विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 29 December 2020

हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती – मर्द मराठा #हंबीरराव_मोहिते !





 हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती – मर्द मराठा #हंबीरराव_मोहिते !

शहाजीराजांचे भोसले घराणे म्हणजे कर्तबगार. भोसले घराण्याशी आपले संबंध जुळावेत म्हणून प्रांतातील अनेक मराठी घराणी उत्सुक असतं आणि त्या काळी भोसले घराण्याशी सोयरिक करणे म्हणजे प्रतिष्ठेचे देखील मानीत असत. त्यापैकीच एक घराणे म्हणजे मोहिते घराणे होय.
हे घराणे शहाजीराजांच्या भोसले घराण्याच्या अगदी जवळचे होते असे इतिहासात नमूद आहे. स्वराज्यस्थापनेच्या पूर्वी मोहिते घराण्यातील अनेक पुरुषांनी आपल्या कर्तबगार घराण्याला साजेशी अशी कामगिरी करून दाखवत घराण्याचा नावलौकिक वाढवला होता आणि पुढे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रवासामध्ये देखील मोहिते घराण्यातील वीरांनी आपले कर्तुत्व गाजवून हा वसा पुढे चालवला.
मोहिते घराण्याचा भोसले घराण्याशी पहिला संबंध तेव्हा आला जेव्हा संभाजी व धारोजी मोहिते यांनी शहाजीराजांच्या सेनेमध्ये प्रवेश केला. शहाजीराजांसोबत त्यांनी अनेक मोहिमा यशस्वी करण्यामध्ये मोलाचे योगदान दिले होते. यापैकी संभाजी मोहिते यांचा पुत्र म्हणजे हंबीरराव मोहिते होय. (मूळ नाव-हंसाजी मोहिते, शिवाजी महाराजांनी त्यांच्या पराक्रमावर खुश होऊन त्यांना हंबीरराव हा किताब दिला होता.)
संभाजी मोहिते यांनी आपली मुलगी सोयराबाई यांचा विवाह शिवाजी महाराजांसोबत लावून दिला व भोसले आणि मोहिते घराणे कधीही न तुटणाऱ्या एका नात्यात बांधले गेले. त्यानंतर हंबीरराव मोहिते यांनी देखील आपली मुलगी ताराबाई हिचा विवाह शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांशी लावून दिला आणि सोयरिक अधिक घट्ट केली.
हंबीरराव मोहिते यांना आपल्या कर्तबगार घरण्याचा वारसा लाभल्याने आपल्या पूर्वजांप्रमाणे ते अतिशय शूर होते. कोणतेही संकट का असेना त्याला निधड्या छातीने सामोरे जाणे ते आपला धर्म मानीत असत.
प्रथम हंबीरराव मोहिते हे शिवाजी महाराजांच्या सेनेमध्ये सेनानी म्हणून कार्यरत होते. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापूर्वी बहलोल खाना विरुद्धच्या लढाईमध्ये प्रतापराव गुजर धारतीर्थी पडले आणि स्वराज्याच्या सेनापतीची जागा रिकामी झाली. ज्या लढाई मध्ये प्रतापराव गुजर धारातीर्थी पडले त्याच लढाईमध्ये हंबीरराव मोहते यांनी स्वत:हून पुढाकार घेत जबरदस्त शौर्य गाजवीत शत्रू सैन्याचा पराभव केला.
त्यांचा हा पराक्रम पाहून प्रतापराव गुजर यांच्या नंतर रिकामी झालेल्या सेनापतीच्या जागी प्रतापरावां सारखाच त्यांच्या शौर्याचा वारसा पुढे नेणारा निधड्या छातीचा वीर असावा म्हणून शिवाजी महाराजांनी हंबीरराव मोहिते यांची निवड केली, सोबत त्यांना हंबीरराव हा किताबही बहाल केला आणि हंबीरराव मोहिते झाले अष्टप्रधान मंडळातील हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती!
हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची जिवंत साक्ष म्हणजे त्यांची तलवार होय. ही तलवार प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदीरात भवानी माते समोर विराजमान आहे. त्याचे कारण म्हणजे अफझलखाना सोबत झालेल्या लढाईत हंबीरराव मोहिते यांनी गाजवलेला पराक्रम होय.
या लढाईत त्यांनी ६ तासात ६०० शत्रूंना मारले असे म्हटले जाते. ह्या तलवारीवर सहा चांदणीच्या आकाराचे शिक्के आढळतात. त्या काळात शिवाजी महाराजांनी ही प्रथा चालू केल्याचे म्हणतात. म्हणजे एखाद्या मावळयांने एकाच लढाईत १०० शत्रूंना कंठस्नान घातले तर त्या मावळयाच्या तलवारीवर एक शिक्का ऊमटवला जायचा. त्यानुसार सरसेनापती हंबीरराव मोहितेच्या तलवारीवर ६ शिक्के आहेत. असा पराक्रम कोणीही गाजवल्याचे ऐकिवात नाही.
राज्याभिषेकानंतर स्वराज्याचा गाडा हाकण्याची जबाबदारी वाढली होती. शत्रू सैन्य चहुबाजूंनी टपून बसले होते. अश्यावेळी हंबीरराव मोहितेंसारख्या खंद्या सेनापतीने आपल्या महाराजांना पदोपदी साथ दिली.
हंबीररावांनी पहिले लक्ष्य केले मुघल सुभेदार दिलेरखान व बहादूरखान यांना. महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांच्या छावण्यांवर जबरदस्त प्रहार करून हंबीरराव मोहितेंच्या सैन्याने त्यांना सळो की पळो करून सोडले. त्यानंतर त्यांनी खानदेश, बागलाल, गुजरात, बर्हाणपूर, वर्हाड, माहूड, वरकड पर्यंत मजल मारीत प्रत्येक मुघलाला हाकलून दिले.
दिवसागणिक त्यांच्या शौर्यामुळे स्वराज्याचा दबदबा वाढत होता. शत्रू सैन्य हंबीररावांच्या वाटेला जाताना दोनदा विचार करू लागला. इकडे मुघलांसोबत आदिलशाहीला देखील त्यांनी जबरदस्त दणका दिला. कर्नाटकातील कोप्पल येथील अदिलशाही पठाणी सरदार हुसेनखान याचा प्रचंड पराभव करून तेथील जनतेला स्वराज्याच्या छत्रछायेखाली आणले.
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले, स्वराज्य पोरका झाला.
शिवाजी महाराजांनंतर अर्थातच स्वराज्याची धुरा थोरला पुत्र संभाजी महाराजांकडे येणार होती, परंतु दरबारातील एक गटाने संभाजी महाराजांना गादीवर न बसवता राजाराम महाराज यांना गादीवर बसवण्याचा घाट घातला. पण हंबीरराव मोहिते यांनी मात्र संभाजी महाराजांना पाठींबा दिला आणि अखेर नियतीच्या इच्छेप्रमाणे संभाजी महाराज हे स्वराज्याचे छत्रपती झाले.
संभाजी राजांच्या राज्याभिषेकानंतर, त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा एकदा स्वराज्याचा वारू चौफेर उधळण्यासाठी हंबीरराव मोहिते सज्ज झाले. या काळात त्यांनी केलेली बुर्हाणपुरची लुट महत्त्वाची मानली जाते. तो विजय म्हणजे हंबीरराव मोहितेंच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या क्षणांपैकी एक आहे. या विजयामुळे मोघलांच्या वर्चस्वाला चांगलाच तडा गेला.
रामशेजच्या किल्ल्याची लढाई ही इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली गेलेली लढाई आहे. या लढाईमध्ये हंबीररावांनी किल्ल्याला वेढा देऊन बसलेल्या खानाला चांगलीच अद्दल घडवली होती.
यानंतरही मुघल सरदार कुलीचखान, रहुल्लाखान व बाहदुरखान आणि शहाजादा आज्जम यांना देखील स्वराज्याच्या बाहेर पिटाळून लावताना हंबीर राव मोहिते यांनी पराक्रमाची शर्थ केली.
हंबीररावांची शेवटची लढाई म्हणजे वाईजवळील मुघल सरदार सरदार सर्जाखान विरुद्धची लढाई होय. या लढाईत देखील आपल्या कर्तुत्वाला साजेसे शौर्य गाजवताना तोफेचा गोळा लागून स्वराज्याचे सरसेनापती हंबीर राव मोहिते धारातीर्थी पडले. या लढाईत मराठ्यांना विजय मिळाला खरा, पण त्यांनी आपला अमुल्य हिरा मात्र गमावला.
संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतील प्रत्येक लढाईमध्ये हंबीर राव मोहिते यांचे नाव आवर्जून पाहायला मिळते. आपल्या सेनापतीपदाला साजेशी कामगिरी करून दाखवीत, शेवटच्या श्वासापर्यंत लढून हंबीररावांनी शिवाजी महाराजांनी त्यांची केलेली निवड सार्थ करून दाखवली.
स्वराज्याच्या या मर्द मराठ्या सरसेनापतीस मानाचा मुजरा!

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...