पुण्याच्या ईशान्येस १५ कोसांवर मलठण गांव आहे. तेथील रहाणारे हे पवार धारच्या मूळच्या परमार घराण्याचे वंशज. शिवाजीमहाराजांच्या वेळीं संभाजी पवार हा मलठणचा पाटील असून महाराजांच्या सैन्यांत होता. याला एकंदर तीन पुत्र उदाजी, आनंद व जगदेव (हिं. ऐ. राज्यें. पृ. २३८ ). औरंजेबाच्या विरुद्ध मराठ्यांनीं रजपुतांस मदत दिली, त्यावेळीं १६९८ मध्यें, उदाजीनें माळव्यांत शिरून मांडवगडास तळ दिल्याचा उल्लेख आढळतो. तथापि तेथें कायमचें वास्तव्य करण्यास उदाजीस सवड झाली नाहीं ( म. रि. म. वि. भा. १ पृ. ३५५ ). माळवा व गुजराथ या ठिकाणीं प्रारंभीं मराठ्यांचा जम बसविणारा मुख्य इसम उदाजीच होता, असें १७२६ त शाहूनें ठरवून दिलेला ६ कलमी तह आहे त्यावरून दिसतें. १७१८ च्या नोवेंबरच्या सुमारास बाळाजी विश्वनाथ, सम्यदाच्या मदतीस दिल्लीस गेले, तेव्हां उदाजीहि बरोबर होता. तिकडून १७२० त परत आल्यानंतर बाळाजीपंत नानांनीं जी संरजामपद्धति ठरवून दिली, तींत उदाजीस माळव्यांत मुलुख दिला होता. उदाजी हा लहानपणीं पहिल्या बाजीरावाचा खेळगडी होता. त्यानें १७२४ त धार येथें आपलें ठाणें बसविलें. १७२७ च्या मार्चांत पेशवे कर्नाटकांत गुंतले असतां इकडे निजामनें महाराष्ट्रांत गडबड उडवून दिली, तेव्हां शाहूनें उदाजीस इकडे येण्याबद्दल निकडीचे हुकुम पाठविले होते. पुढें पुढें उदाजी हा बाजीराव यांनां डोईजड झाला; अखेर १७२८ त दोघांचें वाकडें येऊन, श्रीमंतांनीं त्याला कैदेंत टाकून त्याचा सरंजाम आनंदरावास दिला, परंतु तो लवकरच कैदेंतून सुटला. १७२९ च्या सुमारास होळकरानें व उदाजीनें मांडवगड काबीज केल्याचा उल्लेख आहे. पुढें माळव्याचा अंमल सुरळीत चालेना, तेव्हां १७३० च्या वेळीं उदाजीनें, तिकडील मराठ्यांचे स्नेही नंदलाल मंडलोई यास जरबेचें पत्र लिहिलें आहे. डभईचे लढाईंत उदाजी हा बाजीरावाच्या विरुद्ध दाभाड्याकडून लढत होता. अखेर त्याचा पाडाव झाला.
यानंतर, दायबहादुराशीं मराठ्यांची जी (१२-१०-१७३१) मांडवघाटावरील तिरलाची लढाई झाली, तींत उदाजीनें चांगला पराक्रम गाजविला. यापुढें १७३६ च्या सिद्दीवरील मोहिमेंत शाहूमहाराजांनीं उदाजीस येऊन मिळण्याची आज्ञा केली त्याप्रमाणें तो आला होता. त्यानें त्यावेळीं सिद्दी अंबर याच्याशीं लढाई करून त्याला ठार मारून गोवळकोटास वेढा दिला होता. यापुढील उदाजीची हकीकत समजत नाहीं. [मराठी रियासत मध्यविभाग, पृ. ३५५ पुढें.]
No comments:
Post a Comment