#शहाजीराजे_भोसले #shahajiraje
▪︎शहाजीमहाराजांच्या व्यक्तीमत्वाचे काही वैशिष्टयपूर्ण पैलू म्हणजे त्यांची प्रखर बुध्दीमत्ता, चातुर्य, सामर्थ्य , दूरदर्शीपणा, शौर्य, लढय्येपणा , धाडस, आत्मविश्वास, आत्मभान, राष्ट्रीयबाणा, धर्मनिष्ठा, न्यायनिष्ठूरता हे होते. हेच गुण आपणास शिवाजीराजांच्या अंगी पहावयास मिळतात. शिवरायांना हा मौलिक ठेवा आपल्या पित्याकडूनच मिळाला. सर्वच भोसले शुर आणि युध्दोत्सूक होते. संकटातून मुक्त होण्याची युक्ती शोधून त्यासाठी लागणारी ही बुध्दीमत्ता ही भोसल्यांची पिढीजात संपत्ती होती. तीच शिवरायांना वंशपरंपरागत मिळाली.
▪︎शहाजी महाराजांची राजनीती, कुटनीती, वेळप्रसंगी माघार घेणे, गनिमी काव्याने विजय संपादन करणे, मनुष्य स्वभावाची पारख करणे, लोकांना संघटीत करून कार्यकर्ते निर्माण करणे, यांचा अवलंब करून, आपल्या 'राज्यांतर्गत राज्या' ची स्थापना करून ती यशस्वीपणे टिकविली. त्याचप्रमाणे शिवाजी राजांनीही आपल्या पित्याकडून उपर्युक्त धडे घेऊन आपले स्वतंत्र स्वराज्य स्थापिले आणि ते यशस्वीपणे टिकविले.
▪︎शहाजी महाराजांनी शिवाजीराजे, जिजाऊ, आणि दादोजी कोंडदेव यांना बेंगलोरला मुद्दाम बोलावून घेऊन बराच काळ स्वतःजवळ ठेवून घेतले. त्यानंतर स्वत:च्या विश्वासातले निवडक अधिकारी, भारी सरंजाम, स्वतंत्र ध्वज, बरोबर देऊन पुण्यास सन्मानाने पाठविले. त्यावेळी त्यांनी स्वराज्याच्या
स्थापनेचा कानमंत्र त्यांना दिला.
▪︎स्वराज्य स्थापनेसाठीचे मुलभूत घटक जसे जहागिरी, सरंजाम, धन, ध्वज, हे शहाजी महाराजांकडून शिवाजीराजांना मिळाले. त्यामुळे स्वराज्य स्थापनेसाठी आवश्यक पार्श्वभूमी तयार झाली. या तयार झालेल्या पायावर शिवरायांनी स्वराज्याची इमारत उभारली,
▪︎शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्यावरील प्राणांतीक संकटाच्यावेळी, अटीतटीच्या प्रसंगी सर्व तयारीनिशी शिवाजीराजांच्या पाठीमागे खंबीरपणे
राहण्याची शहाजी महाराजांची तयारी होती आणि या गोष्टीची कल्पना शिवरायांनाही होती. शहाजी महाराजांचे नैतिक धैर्य कायमच शिवरायांच्या पाठीशी होते.
▪︎अखिल भारतात तीन चार शतके ठाण मांडून बसलेल्या परदेशी इस्लामी सत्तेला उलथवून पाडण्याचा, राज्यक्रांती घडवून आणण्याचा मान महाराष्ट्राला प्रथम लाभला आणि या राज्यक्रांतीचे नेतृत्व भोसले घराण्यातील तीन पिढ्यांनी केले. मालोजीराजांनी स्वराज्याचे बीज रोवले. शहाजी महाराजांनी त्यास खतपाणी घालून त्याच्या विकासासाठी चांगली मशागत केली आणि शिवरायांनी त्याचे वटवृक्षात रूपांतर केले.
▪︎हिंदवी स्वराज्याचे संकल्पक शहाजी महाराज या थोर प्रभूतीस माझे त्रिवार वंदन!!!
©maratha_riyasat
No comments:
Post a Comment