विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 27 April 2023

एका मराठी राणीनं उत्तर भारतात संस्थान कसं सांभाळलं? भाग ५

 

एका मराठी राणीनं उत्तर भारतात संस्थान कसं सांभाळलं?
  • ओंकार करंबेळकर
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी


भाग ५
1857 चे बंड
1857 साली उत्तर हिंदुस्तानात बंडाचं वारं आल्यानंतर बंडवाल्या सैनिकांनी बायजाबाईंना ग्वाल्हेरचं संपूर्ण संस्थान देऊन आपल्या बाजूने येण्याची विनंती केल्याचं सांगण्यात येतं. मात्र बायजाबाईंनी बंडवाल्या सैनिकांबरोबर जाणं टाळलं.
1858च्या मे महिन्यात झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, रावसाहेब पेशवे, बांद्याच्या नवाबांनी ग्वाल्हेरवर हल्ला करून ग्वाल्हेर ताब्यात घेतलं. त्यामुळे सर्व राजस्त्रियांना बाहेर पडावं लागलं. साक्षात जयाजीराव शिंदे आणि त्यांचे दिवाण दिनकरराव राजवाडे यांना आग्र्याला पळून जावं लागलं होतं.
ब्रिटिश सैनिकांच्या गराड्यात झाशीच्या राणीचे सैनिक
या वेळेस सर्व खजिना पेशव्यांनी आपल्या ताब्यात घेतला हे सर्व वर्णन विष्णूभट गोडसे यांनी माझा प्रवास या पुस्तकात केलं आहे. बायजाबाई शिंदे सर्वतोमुख यज्ञ करणार आहेत असं पत्र मिळाल्यामुळेच त्यांनी कोकणातील वरसई गावातून उत्तर भारतात भ्रमण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या पुस्तकात बायजाबाई शिंदे यांचा उल्लेख अनेकदा आढळतो.
पेशव्यांनी आणि बंड करणाऱ्या फौजेने ग्वाल्हेर ताब्यात घेतल्याचं समजताच ब्रिटिश सैन्याधिकारी ह्यू रोजने ग्वाल्हेरवर स्वारी केली. या युद्धात झाशीच्या राणीचा मृत्यू झाला आणि पेशवे, तात्या टोपे, बांद्याचे नवाब यांना ग्वाल्हेर सोडून निघून जावं लागलं. अखेर ग्वाल्हेरमध्ये इंग्रजांच्या मदतीने पुन्हा एकदा शिंदे यांचं सरकार स्थापन झालं.
बंड शमल्यानंतर बायजाबाई ग्वाल्हेरला जयाजीराव शिंदे यांच्याबरोबरच राहू लागल्या. अखेर वृद्धापकाळातील आजारांमुळे त्याचं 27 जून 1863 साली निधन झालं. ग्वाल्हेर संस्थानाच्या कारभाराच्या, वाटचालीच्या त्या सहा दशकांहून अधिक काळ साक्षीदार होत्या.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...