विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 27 April 2023

एका मराठी राणीनं उत्तर भारतात संस्थान कसं सांभाळलं? भाग ४

 

एका मराठी राणीनं उत्तर भारतात संस्थान कसं सांभाळलं?
  • ओंकार करंबेळकर
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी


भाग ४
बायजाबाई यांच्या राज्यकारभाराचं कौतुक अनेक ठिकाणी प्रसिद्ध झालं आहे. 1 जुलै 1832 साली इंडिया गॅझेटमध्ये त्यांच्या वर्णनाबद्दल म्हटलं आहे, "The Regent Baee conducts the affairs of this state with great regularity, much better, I understand, than what was done in the time of late Maharaja" रिजंटबाई म्हणजेच बायजाबाई अत्यंत नियमितपणे कारभार चालवत असून दिवंगत राजे दौलतरावांपेक्षाही तो चांगला आहे, असं त्यात छापण्यात आलं होतं.
तर मिल्स हिस्ट्रीमध्ये बायजाबाई शिंदे या तेजस्वी, सत्वशील आणि कडक स्वभावाच्या होत्या असं म्हटलं आहे. मुंबई गॅझेटच्या पत्रकारांनी "बायजाबाई शिंदे यांचा कारभार पाहाता त्यांनी उत्तराधिकारी व्हावं हा दौलतरावांचा विचार किती बरोबर होता हे समजतं. त्या शांतता राखण्याच्या बाजूच्या होत्या", अशा आशयाचं वर्णन 1833 साली प्रसिद्ध केलं आहे. ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांनीही बायजाबाईंना ज्ञानकोशात विशेष स्थान देऊन त्यांचं वर्णन लिहिलं आहे.
जनकोजी शिंदे आणि बायजाबाई शिंदे यांच्या बेबनाव
काही वर्षांनी दत्तकपुत्र जनकोजी आणि बायजाबाई यांच्यात राजकारभार कोण चालवणार यावरून वितुष्ट येऊ लागलं. या दोघांमधील कलह मिटवण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. साक्षात गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंक यांनीही 1832 साली ग्वाल्हेरमध्ये आल्यावर मसलत केली होती.
बायजाबाईंच्या नशिबी वनवास
1833 साली जनकोजी यांनी उघड बंड केले. बायजाबाई यांना अटक करण्याच्या हालचाली होत असतानाच बायजाबाई राजवाड्यातून निसटल्या आणि त्या हिंदुराव यांच्या वाड्यात आश्रयाला गेल्या आणि त्यांनी ब्रिटिश रेसिडेंट कॅव्हेंडिश यांच्याकडे मदत मागितली. परंतु या सर्व खटाटोपात जनकोजी शिंदे यांचं पारडं जड ठरलं आणि बायजाबाईंना ग्वाल्हेर सोडावं लागलं.
त्यांना धोलपूर, फत्तेगड, अलाहाबाद, बनारस असं फिरत राहावं लागलं. त्यांच्या हालअपेष्टांचं वर्णन तेव्हा 'दिल्ली अखबार', 'मुसफल आखबार' या वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालं होतं.
अखेर 1840 ते 1845 अशी पाच वर्षं त्यांना नाशिकला काढावी लागली. 1844 साली जनकोजी शिंदे यांचा मृत्यू झाल्यावर त्यांची पत्नी ताराबाई हिने जयाजीराव शिंदे यांना दत्तक घेऊन राज्यकारभार सुरु केला. त्यानंतर बायजाबाई पुन्हा ग्वाल्हेरला आल्या.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...