विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 30 September 2023

क्षत्रिय_मराठा_निकुंभ_राजवंश

 

#



क्षत्रिय_मराठा_निकुंभ_राजवंश
----------–----------------------------
राजा निकुंभ यांच्यापासून निकुंभ राजवंशाची सुरुवात झाली. राजा निकुंभ हे आयोध्याचे सूर्यवंशी राजा इक्ष्वाकु यांचे 13 वे वंशज होते. निकुंभ वंशी राजा #बाहुमान आणि मध्य भारतात नर्मदा नदी किनारी राज्य करत असलेल्या हैहैय वंशी राजा #तालजंग यांच्यात घनघोर युद्ध झाले या युद्धात राजा बाहुमान यांचा पराभव होऊन मृत्यू झाला. त्यानंतर राजा बाहुमान यांचे पुत्र राजा #सगर यांनी आपल्या पित्याच्या पराभवाचा बदला घेतला व राजा तालजंग यांचा पराभव केला. याचवेळी निकुंभ वंशी राजांचा राज्यविस्तार दक्षिण भारतामध्ये झाला. त्यानंतर भगवान श्रीराम यांचे छोटे बंधू राजा शत्रुघ्न यांचे द्वितीय पुत्र #सुबाहु यांना देखील दक्षिण भारताचे राज्य मिळाले. त्यानंतर राजा सुबाहु यांचे वंशज देखील निकुंभ वंशीय क्षत्रियांमध्ये मिसळले व एकाच वंशाचे असल्यामुळे राजा सुबाहु यांचे वंशज देखील स्वतःला निकुंभवंशीय म्हणू लागले. तर हा झाला निकुंभ वंशाचा अयोध्ये वरून दक्षिण भारतापर्यंतच्या राज्य विस्ताराचा पौराणिक इतिहास.
ऐतिहासिक इतिहासाचा विचार केला तर निकुंभ राजवंशाचे राज्य उत्तरी महाराष्ट्रात म्हणजेच आत्ताच्या #कान्हादेश (खानदेश) मध्ये होते. कान्हादेशामध्ये आजच्या महाराष्ट्राचे जळगाव, धुळे, नंदुरबार हे जिल्हे व नाशिक जिल्ह्याचा उत्तरी भाग येतो. कान्हादेशात निकुंभ राजवंशाचा शासन काळ निश्चितपणे सांगता येत नाही पण इसवी सन 500 ते 700 पासून इसवी सन 1200 पर्यंत कान्हादेशावर निकुंभ राजवंशाचे राज्य होते. याचा पुरावा म्हणजे कान्हादेशात निकुंभ राजांचे शिलालेख मिळाले आहेत त्याचप्रमाणे निकुंभ राजवंशाची संपूर्ण वंशावळ तर मिळत नाही पण जे काही शिलालेख मिळाले त्यावरून निकुंभ राजांनी मंदिर बांधले, ब्राह्मणांना भूमी दान दिली याची माहिती मिळते. त्या शिलालेखांच्या आधारावर काही निकुंभ राजांचे नाव मिळतात ते पुढे देत आहे.
●आलाशक्ति
●जयशक्ती
●देवशक्ती
●वैरदेव
●सोयदेव
●हेमादिदेव
●कृष्ण
या सर्व निकुंभ राजांचे नाव शिलालेखातून मिळतात पण यामध्ये कोण कोणाचे पिता व कोण कोणाचे पुत्र आहेत हे सांगू शकत नाही कारण या सर्व राजांचा शासन काळ देखील वेगवेगळा आहे. त्याचप्रमाणे निकुंभ साम्राज्याची राजधानी निश्चितपणे सांगता येत नाही पण निकुंभ राजांचे सर्वाधिक शिलालेख हे महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव मध्ये मिळालेले आहेत तर या आधारे निकुंभ साम्राज्याची राजधानी चाळीसगाव ला आपण मानू शकतो.
चाळीसगाव मधले प्रसिद्ध पाटणादेवी मंदिर हे देखील निकुंभ राजांनी 12 व्या शतकात बांधले होते हे देवीच्या शक्तिपीठांपैकी एक शक्तीपीठ देखील आहे. सरसेनापती येसाजी कंक यांचे कंक घराणे देखील निकुंभ म्हणजे निकम कुळाची शाखा आहे. आजच्या क्षत्रिय मराठ्यांच्या 96 कुळातील #निकम कुळातील लोक निकुंभ राजवंशाचे वंशज आहेत. निकम कुळाचा वंश #सूर्य आहे व गोत्र #पराशर आणि #मानव्य आहे.
लेखक :- आशिष इंगळे पाटील
इकडे तेच निकम पुढे देवगिरी यादव यांचेकडे चाकरी करून राहिले... सम्राट अकबर याला महाराष्ट्र मध्ये प्रथम भिडणारे म्हणजे निकम देशमुख आहेत.. पाश्चिम महाराष्ट्रात विशेषता सातारा प्रांतात त्यांनाच बर्गे, खलाटे, पन्हाळे , साबळे, तावरे या आडनावाने ओळखतात...लढाऊ वृत्ती असलेल्या निकम यांच्या घोडदळ प्रमुख याला बर्गे हा किताब मिळाला.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...