विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 21 December 2023

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔ अग्निदिव्य __📜⚔🗡भाग -19


 

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜
अग्निदिव्य
__📜🗡भाग -19 📜🚩🗡___
लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार
_🚩📜🚩___


नेताजींनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्यांचे सारे अंग ठणकत होते. अंगात ताप फणफणलेला होता. मस्तक गरगरत होते. आपण कुठे आहोत हे त्यांच्या लक्षात येत नव्हते. त्यांनी डोळ्यांची उघडझाप केली. आठवणींना ताण दिला. त्यांना जाणवले, ते आदबखान्याच्या तळघरातील कुबट कोठडीच्या फरशीवर पसरलेल्या गरम राखेत वा खिळे मारलेल्या तक्त्यावर झोपलेले नसून महालाच्या एका दालनात प्रशस्त आणि आरामदायक पलंगावर झोपले आहेत. त्यांच्या डोळ्यांवर उजेड येणार नाही अशा बेताने कोपऱ्यात ठेवलेल्या मिणमिणत्या दिव्याच्या अंधूक प्रकाशात त्यांना दिसले, पलंगाशेजारी एक स्त्री पेंगत पंख्याने यंत्रवत वारा घालीत आहे. त्यांनी उठण्यासाठी हालचाल करण्याचा प्रयत्न केला पण पाठीतून – कंबरेतून जबरदस्त कळ निघाली. त्यांच्या कण्हण्याच्या आवाजाने ती स्त्री सावध झाली आणि तिच्या तोंडातून सहजोद्गार बाहेर पडले–

या अल्ला! आप जग गये!! अल्ला की खैर है!!!
तिने घडवंचीवरील पेल्यातील द्रवाचे काही थेंब त्यांच्या अर्धवट उघड्या मुखात सोडले. ते मध मिसळलेले पाणी असावे. त्यांच्या कोरड्या घशाला किंचित बरे वाटले. छळ सोसत कैदेत, तळघरात खितपत असताना छळणाऱ्या काळ्याकभिन्न सिद्दी शिपायांशिवाय अन्य कोणाचे कित्येक महिन्यांत त्यांना दर्शन झाले नव्हते. आणि आता महालातल्या सुखकारक प्रशस्त पलंगावर शिवाय सेवेला मुस्लीम स्त्री. काही समजेना. त्यांना वाटले, अति छळाने आपल्याला भ्रम झाला आहे म्हणूनच असे काहीबाही विचित्र भास होत आहेत.

त्यांनी आठवण्याचा प्रयत्न केला. डोक्याला बराच ताण दिला, पण त्या श्रमांनी त्यांना थकवा आला आणि पुन्हा ग्लानी आली. ते पुन्हा किती वेळ ग्लानीत होते त्यांना समजले नाही. पण बऱ्याच व्यक्तींच्या वावरण्याच्या चाहुलीने त्यांना पुन्हा जाग आली. बहुधा दिवस निघाला असावा. कारण खोली प्रकाशाने उजळली होती. कोणी एक मोगली उमराव त्यांचा चेहरा न्याहाळत पलंगाशेजारी ओणवून उभा होता. त्यांनी डोळे उघडलेले पाहून त्याच्या गंभीर चेहऱ्यावर हसू उमटले. स्नेहाळ शब्दांत तो उमराव म्हणाला–
सलाम आलेकूम जनाब महम्मद कुलीखान! आपण जागे झालेले पाहून मोठाच आनंद झाला. गेल्या सात दिवसांपासून आपण बेहोश आहात. आपल्या जखमांमधून लाल मुंग्यांचे विष फार मोठ्या प्रमाणात शरीरात भिनले आहे, असे हकीमसाहेब सांगत होते. आपल्या जिवाला जर काही अपाय झाला असता तर आलाहजरतांनी मला जिवंत सोडले नसते. अल्लाची खैर आपल्याला शुद्ध आली. आता कसे वाटते?
उत्तरादाखल त्यांच्या तोंडून फक्त कण्हण्याचाच आवाज निघाला. त्या उमरावाने त्यांच्या कपाळावर हलकेच थोपटत पुन्हा त्याच स्नेहाळ आवाजात म्हटले–

ठीक है। तुम्ही तकलीफ घेऊ नका. आराम करा. हकीमसाहेबांना निरोप गेला आहे. येतील ते एवढ्यातच. आपण जागे झाल्याची खुशखबर मी आजच आलाहजरतांच्या कानी घालीन. फुरसत मिळाली की, मी सायंकाळी येईन भेटायला. खुदा हाफिज।

हा उमराव आपल्याला सलाम काय करतो? कुलीखान म्हणून काय हाक मारतो. आपल्या जिवाचे बरेवाईट झाले तर त्याच्याशी याच्या बादशहाचा काय संबंध? तो याला काय म्हणून सुळावर देईल? नेताजींना काहीच कळेना. विचार करीत ते तसेच निपचित पडून राहिले. बऱ्याच वेळाने हळूहळू त्यांना एकेक आठवू लागले. कैद, छळ, महाराजांचा निरोप घेऊन आलेला बहिर्जीचा नजरबाज, धर्मांतराचे सोपस्कार… सारे सारे लख्ख आठवले. त्यांच्या डोळ्यांतून पाण्याच्या धारा लागल्या, पण डोळे पुसण्यासाठी हात उचलण्याचेसुद्धा त्राण अंगात उरले नव्हते. मनाच्या अस्वस्थ स्थितीत पुन्हा त्यांची शुद्ध हरपली.
-
महाराजांच्या महालातील चोरदरवाजावर खुणेची दस्तक झाली. महाराजांनी उठून दिंडी उघडली. बहिर्जी नाइकाने महालात प्रवेश केला आणि तडक दरवाजाला अडसर लावला. मुजरा घालून अस्वस्थ चुळबुळ करीत तो उभा राहिला. महाराज एकटक निरखीत राहिल्याने त्याची अस्वस्थता वाढत गेली.
हं नाईक, बोला. काय बातम्या आहेत? या खेपी येण्यास बराच उशीर झाला. का?
मापी असावी म्हाराज, पन काही महत्त्वाच्या बातम्यांची खातरजमा करून घेण्यात स्वत: गुंतल्यानं जरा ज्यादा येळ लागला खरा.
त्यानंतर अनेक ठिकाणच्या महत्त्वाच्या बातम्या अगदी बारीकसारीक तपशिलांसह महाराजांच्या कानी घालून तो पुन्हा पायदळी नजर लावून उभा राहिला.

ठीक, पण आग्र्याची बातमी काय ते नाही सांगितले?
म्हाराज, म्हटलं तर बातमी चांगली हाय, पन म्हटलं तर लई भयंकर हाय. कशी सांगू उमगंना झालंया.

उगा घोळवत बसू नका. जे जसे आहे ते तसेच सांगा. जिवाला घोर लागतो.
आपला मानूस फुलादखानाच्या गोतावळ्यात घुसवला ह्ये तर मागंच सांगितलं. त्यानं मोका गावताच नेताजी सरकारांना वळख पटवली आनि आपला सांगावा सांगितला. नशिबानं साथ दिली म्हनून त्याला मोका गावला असं म्हनाया हवं कारन त्याच पेशीच्या वख्ताला बादशहा त्यांना गारद करन्याचा हुकूम देनार अशी मुस्तकीम खबर व्हती.
नेताजीकाकांनी त्याच्यावर विश्वास कसा ठेवला?

म्हाराज, मानूस खास माझ्या दस्त्यातला हाय. त्येची गोंदनाची खून त्येंच्या परिचयाची हाय. तसलं गोंदन असनारा खबरी कोनी ऐऱ्यागैऱ्या न्हाय तर येकदम खास, पक्क्या भरोशाचा आनि आपल्यासाठी थेट काम करनारा असतू ह्ये त्ये जानतात. तवा त्येंनी इस्वास ठेवला.
ठीक, मग पुढे?

पुडची खबर लई भयंकर हाय म्हाराज. जबान रेटंना सांगन्यास. त्याच दिशी अति छळवनुकीपाई नेताजी सरकार कोसळलं. त्येंनी मुसलमान होयाच कबूल केलं. त्यानंतर त्येंना आदबखान्यातून काडून शेरात हलवतील असा अंदाज व्हता. आपली मानसं टेहळनीवर व्हतीच. जरा जरी मोका मिळता म्हाराज, तरी हर प्रयत्न करून सरकारांना पळवून नेलं असतं. समदी तयारी चोख व्हती. पर बादशहा लई चलाख. त्येनं सरकारांना किल्ल्यातच ठेवला अन् त्याच राती सोता आपन त्येंना मुसलमान करून घेतलं. हाली सरकार लई बीमार हायती. खुद्द वजीर जाफरखान त्येंना आपल्या जनानखान्यात ठेवून त्येंची निगरानी करतुया. क्षणाचा बी मोका गावला न्हाई म्हाराज, नाय तर ह्ये अक्रीत इतक्या आसानीनं घडतं ना.
हंऽऽऽ! अखेर नेताजीकाकांना धर्मांतर करावेच लागले तर. जगदंब! जगदंब!! जगदंब!!! उद्या सकाळी ही बातमी आम्हाला सांगण्यासाठी म्हणून मोरोपंतांना द्या. यातला काय तपशील वगळणे ते तुम्हास निराळे सांगायची गरज नाही. नेताजीकाकांच्या भोवती आपली माणसं पेरण्याचा यत्न करा. ते मुसलमान झाले म्हणून ढिलाई नको. संधी साधून त्यांना परत आणण्याची कोशिश जारी ठेवा. या आता.

दुसऱ्या दिवशी सदरेवर मोरोपंत अंमळ उशिरा आले. त्यांची चर्या म्लान होती. नजर सैरभैर होती. अस्वस्थपणे ते उपरण्याने सतत घाम पुशीत होते. महाराजांना मुजरा करून ते तसेच उभे राहिले. आपल्या जागेवर गेले नाहीत.
या मोरोपंत. आज उशीरसा? आणि चर्या ही अशी उतरलेली? प्रकृती तर ठीक आहे ना?

जी. आई भवानीच्या कृपेने आमच्या प्रकृतीला काही झालेले नाही. पण स्वराज्याच्या प्रकृतीची मात्र काळजी उत्पन्न व्हावी असे काही घडले आहे.
त्यांच्या स्वरातील कटू उद्विग्नता लपून राहणारी नव्हती. वास्तविक मनातले भाव चेहऱ्यावर अथवा कृतीत उमटावे इतके ते कच्चे नव्हते; त्यामुळे सदरेचे कान टवकारले गेले.

अस्सं? असे काय घडलेय ज्याचा तुमच्या जिवाला इतका घोर लागावा?
महाराज, बातमी अगदीच वाईट आहे. नेताजीरावांसंबंधीची आहे.
अस्सं? ते बादशहाच्या कैदेत आहेत आणि सिद्दी फुलादखान आमचा राग त्यांच्यावर काढतो आहे अशी खबर होती. त्यांचे काही बरेवाईट…?

तसे झाले असते तरी परवडते. महाराज, निदान स्वराज्याची मान ताठ राहती. मोगली छळापुढे डबीर आणि कोरड्यांसारखे ब्राह्मण तगले, पण स्वराज्याचे सरनोबत, प्रतिशिवाजीच जणू अशी कीर्त मिळवलेले नेताजीराव मात्र पार कोलमडले. त्यांनी मुसलमान व्हायचे कबूल केले आणि वेळ न गमावता त्याच रात्री स्वत: आलमगीर बादशहाने त्यांना स्वहस्ते धर्मदीक्षा दिली. नवे मुसलमानी नाव दिले, महम्मद कुलीखान. त्यांना वजीर जाफरखानाच्या जनानखान्यात त्याच्या खास निगराणीत ठेवले आहे. आजारी आहेत. कोंडाजी पालकर आणि त्यांचे सारे कुटुंबसुद्धा बाटले अशी खबर आली आहे.
खबरीची खातरजमा करून घेतली?
स्वत: बहिर्जी खबर घेऊन आला आहे. त्याने स्वत: खात्री करून घेतली आहे. खबर खोटी ठरली तर काय नतीजा पावेल हे तो चांगले जाणतो. संशयास जागा नाही.

काही कल्पना नसताना आकाशातून विजेचा लोळ कोसळावा तशी बातमी सदरेवर कोसळली. सारी सदर पाषाणवत झाली. वातावरण विषण्ण झाले. नजरा पायतळ धुंडाळू लागल्या. महाराजांच्या प्रदीर्घ नि:श्वासाने शांतता भंगली.

जगदंब! एकदा पुरुषाच्या पतनाला सुरुवात झाली की, मर्यादा उरत नाही हेच खरे. आमच्या शब्दांचा राग धरून नेताजीकाका सोडून गेले. आम्हासोबत इतकी वर्षे स्वराज्यात राहून त्यांना मोगल ओळखता आला नाही. वड्याचे तेल वांग्यावर हा त्यांचा नेहमीचा खाक्या. आम्ही निसटलो. त्याने नेताजीकाकांना अडकवले. दुर्भाग्य उभे ठाकले की, बुद्धी तशीच चालते. या बातमीमुळे कुठे फंद उभा राहणार नाही, अवाजवी अफवा, बाजारगप्पा पसरणार नाहीत याची चोख काळजी घ्या. कोणी विपरीत वागू धजेल तर त्याचा मुलाहिजा करू नका. अनाजी, मोरोपंत सदर पुढे चालवा. तिसरे प्रहरी खलबतखान्यात बसून पुढचे ठरवता येईल.
बोलता बोलता महाराज सदरेवरून उठून गेले.
-
महाराज सदरेवरून उठले ते थेट आईसाहेबांच्या महाली आले. आईसाहेबांच्या सर्व सुना सकाळच्या नमस्कारासाठी त्यांच्या महालात जमल्या होत्या. महाराज वर्दीशिवाय आलेले पाहून त्यांची एकच धांदल उडाली. प्रत्येकाशी जुजबी बोलून महाराजांनी त्यांना बाहेर काढले; फक्त पुतळाबाई राणीसाहेबांना थांबवून ठेवले. सोयराबाईंनी रेंगाळण्याचा प्रयत्न करू पाहिला पण अखेर त्यांनाही निघावे लागलेच. सर्वांना बाहेर काढून आपल्यालाच मागे का थांबविले असेल या विचाराने पुतळाबाईंचा जीव धास्तावला. नेताजीकाकांसंबंधीच काही अशुभ बातमी असावी अशी त्यांनी अटकळ बांधली. धडधडत्या छातीवर हात ठेवून, पदर ओढून त्या नवऱ्याचे भाव निरखत उभ्या राहिल्या. त्यांच्याकडे तिरपा कटाक्ष टाकीत आईसाहेब म्हणाल्या–

शिवबा, काही विशेष? वर्दी न पाठवता असा अचानक आलास. काही गंभीर बाब?

नुसती गंभीर नव्हे आईसाहेब, स्वराज्यावर वङ्काघात करणारी खबर मोरोपंतांनी आणली आहे.
आता आणखी कोण चालून येतोय? स्वत: आलमगीर दक्षिणेत उतरतोय की काय?

गनिमांचा एखादा सरदार चालून येता वा तुम्हास वाटले तसा खासा आलमगीर येता तरी निभावता. पण बादशहाने या खेपी नेमका वर्मी घातलाय. नेताजीकाका छळापुढे नमले. मोडले. अखेर मुसलमान झाले.
काय सांगता? जगदंब! जगदंब!!
तोंडातल्या पदराच्या बोळ्याला न जुमानता बाहेर पडलेल्या हुंदक्याने माय-लेकांचे लक्ष वेधून घेतले. पुतळाबाईंनी विद्ध नजरेने आईसाहेबांकडे पाहिले. त्यांच्या नजरेतील कणव, माया आणि आश्वासन पाहून सारी लोकलज्जा बाजूला ठेवून त्या जखमी वासरागत सासूच्या कुशीत शिरल्या. त्यांनी आपल्या दु:खाला मोकळी वाट दिली. सुनेला कवेत घेऊन आईसाहेब मायेने थोपटू लागल्या. महाराज पुढे सांगत राहिले.

दिलेरखानाने त्यांचा सारा कबिला कैद करून आग्र्याला रवाना केला होता. नेताजींचा काका आणि साऱ्या बायकासुद्धा बाटवल्या गेल्या.
शिवबा, अरे विश्वास ठेवायला जड जाते सारे. नेताजींसारखा खंदा मोहरा असा फशी पडावा? केवळ अतर्क्य! त्यांना परत आणण्याची तजवीज करावी. मोगली गोटात त्यांचे अशा अवस्थेत असणे स्वराज्याला फारच धोकादायक ठरू शकते. जो न्याय निंबाळकरांस लावला तोच न्याय त्यांनासुद्धा लावावा. भावनेच्या ऊर्मीत त्यांची चूक झाली असेल, पण आता त्यांनी चुकीचे पुरेपूर शासन भोगले आहे. एवढा बाका मोहरा हातचा गमावू नये.

सासूचे बोलणे ऐकून पुतळाबाईंना नव्याने उमाळा आला. त्यांच्या गदगदत्या शरीराकडे कणवेने पाहत महाराज जणू त्यांनाच उद्देशून बोलत असल्याप्रमाणे आश्वासक स्वरात बोलले–
आम्ही तेच ठरवीत आहोत. पण त्याची उघडपणे चर्चा करणे ठीक नव्हे. आम्ही त्यांना परत आणण्याच्या खटपटीत आहोत असा नुसता संशय आला तरी आलमगीर त्यांचे मुंडके उडवेल. पेच बाका आहे. प्रत्येक पाऊल विचारपूर्वकच टाकावे लागणार. पण चिंता नसावी. आई यश देईलच.

मुसमुसणाऱ्या सुनेला थोपटीत आईसाहेब मायेने म्हणाल्या–
पुतळा, उगी बाळ. आवर स्वत:ला. नेताजी तुझ्या माहेरचा म्हणून शिवबाने तुला आम्हादेखत खबर दिली. त्याने परत आणतो म्हणून वचन दिले ना? मग आकाश कोसळो वा धरणी दुभंगो; तो ते पूर्ण करणारच. ऊठ. डोळे पूस. पोरी, भोसल्यांची सून आणि त्यातही शिवाजी भोसल्याची बाईल होणे म्हणजे सतीचे वाण! ते पेलणे येऱ्यागबाळ्याला साधणे नाही. जा बेटा. आपल्या महाली जा. सावर स्वत:ला. हा वङ्काघात इथेच पचवायचा. या महालातून बाहेर पडताना कोणाला वाटता कामा नये काय घडलेय आत ते. जाताना दारावरच्या बटकीला बजावून जा. म्हणावे, आम्ही बोलावल्याशिवाय आत डोकावू नको आणि कोणालाही आत सोडू नको, जोपर्यंत राजे आमच्या संगाती आहेत. उगी बाळा. जा. नीघ आता.

थोडे अवसान घेऊन पुतळाबाई उठल्या. देवघरासमोर माथा टेकून त्यांनी नमस्कार केला. नंतर सासूच्या आणि नवऱ्याच्या पाया पडून त्या आवेगाने महालाबाहेर पडल्या. आपल्या मागे त्यांनी धाडकन कवाड लावून घेतले. त्या गेल्या त्या दिशेला आईसाहेब बराच वेळ बघत राहिल्या. मग एकवार त्यांनी महाराजांच्या उदास गंभीर चेहऱ्याकडे कटाक्ष टाकला आणि देव्हाऱ्यातील महादेवाच्या

टाकाकडे त्या बघत राहिल्या. बहुधा त्या शब्दांची जुळवाजुळव करीत असाव्यात. मग त्यांनी थेट महाराजांच्या नजरेस नजर भिडविली.
एवढ्या क्षुल्लक निमित्ताने सरनोबतीचा शिरपेच मिरवणारा स्वराज्याचा बांका शिलेदार वतनाच्या लोभापायी गनिमाच्या गोटात सामील होईल हे काही केल्या आमच्या मनास येत नाही. तो काही लेचापेचा गडी नाही. तळहाती शिर घेऊन स्वराज्यासाठी आकाश-पाताळ एक करणारा, प्रसंगी धर्मासाठी मरण पत्करण्यास सिद्ध असणारा; तुमचे कर्म, धर्म, वर्म पुरते जाणणारा, तुमचा जणू बहिश्चर प्राण असणारा खंदा वीर सहजासहजी धर्म सोडून देईल? विश्वास ठेवणे शक्य नाही शिवबा.
महाराज चमकले. मग झटकन उठून आईसाहेबांच्या पायाशी बसले. दोन्ही हात त्यांच्या मांडीवर ठेवून आपली स्थिर नजर त्यांनी त्यांच्या स्निग्ध नजरेत मिसळून दिली. काही क्षण तसेच गेले.

आईसाहेब, आमचे प्रत्येक स्पंदन, हरएक श्वास आपण पूर्ण ओळखता. आमची कोणतीही कृतीच काय पण मनात उठणारा प्रत्येक बरा-वाईट विचार तरंगसुद्धा आपण स्पष्टपणे जाणून असता. स्वप्नातसुद्धा आम्ही आपल्याशी असत्य वागू-बोलू शकत नाही. पण या क्षणी सत्य बोललो तर कार्यहानीचे भय वाटते. म्हणून विनवतो, अधिक काही जाणून घेण्याचा आग्रह धरू नये. पुतळालाच नव्हे तर आम्ही ते वचन आपल्यालासुद्धा दिले आहे. आम्हाला आपल्या पायांची शपथ आहे.
आवेगाने पाय शिवून महाराज महालातून निघून गेले. आईसाहेबांनी दीर्घ नि:श्वास सोडला. काय होते त्यात? समाधान? विषाद? चिंता? पुत्रप्रेमाचा विश्वास? की अजून काही? कदाचित सारेच एकवटले असावे. देव्हाऱ्यासमोर माथा टेकून त्यांनी नमस्कार केला. पदराने डोळे कोरडे करीत त्यांनी जपमाळ हातात घेतली.
-

हळूहळू कुलीखानाची प्रकृती सावरू लागली. वजीर जाफरखान दररोज दोन वेळा येऊन जातीने विचारपूस करीत होता. सेवेत असलेल्या बांदी-बटकी आस्थेने शुश्रूषा करीत होत्या, तरी हिंडतेफिरते होण्यास दोन-तीन आठवड्यांचा काळ गेलाच. एक दिवस सायंकाळी दोन खोजांच्या मदतीने त्याला जनानखान्याच्या बगिच्यात आणून बसविले गेले. कित्येक महिन्यांनंतर तो खुले अस्मान पाहत होता. मुक्त वाऱ्याच्या झुळका अंगावर घेत होता. सरत्या उन्हाळ्याचे दिवस होते. आसपास कुठेतरी वळीव बरसून गेला असावा; त्यामुळे गरम वाऱ्याची धग उणावून किंचित सुखद गारवा आला होता. सायंकाळी फुलणारी फुले सभोवतालचे वातावरण सुगंधित करीत होती. माळ्याने हिरवळीवर पाणी घातल्याने मंद मृद्गंध वातावरण उल्लसित करीत होता. दूर वेलींच्या आडोशाला, बंदिस्त कुंजात काही स्त्रियांचा खेळ सुरू असावा. त्यांच्या मुक्त हास्याच्या लहरी वातावरण उल्लसित करीत होत्या. या प्रसन्न वातावरणाने शरीर प्रफुल्लित होऊन उठले. असे असले तरी काही वेळाने त्याच्या मनात घरच्या, महाराजांच्या, स्वराज्याच्या आठवणी दाटून येऊ लागल्या. मनावर उदासीची साय धरू लागली.

वजीरेआझम येत असल्याची वर्दी घेऊन एक बांदी आली. आता वजीर त्याचा वरिष्ठ होता; त्यामुळे योग्य ते नियम पाळून त्याचा मान राखणे क्रमप्राप्त होते. वजीर समोरून येताना दिसताच कुलीखान कुर्निसात करीत उभा राहिला. जाफरखान जलदीने पावले टाकीत पुढे झाला आणि हाताला धरून त्याला बैठकीवर शेजारी बसविले.

अजी जनाब कुलीखान, बीमार माणसाला हे दरबारी रिवाज माफ असतात. आज तुम्हाला असे मोकळ्या हवेत पाहून मनाला फार बरे वाटले. त्या बेवकूफ फुलादने जरा ज्यादतीच केली. पण तो तरी बिचारा काय करणार? तुम्ही मानतच नव्हता. शिवामागोमाग तुम्ही त्याला अपयश दिले असते तर कोणी स्वप्नातसुद्धा विचार करू शकणार नाही असे मरण त्याच्या वाट्याला लिहिले होते. आता झाले गेले विसरायचे आणि भविष्याचा विचार करायचा. आलाहजरतांची मर्जी तुमच्यावर बहाल आहे. त्याचा फायदा करून घ्या आणि स्वत:ची उन्नती साधून घ्या. आलमपन्हांच्या मर्जीप्रमाणे वागाल, तर स्वप्नातसुद्धा चिंतले नसेल असे वैभव मिळवाल.
अशा प्रकारे बऱ्याच गप्पागोष्टी झाल्या. तोपर्यंत मगरीबच्या नमाजाची अजान झाली. जाफरखान जाण्यास उठला. उठू पाहणाऱ्या कुलीखानाच्या खांद्यावर थोपटून त्याला खाली बसवत म्हणाला–

असू दे. असू दे. तुम्ही आराम करा. आता तुमची तबियत सुधारते आहे. उद्या सकाळपासून मौलवीसाहेब येऊन तुमची दीनी तालीम सुरू करतील. ध्यान देऊन शिका. तुम्हाला काही ते फार कठीण जाणार नाही. फक्त त्यात मन लावा. आता हळूहळू थोडी हलकी वर्दिश पण सुरू करा.

सकाळी-संध्याकाळी व्हरांड्यात किंवा बगिच्यात झेपेल इतकी चहलकदमी सुरू करा. लवकरच तुम्हाला हजरत आलमपन्हांच्या समोर दरबारी पेश व्हावे लागेल. त्यांच्यासोबत नमाजात शरीक व्हावे लागेल. त्यासाठी दरबारी रस्मोरिवाज आणि नमाज पढण्याचा तरीका व्यवस्थित शिकून घ्या. उगीच एखाद्या क्षुल्लक चुकीमुळे अलीजांची मर्जी खफा व्हायला नको.
गुस्ताखी माफ असावी वजीरेआझम, कदाचित तुम्ही मला पागल ठरवाल पण तुमचा स्नेह आणि आत्मीयता पाहून मनाला मोठा धीर येतो. आता मला तुमचाच आधार राहिला आहे. आपण एकटे एकाकी, बहिष्कृत नाही असा विश्वास वाटतो; त्यामुळे तुमच्यासमोर मन मोकळे करावेसे वाटते. मनास अनेक दिवसांपासून एक सवाल छळतो आहे. इजाजत असेल तर विचारीन म्हणतो. मात्र एक इंतजा आहे, सवाल गैरलागू वा गलत असला तर गैरसमज न करता माफ करावे आणि बंद्याची गलती दाखवून द्यावी म्हणजे आयंदा विचार करताना तशी काळजी घेऊन मनाला योग्य वळण लावता येईल.
पूछो. बेझिजक पूछो. आम्ही गैरसमज करून घेणार नाही. खात्री देतो. मात्र सवाल कोणाची बदनामी वा बेअदबी करणारा नसावा.
जी. असे म्हणतात की, मुसलमान झाल्यावर तोंडात गाईचे मांस कोंबतात. मी बेशुद्ध असताना असे काही केले गेले का?

प्रश्न ऐकून वजीर एकदम गंभीर झाला.
महम्मद कुलीखान, असे कधी काही होत नसते. बरे झाले तुम्ही असला प्रश्न मलाच विचारलात मात्र असले बेतुके प्रश्न पुन्हा कधी कोणा दुसऱ्याला विचारू नका. तुम्हाला तो कितीही जवळचा आणि विश्वासाचा वाटत असला तरी, नाही. मनाला आवर घाला. अशा प्रश्नांचा अर्थ तुमच्या मनात कुफ्र अजून जागे आहे असाच घेतला जाईल. नीट ध्यानी घ्या, ती इस्लामची नाफर्मानी समजली जाईल. शरियत आणि कुराणशरीफप्रमाणे या गुन्ह्यांसाठी फक्त सजाए मौतच सांगितली आहे. सावध राहा. सांभाळून वागा. खुदा हाफिज।
जाफरखान वजीर निघून गेला. कुलीखानाच्या मनात लख्खकन वीज चमकली. छळ, आजारपण आणि मानसिक ताणामुळे विचारशक्ती क्षीण झाल्याचेच, अशा प्रकारे काही

कोणाला विचारणे हे लक्षण आहे; हे त्याच्या नीट ध्यानी आले. तो जे काही दिव्य करीत होता, ते मराठी गनिमी काव्याचाच भाग होता. गनिमी काव्यात स्वत: मरून जाऊन हुतात्मा होण्याला फारसे महत्त्व नसते, तर आपण जिवंत राहून, धडधाकट राहून, सुरक्षित राहून; प्रसंगी नमते घेऊन, चार पावले माघार घेऊन शत्रूला गाफील करणे आणि गाफील क्षण, शत्रूची अडचण साधून नेमका घाव घालून शत्रूवर मात करण्याला महत्त्व असते. पण थोडी गफलत झाली, तर थेट प्राणांशीच गाठ. त्याच्या लक्षात आले की, आपण हे जे दिव्य आरंभले आहे ते अशा क्षुल्लक गफलतीने मातीमोल व्हायला नको. आता अष्टौप्रहर सावध राहिले पाहिजे; अगदी झोपेतसुद्धा. भोवतालची प्रत्येक व्यक्तीच नव्हे तर अगदी भिंत, पडदा, खांब, झाड आणि झुडूपसुद्धा आपल्यावर नजर ठेवणारे आलमगिराचे खास हेर आहेत असेच समजून वावरायचे. वागायचे आणि बोलायचे.

गेल्या कित्येक दिवसांत विचार करण्याची, सुसंगत अन् तर्कनिष्ठ विचार करण्याची सवयच तुटली होती. मन आणि मेंदू क्षीण झाले होते. या विचार करण्याने त्याच्या मनावर मोठाच ताण आला. त्या ताणामुळे त्याला इतका थकवा आला की, उठून उभे राहणे शक्य होईना. जोरदार भोवळ येऊन तो बसल्या जागीच कोसळला. अखेर काही खोजांनी आणि बटकींनी त्याला उचलून खोलीत नेले आणि पलंगावर नीट झोपविले. त्याला लगेच ग्लानी आली.
-
रात्रभर कुलीखान ग्लानीतच होता. ग्लानीतच चित्र-विचित्र स्वप्ने पडत राहिली; त्यामुळे कधी मध्येच दचकून जाग येई. पहाटेच्या सुमारास जरा शांत झोप लागली. सकाळी शाही हकीम मुल्ला सय्यद अहमद रोजच्याप्रमाणे प्रकृती तपासण्यासाठी आला, तेव्हाच मग बांदीने जागे केले. प्रकृती तपासून मुख्य बांदीला औषधे आणि पथ्य-पाण्याच्या सूचना देऊन आणि त्याच्याशी जुजबी बोलून हकीम निघून गेला. सकाळची आन्हिके आटोपून न्याहारी सुरू असताना मोती मशिदीचा पेश इमाम मौलाना मसूद अहमद कुरेशी येऊन बसल्याची वर्दी घेऊन खोजा आला. जनानखान्याच्या दरोग्याने चार तार्तर बाया हत्यारबंद करून सोबत दिल्या. कुलीखानाला कोणत्याही कारणासाठी नजरेआड न होऊ देण्याची आणि दोन्ही पुरुषांवर बारीक नजर ठेवण्याची सख्त सूचना त्याच्या देखतच दिली. त्याच्या सेवेतील मुख्य बांदी आणि वर्दी घेऊन आलेल्या खोजाच्या मागोमाग कुलीखान इमामाला भेटण्यास निघाला.
भेटीचे प्राथमिक उपचार आणि सलाम दुवा झाल्यानंतर इमामाने कुलीखानाला इस्लामी तरीक्याने नीट बसवून घेतले. स्वत: शेजारी बसला.
जनाबे आली मेरे पीछे दोहराइये – ‘बिसमिल्ला उर् रहिमाने रहीम’ कहो.
कुलीखानाने नीट लक्ष देऊन ऐकले आणि एकेक शब्द सावकाश उच्चारत बिनचूकपणे तसेच म्हटले. इमाम खूश झाला.

सुभानअल्ला! बहोत खूब! माझा मुर्शद लवकरच सारे काही शिकून घेईल याची मला खात्री आहे. आत्ता आपण जे म्हटले त्याचा अर्थ आहे की, मी परमदयाळू अल्लाच्या नावाने प्रारंभ करतो. प्रत्येक श्रद्धावान नेक मुसलमान बंदा आपली प्रत्येक कृती ही दीन आणि दुनियेचा प्रत्यक्ष मालक असणाऱ्या अल्लाच्या नावानेच करतो. मग ते जेवणासारखे साधे काम असो किंवा अन्य कोणते महान दैवी काम असो. प्रत्येक कृतीचा कर्ताकरविता अल्लाच असतो अशी त्याची दृढ श्रद्धा आहे.
जी. आले ध्यानात.

आज मी आपल्याला इस्लामची माहिती थोडक्यात सांगतो. एकदा ते नीट समजले की दोन-तीन दिवसांत आपण नमाज पढायला शिकू. इस्लामचे ज्ञान अपार आहे. एक-दोन बैठकांत सारे सांगणे शक्य नाही. प्रसंगाप्रसंगाने मी आपल्याला त्याची माहिती देतच राहीन. त्यानंतर आपण धर्माचा शास्त्रोक्त अभ्यास करू. ठीक?
जी. ठीक.
इस्लाम या शब्दाचा अर्थ समर्पण. सर्वसाक्षी, सर्वशक्तिमान,

एकमेवाद्वितीय अल्लाला स्वत:स समर्पित करणे. अल्लावर अव्यभिचारी निष्ठा असणारा, त्याच्या मार्गावर अढळ श्रद्धा असणारा, कुराणशरीफ हाच एकमेव प्रमाण ग्रंथ आहे असा विश्वास बाळगणारा, हजरत महम्मद सलल्लाह वसल्लम हे अल्लाने पृथ्वीवर पाठवलेले आखरी पैगंबर आहेत असा अविचल विश्वास असणारा, अखिल मानव समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि अल्लाच्या समीप जाण्याचे इस्लामचे पवित्र ज्ञान ज्या कुराणशरीफमध्ये नंतर समाविष्ट झाले ते प्रत्यक्ष अल्लाने आपल्या आखरी पैगंबरावर हजरत महम्मद सलल्लाह वसल्लम यांचेवर उतरले अशी अविचल श्रद्धा असणारा जो श्रद्धावान नेक बंदा, तोच मुसलमान. अल्लाचा सच्चा भक्त.
अच्छा, म्हणजे फक्त अल्लावर निष्ठा असणारा किंवा फक्त पैगंबरावर विश्वास असणारा मुसलमान होत नाही, तर हे आता आपण जे काही सांगितले ते जसेच्या तसे मानणारा म्हणजेच मुसलमान तर.

बिलकुल दुरुस्त. मात्र पैगंबरसाहेबांचा उल्लेख नुसतेच पैगंबर अथवा नुसतेच महम्मद असा कधी करू नये, तर पैगंबर हजरत महम्मद सलल्लाह वसल्लम असाच करावा. या दुवाचा अर्थ असा की, परमेश्वर - अल्ला - त्यांना चिरंतन शांती बहाल करो.
ठीक. अच्छा।

इस्लामचे पाच अरकान आहेत. प्रत्येक श्रद्धावान मुसलमानाचा त्या सर्व अरकानांवर दृढविश्वास आणि त्यांच्या प्रति समर्पण भाव असला पाहिजे आणि कोणतीही शंका उपस्थित न करता त्यांचे कसोशीने पालन केले पाहिजे. सर्वांत पहिले अरकान म्हणजे इमान. म्हणजे मघा सांगितले त्याप्रमाणे श्रद्धा व अविचल निष्ठा. म्हणूनच आपण नेहमी कलमा पढून आपला विश्वास, इमान व्यक्त करीत असतो. इमान नुसते मनात बाळगून उपयोगाचे नाही ते व्यक्त झाले पाहिजे. दुसऱ्यांना समजले पाहिजे. म्हणून त्याचा हरहमेश उल्लेख करावा.
समजलो.
दुसरे अरकान नमाज. प्रत्येक श्रद्धावान मुसलमानाने दिवसातून पाच वेळा अल्लाच्या सेवेत नमाज अदा करणे अत्यावश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत याला अपवाद करता येत नाही. नमाज एकट्याने पढला असता जे पुण्य मिळते त्याच्या सातपट पुण्य बाजमात म्हणजे सामूहिक पढला असता मिळते. नमाज पढताना आपला मोहरा किबल्याच्या म्हणजे मक्केच्या दिशेने ठेवावा. मक्का हिंदोस्तानच्या पश्चिमेस आहे म्हणून आपला मोहरा पश्चिमेकडे असतो पण ती तुर्कस्तानच्या दक्षिणेस, तर सीरियाच्या पूर्वेस आहे म्हणून तेथील श्रद्धावान मुसलमान त्या दिशेला तोंड करून नमाज पढतात.
असे आहे तर. पण पाच वेळा म्हणजे कसे?

सगळ्यात पहिला नमाज पहाटे सूर्य उगवण्यापूर्वी आकाशात जो लालिमा पसरतो, तो पसरण्यास सुरुवात होण्यापूर्वी पढतात. त्याला ‘फजरचा नमाज’ असे म्हणतात.

सूर्य माथ्यावरून ढळल्यानंतर एका घटकेने दुसरा नमाज पढला जातो याला ‘जौहरचा नमाज’ म्हणतात. शुक्रवारी होणाऱ्या जौहरच्या नमाजाला फार मोठे महत्त्व आहे, त्या वेळी धर्मगुरू धर्माचे विवेचन करून सांगतात आणि धार्मिक फतवे जारी केले जातात. उन्हाचा तडाखा कमी झाला, उन्हे सौम्य झाली की, सूर्यास्तापूर्वी दीड घटका तिसरा नमाज अदा होतो याला ‘असरचा नमाज’ म्हणतात. सूर्य पूर्ण अस्ताला गेला आहे पण संधिप्रकाश पसरला आहे अशा वेळी चौथा नमाज अदा होतो त्याला ‘मगरीबचा नमाज’ म्हणतात. अंधार पूर्ण दाटून आल्यानंतर सितारे पूर्ण रोशनीने झगमगू लागले असताना पाचवा नमाज पढला जातो याला ‘ईशाचा नमाज’ म्हणतात.
समजलो.

रमजानच्या पवित्र महिन्यात फजरच्या नमाजाच्या आधीपासून ते मगरीबच्या नमाजाच्या अजानपर्यंत प्रत्येक श्रद्धावान मुसलमान उपवास पाळतो. याला ‘रोजा’ म्हणतात. तो तिसरा अरकान आहे. रोजा सुरू असताना दिवसभरात तोंडात पाण्याचा थेंबसुद्धा घेता येत नाही. मगरीबची अजान झाली की, इफ्तारी करून रोजा खोलतात. मग फजरच्या नमाजापूर्वी अजान होण्याच्या आधी सेहरी करेपर्यंत सर्व काही खाण्या-पिण्यास पूर्ण मोकळीक आहे. या पवित्र महिन्यात अल्लाची इबादत करण्याव्यतिरिक्त दुसरे काही करू नये असा संकेत आहे. शव्वाल महिन्यातील पहिल्या चंद्रदर्शनानंतर रोजे संपतात आणि सकाळी ईद साजरी करण्यात येते.
कठीण आहे.

तर? इस्लाम म्हणजे मजाक नव्हे. पुढचे अरकान जकात. ज्या श्रद्धावान मुसलमानाची वर्षभरातील आमदनी एवढी आहे की, जीमधून साडेसात तोळे सोने आणि साडेबावन्न तोळे चांदी एवढी संपत्ती वर्षअखेरीस शिल्लक उरते तर अशा श्रद्धावानाने आपल्या वर्षभरातील संपूर्ण उत्पन्नाच्या अडीच टक्के इतकी रक्कम इस्लामी राज्यास कर म्हणून देणे बंधनकारक आहे. आले ध्यानात?
हो समजले.

पाचवे अरकान आहे हज. जिल्हेजच्या महिन्यात मक्केस जाऊन बैतुल्लामध्ये विराजमान असलेल्या संगे अस्वद काबा शरीकचे दर्शन घेऊन तेथे नमाज पढणे. जिल्हेजच्या दहाव्या दिवशी अल्लाच्या नावे आपल्या कुवतीप्रमाणे कुर्बानी देणे, ज्याला ईद-उल-जुहा म्हणतात त्या दिवशी. चाळीस दिवस त्या पवित्र भूमीत राहून अल्लाची इबादत करणे म्हणजे हज. प्रत्येक श्रद्धावान मोमिन मुसलमानाने आयुष्यात एकदा तरी हजची यात्रा करावी.

इतक्या दूरवर समुद्र ओलांडून जाणे प्रत्येकाला कसे काय शक्य व्हावे?
प्रत्येकाने प्रयत्न तर केलाच पाहिजे. पूर्ण निष्ठेने आणि श्रद्धेने हज करण्याची इच्छा मनात बाळगली तर रहिमाने रहीम परवरदिगारे आला अल्ला ताला बंद्याची ख्वाहिश पूर्ण केल्याशिवाय राहत नाही.
आपण हजची यात्रा केलीत का?
प्रश्न ऐकला न ऐकल्यासारखे करून इमाम पुढे बोलत राहिला.
इस्लामच्या पाच अरकानमध्ये जरी शिरकत केली नसली, तरी प्रत्येक काबिल श्रद्धावान मुसलमानाने पृथ्वीवरून कुफ्र आणि काफिर पूर्ण नष्ट करून आलम दुनिया

दार-उल्-इस्लाम बनवणे, इस्लाम पृथ्वीवर कायम करणे, प्रत्येक मानवाला अल्लाच्या नेक मार्गावर आणून इस्लामच्या झेंड्याखाली एकत्र आणण्यासाठी हाती शस्त्र घेऊन अल्लाच्या नावाने संघर्ष करणे म्हणजे जिहाद. सर्वशक्तिमान अल्लाच्या आदेशावरून जिल्हेसुभानी आलमपन्हांनी त्यासाठीच आपल्याला निवडले आहे. इस्लामच्या नेक राहवर आणले आहे.

प्रतिसादादाखल कुलीखान फक्त जोराने कण्हला. पण तिकडे दुर्लक्ष करून इमाम तसाच पुढे बोलत राहिला.
प्रत्येक श्रद्धावान मुसलमानाचा असा दृढविश्वास आहे की, सर्वशक्तिमान अल्लाच्या, जो या सृष्टीचा एकमेव निर्माता आणि मालक आहे, इच्छेप्रमाणे एक दिवस या सृष्टीचा संपूर्ण विनाश - शेवट होणार आहे. त्या दिवशी म्हणजेच कयामतच्या दिवशी रहेमाने रहीम परमदयाळू क्षमाशील अल्ला आपल्या प्रत्येक नेक बंद्याच्या, मुसलमानाच्या पाप-पुण्याचा हिशेब करून त्याला त्या-त्याप्रमाणे स्वर्ग वा नरक बहाल करणार आहे.
या वेळी कुलीखान जरा जोरातच कण्हला; त्यामुळे इमामाला त्याची दखल घेणे भागच पडले.
असो. बराच वेळ झाला. आज आपण जे शिकलो त्याची मनात उजळणी करा. उद्या हेच जरा अधिक विस्ताराने समजावून घेऊ. काही नवीन शिकू. आता आपल्याला उठणे, बसणे, झुकणे शक्य होते ना? परवापासून आपण एकेक रकातचा नमाज सुरू करू. ठीक?
चालेल.
खुदा हाफिज।
खुदा हाफिज।

इमामाचा निरोप घेऊन कुलीखान आपल्या दालनात परतला. सोबतची बांदी काहीबाही बोलून तिचे इस्लामचे ज्ञान पाजळून त्याला प्रभावित करण्याचा प्रयत्न करीत राहिली पण त्याचे तिकडे लक्षच नव्हते. त्याला नजरेसमोर फक्त महाराजच दिसत होते. मन जपत होते.
‘महाराज, हे सारे तुमच्या आज्ञेखातर. तुमच्या पायाशी येण्याची संधी साधता यावी याचसाठी, केवळ. देवा खंडेराया, यश दे. महाराजांचे पाय पुन्हा दिसू दे.’
-

अमानुष मारहाण आणि आत्यंतिक छळ एवढा झाला होता की, जवळपास दीड महिना उलटून गेला तरी प्रत्येक हालचालीगणिक कुलीखानाच्या शरीरातून कळा निघणे थांबले नव्हते. तरी मूळची काटक शरीरयष्टी आणि इच्छाशक्तीच्या बळावर तो दुखण्यावर मात करण्याच्या प्रयत्नात होता. सुदृढ झाल्याविना जनानखान्यातून सुटका नाही आणि येथून बाहेर पडल्याशिवाय सुटकेचे प्रयत्न करता येणार नाहीत हे स्पष्ट होते. त्याचा खुराक अत्यंत पौष्टिक होता. त्याच्या सेवेत असलेल्या बांदी, बटकी अगदी मन लावून त्याची सेवा शुश्रूषा करीत; त्यामुळे

प्रकृतीमध्ये चांगलीच सुधारणा होत होती. आता त्याने हलका व्यायामसुद्धा सुरू केला होता. त्याचीसुद्धा प्रकृती सुधारण्यास चांगली मदत होत असे.
भोवतालच्या दासी, बटकी, खोजे, पहारेकरणी यांव्यतिरिक्त कुणा पुरुषाशी त्याचा संपर्क येऊ दिला जात नव्हता. शाही हकीम उपचारासाठी येई तेव्हा बुरखा घेतलेली एक दासी उशाशी बसलेली असे. पलंगाच्या दोन्ही बाजूंस दोन सशस्त्र तार्तर स्त्रिया मौजूद असत. याव्यतिरिक्त पडद्याची सख्त झाकपाक असे ती वेगळीच. मौलवीसाहेबांना भेटण्यासाठी अनेक दालने आणि व्हरांडे ओलांडत जावे लागे. तेव्हासुद्धा सोबत सशस्त्र पहारेकरणी आणि दासी असतच.

फक्त वजीर जाफरखान एवढा एकच पुरुष काय तो तेथे मोकळेपणे वावरत असे. साहजिकच होते ते, कारण तो त्याचा स्वत:चा जनानखाना होता. महम्मद कुलीखान त्या जनानखान्यात नजरकैदेत बंद होता. त्याचा बाहेरच्या जगाशी संपर्क पूर्णपणे तुटला होता. दासी आणि बांदी ठरावीक विषयांवर आणि विशिष्ट मर्यादेतच बोलत; त्यामुळे प्रयत्न करूनसुद्धा काही बातम्या समजत नसत. आग्रा शहरातील घडामोडी कळणे जिथे दुरापास्त, तिथे दूरवरच्या स्वराज्यातील बातम्या कुठल्या कळणार?

त्या रांगड्या मराठमोळ्या शिपाई गड्याला अशी इतक्या बायकांच्या सहवासात राहण्याची अजिबातच सवय नव्हता; त्यामुळे त्याची फारच पंचाईत होऊन जाई. स्नान करताना, कपडे बदलताना; एवढेच काय उठता-बसतानासुद्धा त्या बायकांचे अंगचटीला येणे, सूचक कामुक हावभाव करणे, अश्लील बोलणे, बाष्कळ-चावट विनोद करीत राहणे वगैरे चाळ्यांमुळे तो पार संकोचून जाई. मग त्या निर्लज्ज बायका फिदीफिदी हसून त्याची मस्करी करीत. कधीकधी त्याला वाटे या नाजूक नजरकैदेपेक्षा सिद्दी फुलादखानाचा रांगडा आदबखाना परवडला.
हळूहळू नमाज पढण्यात कुलीखान चांगलाच तरबेज झाला. उठणे, बसणे, झुकणे, वाकणे सगळे अगदी बिनचूक जमू लागले. इतकेच नव्हे तर कोणत्या नमाजाच्या वेळी कोणत्या

आयातम्हणायच्या आणि कोणता दुवा पढायचा सारे कसे तोंडपाठ झाले होते. इमाम त्याच्याकडून कुराणातील अनेक आयातपाठ करून घेत होता. त्याला निरनिराळ्या कथा सांगे. कधी कुराणातील, तर कधी हदीसमधील; कधी सिरतुन्नबीमधून, तर कधी इस्लामी तवारीखमधून. आपण सगळे खूप मन लावून शिकतो आहोत, ऐकतो आहोत हे इमामाच्या मनावर ठसविण्यासाठी तो त्याला अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडी. त्या इस्लामी पंडिताची कित्येक प्रश्नांची उत्तरे देताना पार पंचाईत होऊन जाई.

जनाबे आली, साहेबी इमान असणाऱ्या सच्चा मोमिन बंद्याने असले मनात कुफ्र पैदा करणारे सवाल विचारू नयेत. अल्लाच्या सच्च्या मार्गापासून परावृत्त करण्यासाठी सैतान श्रद्धावानाच्या मनामध्ये असले नापाक खयाल पैदा करून बंद्याला गुमराह करण्याची कोशिश करीत असतो. तोच सच्चा मुसलमान आहे जो सैतानाची ही नापाक चाल नाकामयाब करून अल्लाच्या, कुराणशरीफच्या आणि पैगंबर सलल्लाह वसल्लमच्या मार्गावरच चालत राहतो; त्यामुळेच त्याला जिवंत असताना पृथ्वीवर ऐशआराम आणि मेल्यानंतर जन्नत नसीब होतो.
एकदा सारा जनानखाना हादरून गेला. शिव्याशाप, मारझोड, किंकाळ्या यांचा एकच धिंगाणा उसळला. पहारे अधिकच सख्त झाले. क्रूर चेहऱ्याच्या राकट तार्तर आणि हबशी पहारेकरणी नंग्या तेगा खांद्यावर टाकून दारा-दरवाजात उभ्या राहिल्या.

कुलीखानाच्या कमऱ्यात आत आणि बाहेरच नव्हे तर पलंगाभोवतीसुद्धा पहारे बसले. गाद्या-गिरद्या उलट्यापालट्या करून, चादरी झाडून-झटकून कमऱ्याची तलाशी झाली. कुलीखानाचीच नव्हे तर प्रत्येक बेगमेचीसुद्धा अंगझडती झाली. खोजांची, बांद्यांची इतकेच नव्हे तर प्रत्येक पहारेकरणीचीसुद्धा सर्व कपडे उतरवून अंगझडती झाली. कित्येक तास हा प्रकार सुरू होता. नंतर बऱ्याच उशिराने कळले की, टपालाचे एक अनोळखी कबुतर जनानखान्यामध्ये उतरले होते. एका खोजाने ते पकडलेसुद्धा. त्या कबुतराकडे काय सापडले वगैरे तपशील कळू शकला नाही मात्र ते कोठून आणि कोणासाठी आले? याचा तपास अशा मोगली पद्धतीने सुरू होता.

दोन दिवसांनंतर कळले की, जाफरखानाच्या कोणा एका नव्या बेगमेच्या याराने तिला प्रेमपत्र पाठविण्याचे धाडस केले होते. त्या बेगमेला आणि तिच्या त्या याराला पकडण्यात आले होते. सायंकाळी जाफरखानासमक्ष दोघांचा शिरच्छेद होणार होता. त्या सोहळ्याला उपस्थित राहण्याचा बहुमान कुलीखानाला देण्यात आला. त्या ‘सोहळ्या’नंतर दालनात परत येत असताना जाफरखान त्याला म्हणाला–

देखा, महम्मद कुलीखान? इस्लाममध्ये नाफर्मानीची ही अशी सजा सांगितली आहे. इथे इन्साफ साफ आणि झटपट. निष्कारण वेळेची बरबादी नाही. आता या गोष्टी तुम्हीसुद्धा शिकून घेतल्या पाहिजेत. हळूहळू शरियत शिकून घ्या. शाही अंमलदार म्हणून पुढे तुम्हाला निवाडे करावे लागणार आहेत.
कुलीखानाने मुकाट्याने मान हलविली. त्यानंतर कित्येक रात्री आक्रोश करणारे आणि दयेची भीक मागणारे ते दोन जीव त्याच्या नजरेसमोरून हलत नव्हते.
-

सकाळच्या दरबाराला निघण्यापूर्वी बादशहा वजीर जाफरखानाकडून त्या दिवशी दरबारात होणाऱ्या कामाची माहिती करून घेत होता. ते काम संपल्यानंतर रोजच्या रिवाजाप्रमाणे त्याने कुलीखानासंबंधी अहवाल दिला.
आलमपन्हांच्या हुकमाप्रमाणे हकीम सय्यद अहमद दररोज जातीने त्याच्या खुराकाची आणि दवापाण्याची देखरेख करीत आहे. लेकिन गुस्ताखी माफ अलीजा, पण त्याची कमजोरी अजून पूर्ण भरून निघालेली नाही. दीनी तालममध्ये मात्र तो बराच रस घेताना दिसतो. आम्ही स्वत: काल त्याच्या सोबत फजरचा नमाज पढला. त्याने एकही चूक केली नाही. प्रत्येक रकात अगदी बिनचूक अदा केली. आयात आम्ही त्याला मोठ्याने पढायला सांगितल्या. त्याने एखाद्या काझीने पढाव्या तशा बिनचूक पढल्या. पण इमाम मसूद अहमद सांगत होता, सारख्या बारीकसारीक शंका विचारून पार भंडावून सोडतो.

हुंऽऽऽ! अच्छा तो आप फजर की नमाज भी पढते हैं. आज दुपारनंतर शाही हकिमाला माबदौलतांसमोर पेश करा. अजून किती दिवस लागतील त्याला तंदुरुस्त व्हायला ते जाणून घ्यायची इच्छा आहे. येत्या चाँदरातच्या दरबारात त्याने पेश व्हावे आणि शाही हुकमाप्रमाणे ताबडतोब मोहीमनशीन व्हावे अशी माबदौलतांची दिली ख्वाहिश आहे. त्याला

सरहिंदपासूनसुद्धा दूर अफगाणी मोहिमेवर रवाना करण्याची योजना आहे. आपल्या मुलखापासून आणि माणसांपासून तो जितका दूर राहील तितक्या त्याच्या आठवणी धूसर होत जातील आणि तो इस्लामी माहौलमध्ये जास्त चांगला रमून जाईल. त्याने आणि शिवाने कितीही मनात आणले तरी एवढ्या दूरवरून त्यांना एकमेकांशी संधान ठेवता येणे शक्य होणार नाही.

आलमपन्हा, दरबारात पेश होण्याइतपत तर त्याची हालत संवरली आहे. पण अजून महिनाभर तरी त्याला मोहीमनशीन होता येणार नाही. घोड्यावरून दौड करण्याइतकी ताकद अजून नाही आली त्याच्यात.

पावसाळा संपल्यानंतर मात्र त्याला नक्कीच मोहिमेवर पाठवणे शक्य होईल असा माझा खयाल आहे.
जाफरखान, त्याचे एकेक दिवस आग्र्यास राहणे माबदौलतांसाठी तकलीफ देय आहे. पुरानी यादें हमें बेचैन करती हैं. त्या शिवाची माणसे त्याच्यापर्यंत कधी पोहोचतील की काय याची चिंता सतत छळत असते.

आलमपन्हांनी अगदी बिनघोर राहावे. आम्ही कुलीखानाला आमच्या खास जनानखान्याच्या महालातच पूर्ण निगराणीत ठेवले आहे. पेश इमाम आणि शाही हकीम यांच्याशिवाय कोणीही पुरुष त्याला भेटूच शकत नाही. त्याच्या खिदमतीसाठी अशा काही हरहुन्नरी बांद्या तैनात ठेवल्या आहेत की, त्यांनी त्याला पूर्ण जखडूनच ठेवले आहे. खुदका बडप्पन नहीं तर हकिकत आहे की, वजीर जाफरखानाचा जनानखाना म्हणजे आमच्या सालेसाहेबांचा पुण्यातील लाल महल नव्हे. शिवाचा माणूसच काय, पण कबुतरसुद्धा आमच्या जनानखान्याची दिवार ओलांडून आत येणे शक्य नाही, अशी हुजुरेआलांनी खातरजमा बाळगावी.

बेहतर है। अशाच निगराणीने त्याला अजून दोन महिने सांभाळ. तोपर्यंत पाऊससुद्धा थांबेल आणि फौज ताबडतोब मोहिमेवर रवाना करता येईल. वजीरेआझम, मीर बक्षी, दिलावरखान, महाबतखान,
दाऊदखान कुरेशी, खान जहान लोधी, माबदौलतांचे चचा हुजूर पर्वीझ खान आणि सुरतेहून माबदौलतांच्या भेटीसाठी आलेले व्यापारी हाजी सय्यद बेग आणि हाजी करीमखान यांना आज रात्री खलबतखान्यात हाजिर होण्याचा हुकूम जारी करा. याद रहे, हुकूम गुप्त राहिला पाहिजे. त्याआधी माबदौलतांना तुला भेटायचे आहे. शाही दस्तरखानची शिरकत करण्याची दावत तुम्हाला दिली जात आहे. सोबत खालाजानला आणण्यास विसरू नका. आमच्या हमशिरा त्यांच्या सोबत असतील.

गुलाम जहाँपन्हांचा जन्मभर एहसानमंद राहील.

क्रमश:

*____📜🚩

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...