुराने या गडाला बहादूरखानाचे नाव दिले होते.

बहादूर गडाची सर्वात भयंकर आणि दुर्दैवी आठवण म्हणजे आपल्या शंभुराजांना कैद करून बहादूरगडी बंदी करून ठेवलेले. बहादूरखानाने राज्याभिषेकाला बाधा आणण्याचे प्रयत्न खुप केले परंतु जेष्ठातील पावसाळ्यात त्याचं काही चाललं नाही.

राज्याभिषेक सोहळा पार पडल्यानंतर औरंगजेबाने खानाची कानउघाडणी केली. पण कोकलताश ने कुठे तरी छापा घालून एक करोड नगद आणि ताज्या दमाचे मजबूत अंगाचे दोनशे घोडे जमा केलेत जे पाऊस ओसरला की आगऱ्याला पाठवून देतो. बहादूर खानाच्या या कृती मुळे औरंगजेब थोडा शांत झाला.

पण ही खबर औरंगजेब ला पोहचण्या आधी बहिर्जी नाईकांनी आणि त्यांच्या साथीदारांनी ती खबर रायगडावर पोहोचवली. महाराजांनी योजना आखली आणि आपले जे सैन्य होतं त्यांना आदेशाची सूचना दिली. त्यावेळी बहादूरगड किल्ल्यावर जवळपास २५ ते ३० हजारांचे सैन्य असावे जे मराठा सैन्याच्या समोर खूप जास्त होते.

पण आपल्या सैन्याचा नेतृत्व त्यावेळी हंबीरराव मोहिते यांनी केल्याची शक्यता आहे. तर सेनाप्रमुखांनी हाताशी असलेल्या नऊ हजाराच्या आसपास मराठी सैन्य घेऊन बहादूर गडावर हल्ला चढवला.

या सैनिकांच्या पुन्हा दोन तुकड्या बनवल्या, या पैकी एक तुकडी ज्यात दोन हजार सैनिक होते ते, पुणे-यवत-केडगाव-पाटस मार्गे बहादुरगडाजवळ कुरकुंभ ला मुक्कामी थांबले.तर उरलेल्या सात हजाराची फौज आरडाओरडा करत आणि महादेवाची गर्जना करत पुणे-रांजणगाव-शिरूर-नगर मार्गे श्रीगोंदयाकडे रवाना झाले.

या आरडाओरड्या मुळे बहादूर खानच्या सैनिकांना वाटलं मराठयांनी हल्ला चढवला. त्यांनी हल्ल्याची बातमी बहादूरखानाला दिली. मोठ्याने आक्रोश करत मराठे येत असल्याने ते नक्की किती आहेत याचा अंदाज बहादूरखानाला आला नाही.

मराठयांनी गडावर येऊन हल्ला करण्याऐवजी मराठ्यांना मैदानी प्रदेशात गाठून त्यांचा कायमचा बंदोबस्त करू असं म्हणत संपूर्ण गड रिकामा करून बहादूरखान मराठयांच्या दिशेने मोठ्या त्वेषाने निघाले. मराठे देखील जबरदस्त जोशात आरोळ्या अन गर्जना करत पुढे पुढे सरकत होते.

पण समोर येणाऱ्या बहादूरखान आणि त्यांच्या सैनिकांना पाहून मराठ्यांनी माघार घेतली. माघारी पळणाऱ्या मराठ्यांना पाहून खान खुश झाला त्याला वाटलं आपण यांना आता सहज हरवू. त्यात औरंगजेबाने कानउघाडणी केल्यामुळे बहादूरखानाला काही करून मराठ्यांना धडा शिकवायचा होता. पण मराठा सैन्य जवळपास चार पाच मैल पुढे निघून गेल्यावर खानाने हताशपणे पुन्हा गडाची वाट धरली.

गडाकडे निघताना मध्येच पुन्हा मराठे माघारी येताना दिसले खानाने पुन्हा आपला मोर्चा मराठयांच्या दिशेने वळवला. खान येतोय हे पाहून  मराठा सैनिक पुन्हा माघारी फिरलं.

मराठयांनी असं दोन तीन वेळा झालं खानाला हा काय प्रकार चालू आहे ते कळालं च नाही. तिसऱ्या वेळी पुन्हा मराठा सैनिक माघारी फिरलं. बहादूर खान आता खूप चिडला होता या मराठयांना धडा शिकवल्या शिवाय परतायचं नाही. खानाने मराठा सैनिकांचा पाठलाग तसाच सुरू ठेवला खान सैन्य आता नगर येथून निघून शिरूर जवळ पोहोचलं पण मराठा सैनिक कुठे गायब झालं खानाला कळलं नाही.

मराठयांच्या एका तुकडीने खानाला पुण्यापर्यंत नेलं हे समजताच उरलेल्या दोन हजाराची तुकडी जी पुणे-यवत-केडगाव-पाटस मार्गे बहादूरगडावर पोहोचली. त्या तुकडी ने गडावर हल्ला करत गडावरील असलेल्या मुद्देमाला सहित २०० अरबी घोडे घेऊन आल्या पावली रायगडावर निघाले. आणि जाता जाता त्यांनी गड पेटवून दिला. गडावर असलेल्या मोजक्याच बाजारबुणग्याना मराठा सैनिकांवर हल्ला करताच आला नाही.

इकडे खान मराठयांना धूळ चारत पुण्यापर्यंत पोहचवलं या आवेशात तो येत होता. पण बहादूरगडावर आल्यावर गडाची अवस्था पाहून खान हबकला. गडाची अवस्था अशी अवस्था कोणी केली तो अधिकच संतापला कारण गडाची अशी दुर्दशा करणारे दुसरे तिसरे कोणी नसून मराठेच होते.

रणभूमीवर न उतरता आणि युद्ध न करता, २५ हजारांच्या फौजेशी न लढता फक्त आणि फक्त गनिमी काव्याच्या जोरावर, एक कोटी होनांची दौलत अन घोडी सहजच स्वराज्याला मिळाली आणि ते ही रक्ताचा एकही थेंब न सांडता. कदाचित या पेडगावला झालेल्या फजिती मुळेच मराठी मध्ये आला मोठा “पेडगावचा शहाणा” ही म्हण रुजू झाली.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...