विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 8 February 2022

सम्राट राजा भोज परमार (पवार)

 सम्राट राजा भोज परमार (पवार)

माळव्यातील परमार घरण्यातील एक विद्वान व कलाभिज्ञ थोर राजा. वाक्‌पतिराज ऊर्फ मुंज याचा धाकटा भाऊ सिंधुराज यांचा पुत्र. सिंधुराजाच्या मृत्यूनंतर परमारांच्या गादीवर इ. स. सु. १००० मध्ये ते आले. त्यांच्या जन्ममृत्यूंच्या सनांविषयी तसेच राज्यारोहणतिथिविषयी इतिहासात मतैक्य नाही. त्यांच्या कारकीर्दीतील उपलब्ध कोरीव लेख इ. स. १०२० ते १०४७ दरम्यानच्या काळातील आहेत. ते स्वतःस त्रिभुवननारायण अशी उपाधी लावीत असे. त्यांच्या कर्तृत्वाविषयी भोजप्रबंध या ग्रंथात विपुल माहिती मिळते. राज्यारोहणानंतर त्यांनी आपली राजधानी उज्जयिनीहून (उज्जैन) धारानगरी (विद्यमान धार) येथे नेली. त्यामुळे त्यांना धारेश्रव हे नामाभिधान मिळाले.
भोज यांनी प्रदीर्घकाळ राज्य केले. या काळात त्यांनी चितोड, बांसवाडा, डूंगरपूर, खानदेश, कोंकण इ. भाग घेऊन भारतातील मोठ्या भूप्रदेशावर आपले स्वामित्व स्थापिले होते. बुंदेलखंड वा बाधेलखंड हे प्रदेश वगळता नर्मदा नदीच्या उत्तरेकडील मुलूख व दक्षिणेकडील गोदावरी नदीपर्यंतच्या भूप्रदेशावर त्यांचे आधिपत्य होते. इ. स. १०४३ मध्ये मुसलमानांच्या आक्रमणाला आळा घालण्यासाठी हिंदु राजांचा एक सहासंघ स्थापन झाला होता त्यातही भोजा यांनी सहभाग घेतला होता, असे परंपरा सांगते. भोज हे सतत युद्धांत गुंतला असले, तरी विद्या आणि कला यांना त्याने दिलेला आश्रय आणि त्याची ग्रंथसंपदा यांमुळे परमारांची कीर्ती भारतीय इतिहासात अजरामर झाली आहे. त्यांनी मंदिरे बांधली, तद्वतच भोपाळजवळ एक तलाव खोदला. उज्जयिनी व धार येथील अवशेषांपैकी भोजशाला, राजमार्तंड नावाचा राजमहल, जयस्तंभ, सरस्वतिसदन पाठशाला आणि काही मंदिरे अवशिष्ट असून भोजशाला भोजराजाकी निसाल किंवा कमाल मौला या नावाने प्रसिद्ध आहे. येथे त्या वेळी वेदशाक्याभ्यासाची सोय होती. त्यांनी संस्कृत विद्येस उत्तेजन देऊन राज्यात विद्यालये व पाठशाला स्थापन केल्या. भोज विद्वान होते आणि विद्वानांचा चाहता होते. परिमल वा पद्मगुप्त, धनपाल, भट्ट गोविंद, विद्यापती भास्कर भट्ट इ. विद्वानांना व पंडितांना त्यांचा उदार आश्रय होता. भोज यांनी स्वतः ग्रंथ लिहिले व विद्वानांकडून लिहूनही घेतले.
त्यांनी साहित्याचे विविध प्रकार हाताळले होते. त्यांच्या ग्रंथांपैकी राजमृगाङ्‌क, राजमार्तण्ड, विद्वज्जनवल्लभ प्रश्नज्ञानम्, आदित्यप्रतापसिद्धांत, सरस्वतीकण्ठाभरण, व्यवहारसमुच्चय, चारुचर्या, समरांगण-सूत्रधार, युक्तिकल्पतरु, विश्रांतविद्याविनोद इ, ग्रंथ प्रसिद्ध आहेत. समरांगण-सूत्रधार व युक्तिकल्पतरु ह्या दोन ग्रंथांत त्यांनी शिल्पशास्त्र, वास्तुकला, चित्रकला तसेच शासनव्यवस्था, सैन्याचे प्रकार, नौकानयन, कर व अर्थव्यवस्था इ. विविध विषयांची सांगोपांग चर्चा केली आहे. यांशिवाय चम्पुरामायण, विद्याविनोद यांसारख्या ग्रंथांवरून त्यांनी काव्य हा विषयही सहजतेने हाताळलेला दिसतो. तसेच त्यांचे शालीहोत्रम्, शब्दानुशासनम्, सिद्धांतसंग्रह, सुभाषितप्रबंध इ. ग्रंथही महत्त्वपूर्ण आहेत. टेओडोर आउफ्रेख्ट या जर्मन भारतविद्या पंडिताने भोज राजांच्या तेवीस ग्रंथांचा उल्लेख आपल्या ग्रंथसूचीत केला आहे. तसेच अल्‌-बीरूनी या अरबी इतिहासकारानेसुद्धा आपल्या इतिहासविषयक ग्रंथात भोज परमारांच्या लेखनासंबंधी गौरवोद्‌गार काढले आहेत. धारानगरीत सरस्वतीकंठाभरण नावाच्या पाठशाळेतील कूर्मशतक व भर्तृहरीच्या कारिका दगडांवर कोरलेल्या असून ते कोरीव लेख आजही पाहावयास सापडतात.
भोज हा पराक्रमी व विद्वान राजा होते. त्यांची सर्व धर्मांविषयी समान व उदार दृष्टी होती. ‘त्रिविधवीर चूडामणी’ हे त्याला दिलेले उपाधिदर्शक विशेषण त्यांनी सर्वार्थाने सिद्ध केले, हे त्यांच्या चरित्रावरून स्पष्ट होते.
ही म्हण का रुढ झाली ?
कित्येक राज्यांनी भोज राज्यावर आक्रमण केले, चाल करून गेले पण कोणालाही राजा भोजला हरवणे शक्य झाले नाही. अशाच महत्वाकांक्षी राजांपैकी दोन राजे म्हणजेच दक्षिणेचे कलचुरी नरेश गांगेय व चालुक्य नरेश तैलंग, म्हणजेच आपल्या म्हणीतले “गंगू तेली”.
होय, गंगू तेली कोणी एक व्यक्ती नसून राजा गांगेय व राजा तैलंग यांचे एक विडंबनात्मक नाव आहे.
या दोन राजांशी राजा भोजचा कसा संबंध आला व ही म्हण प्रचलित कशी झाली आता ते पाहूया. एकदा गांगेय व तैलंग यांनी मिळून भोज राज्यावर हल्ला केला.
भले मोठे सैन्य घेऊन अगदी जिंकण्याच्या अपेक्षेने केल्या गेलेला हा हल्ला होता. पण इतके सामर्थ्य असून सुद्धा राजा भोजने त्यांना अशाप्रकारे हरवले, की कोणत्याही लढवय्यासाठी ही अत्यंत शरमेची, लाजीरवाणी बाब ठरावी.
दोघांनाही राजा भोजच्या कौशल्यापुढे व दिव्य परक्रमापुढे शस्त्र टाकावे लागले. आपले प्राण वाचण्यासाठी, अक्षरशः नाक घासून, गुडघ्यावर बसून जीवदान मागावे लागले.
दोन राजे मिळून सुद्धा एकट्या भोज राजाच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकले नाहीत, या उलट आपला मान घालवून बसले.
याच लढाई नंतर धारच्या प्रजाजनांनी दोन्ही राजांची खिल्ली उडवत, त्यांना अपमानित करण्याकरिता “कहां राजा भोज, कहां गंगू तेली” असे म्हटले व तेव्हा पासून ही म्हण उदयास आली.
हिचा मूळ वापर, स्वतः ला अति हुशार समजणाऱ्या व्यक्तीला त्याचा पातळीची जाणीव करून देण्यासाठी करतात. याचे पुरावे देखील इतिहासकारांना मिळाले आहेत.
संदर्भ: 1. Bhatia, Pratipel, Paramars : a Study in the Political and Cultural History of Their Kingdom, New Delhi, 1970.
2. Ganguly, D. C. History of the Paramara Dynasty, Dacca, 1933.
3. Jain, K. C. Malwa Through the Ages, New Delhi 1972.
4. Majumdar, R. C. Ed. The Struggle for Empire, Bombay, 1971.
५. ओक, शि. का.धारसंस्थानचा संक्षिप्त प्राचीन इतिहास, धार १९१९.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...