विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 16 November 2022

'असईची लढाई'

 'असईची लढाई' 

पोस्तसांभार ::एकनाथ वाघ 

 

असईची लढाई'

असई लढाई ही आपल्या पूर्वजांनी गाजवलेले शौर्य अधोरेखित करणारी आहे. भारतीयांच्या दृष्टीने या लढाईचे महत्त्व म्हणजे मराठे ही लढाई प्रादेशिक वर्चस्वासाठी नाही, तर परकीयांचे वर्चस्व व मुजोरी उखडून फेकण्यासाठी लढत होते. मराठवाड्यात इतिहासाच्या अशा अनेक पाऊलखुणा आहेत, पण कधी इतिहासाच्या पुस्तकांतून सर्वसामान्यांपर्यंत ही सगळी माहिती जात नाही.

23 सप्टेंबर 1803 ची दुपार. जालना जिल्ह्यातील पूर्णापूर (जाफ्राबाद) तालुक्यातील असई गावाचा परिसर. एका बाजूला केळणा, तर दुसर्‍या बाजूला जुई नदी भरून वाहताहेत. असईच्या पुढे या दोन्ही नद्यांचा संगम. मागे दोआबात घनघोर लढाई चाललेली. इंग्रज आणि मराठे यांच्यातील हे युद्ध ‘असईची लढाई’ नावाने ओळखले जाते. या युद्धात इंग्रजांचा लेफ्टनंट कर्नल पॅट्रीक मॅक्सवेल हा कामी आला. याची कबर बांधली असुन तेथे त्याचे नातेवाईक आज पण भेट देण्यासाठी येतात.

दुसऱ्या बाजीरावाचा होळकरांनी ऑक्टोबर २५, १८०२ रोजी पुण्याच्या जवळ पराभव केला. पराभवा नंतर होळकरांनी पुण्याचा ताबा घेतला व बाजीराव पळून इंग्रजाकडे आश्रयासाठी गेला व संधी केली. हा तह वसईचा तह या नावाने ओळखला जातो. या तहानुसार इंग्रजांनी बाजीरावला मराठ्यांच्या सत्ता स्थानी पुन्हा बसवण्यासाठी मदत करण्याचे मान्य केले. अश्या प्रकारे बाजीराव-इंग्रज सरकार व ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध शिंदे व इतर काही मराठा संस्थानिक असे दुसरे इंग्रज मराठा युद्ध सुरू झाले.

मराठ्यांचे नेतृत्व शिंद्या कडे होते तर इंग्रजाचे नेतृत्व आर्थर वेलस्ली याने केले.

दुसरा बाजीराव पेशवा हा अधिकाराने जरी मराठ्यांच्या राज्याचा मुख्य कार्यकारी असला तरी पेशव्यांचे राज्यावरचे नियंत्रण संपुष्टात आल्यात जमा होते. मराठ्यांची सत्ताकेंद्र पुण्यावरून आता इंदूर व ग्वाल्हेर येथे गेलेले होते. महादजी शिंद्याच्या निधना नंतर मराठ्यांच्या एकीमधील कच्चे दुवे बाहेर येउ लागले.

इंग्रजांनी युद्धात उतरायचे ठरवल्या वर त्यांना मराठ्यावर आक्रमण करणे भाग होते. त्या दृष्टीने त्यांनी प्रथम नागपूरच्या भोसल्यांवर प्रथम आक्रमण करावयाचे ठरवले. शिंद्यानी पण आपली सेना शत्रूला शक्यतो लवकर संपवावे यासाठी भोसल्यांच्या मदतीला आणली. मराठे व इंग्रज हे दोन्ही फौजा चांगले स्थळ व वेळेच्या शोधात होत्या.

मराठ्याचे ४०-५० हजार नियमित सैनिक होते व बराच मोठा तोफखाना होता. मोठे संख्याबळ व तोफखान्याच्या जोरावर इंग्रजांवर मात करु असा विश्वास मराठ्यांच्या सरदारांना होता तर वेलस्लीला त्याच्या शिस्त बद्द इंग्रज लष्करावर विश्वास होता. इंग्रज मराठ्याच्या फौजेला गाठून हरवायच्या बेतात होती तर मराठ्याना अजूनही पारंपारिक गनिमी काव्याच्या पद्धतीवर विश्वास होता.

इंग्रजांचे सैन्य दोन मुख्य पलटणीत विभागले होते. एक पलटण घेऊन कर्नल स्टीवनसनने पश्विमेकडून चाल केली तर वेलस्लीने दुसरी पलटण घेउन दुसऱ्या बाजूने चाल करायचे व दोन्ही बाजूंनी मराठ्यांना गाठून कोंडीत पकडायचे ठरविले. परंतु वेलस्लीला मराठ्यांची गाठ लवकर पडली. सप्टेंबर २३ १८०३ रोजी दोन्ही सेना आमने सामने आल्या.

मराठ्यांची सेना केळणा व जुई नदीच्या संगमापाशी स्थित होती. मराठे सेनापतींच्या अंदाजानुसार वेलस्लीला नदी ओलांडावी लागेल व त्याचा फायदा आपण घेऊ असा विश्वास होता. युद्धनीतीच्या दृष्टीने मराठे स्थिती वरचढ होती. वेलस्लीकडे सेना कमी होती तसेच कुमक येण्यासाठी अजून काही दिवस वाट पहावी लागली असती. परंतु वेलस्लीने आक्रमणाचा निर्णय घेतला. त्याने कैतना नदीच्या कडे कडेने नदी कुठे पार करता येईल याचा अंदाज घेतला.

स्थानिक वाटाड्यांनुसार जवळ कुठेही नदी उथळ नव्हती, परंतु आष्टीजवळ त्याला उथळ जागा सापडली. परंतु मराठ्यांनीपण वेलस्लीचे भारतीयांबाबतीत शिस्तीचे अंदाज चुकवले, वेलस्लीच्या फौजेला मराठ्याशी आमने सामने युद्ध करावे लागले. त्यामुळे ब्रिटीश फौजही अंदाजापेक्षा जास्त मारली गेली परंतु ७४ व्या व ७८ व्या हायलॅंडर तुकडीने मराठ्यांच्या सेनेचे कंबरडे मोडून काढले मराठ्यांची सेनेने पळ काढला. साधारणपणे ६००० मराठे सैनिक कामी आले. ब्रिटीशांचे १५०० सैनिक मारले गेले. वेलस्लीच्या वेलस्लीच्या मते त्याच्या कारकिर्दीतील त्याने लढलेले सर्वोत्तम युद्द होय.

मराठ्यांचे संख्याबळ अधिक असूनही मराठ्यांचा पराभव झाला. मराठ्यांचे १,२०० जण ठार झाले तर इंग्रजांचे ४२८ जण. इंग्रजांची उच्च दर्जाची शस्त्रे व युद्धपद्धती यात कितीतरी पटीने इंग्रज वरचढ होते. तसेच मराठ्यांचे गनीमी काव्याचे तंत्र युरोपीयन आमने सामनेच्या युद्धतंत्रापुढे काम करु शकले नाही. मराठ्यांच्याकडे महादजी शिंद्यानंतर त्यांच्या तोडीचा सेनापती नव्हता त्याचे नुकसान मराठ्यांना झाले.

पालखेडच्या लढाईत पहिले बाजीराव यांनी मराठा साम्राज्याचा पाया भक्कम केला होता, ते एक अद्वितीय युद्ध म्हणून इतिहासाच्या पानावर कोरले गेले आहे.. या युद्धामुळे मात्र मराठा साम्राज्य संपुष्टात येऊन मराठी सत्तेस उतरती कळा लागली आणि इंग्रजांची सत्ता हिंदुस्थानात दृढमूल झाली.

स्त्रोत :

मराठवाड्यातील इतिहासाच्या पाऊलखुणा

इतिहास बदलवणारी असईची लढाई

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...