भाग 12
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाई शिंदे
ह्यांचा कुलवृत्तांत----------------------2
भानजी घाटगे ह्यांचे संबंधाची विश्वसनीय माहिती उपलब्ध नाहीं. भानजीचे वंशज पिराजीराव घाटगे ह्यांच्यापासून ह्या घराण्याची संगतवार वंशावळी मिळते. पिराजीराव ह्यांस विजापुरचा बादशाह दुसरा इब्राहिम आदिलशाह (इ० स० १५८०-१६२६) ह्याच्या सुलतान महमद नामक वजिराकडून कागल परगणा व त्यांतील ६७॥ गांव इनाम मिळाल्याचा उल्लेख सांपडतो. त्यावरून पिराजीराव हे विजापुरच्या बादशाहीमध्ये प्रख्यात पुरुष होते असे मानण्यास हरकत नाही. त्यांच्या पश्चात् आबाजीराव, विठोजीराव, महादाजीराव, विठोजीराव आणि दुसरे पिराजीराव ह्या पुरुषांनीं कागल जहागिरीचा उपभोग घेतला. दुसरे पिराजीराव ह्यांस राणोजीराव, विठोजीराव, आबाजीराव, तुळजाजीराव व यशवंतराव असे पांच पुत्र होते. त्यांपैकी तुळजाजीराव ह्यांस जयसिंगराव व रामचंद्रराव असे दोन मुलगे होते. त्यांपैकीं जयसिंगराव ह्यांचे पुत्र सखारामराव हे पेशवाईच्या अखेरीस उदयास आले. मराठी राज्यामध्ये कागलकर घाटग्यांनी काय काय पराक्रम गाजविले, ह्याबद्दलची माहिती अद्यापि उपलब्ध झाली नाही. तथापि हे जुने व थोर । घराणे कोल्हापूर प्रांतीं बरेच प्रसिद्ध असावे असे दिसते.
इ. स. १७९२ सालीं ह्या घराण्यांतील यशवंतराव नामक एका पुरुषास कोल्हापुरचे छत्रपति शिवाजी महाराज ह्यांची कन्या आऊबाईसाहेब ही दिली । होती. त्या वेळी ह्या घराण्याकडे कागलची जहागीर चालत नसून, ती । कोल्हापुरच्या छत्रपतींच्या ताब्यात होती; व त्यांनी फक्त सहा गांव यशवंतराव ह्यांस. लग्नाप्रीत्यर्थ इनाम दिले होते. तथापि तेवढ्या उत्पन्नावर घाटग्यांच्या घराण्याचा चांगला परामर्ष होईनासा झाला. त्यामुळे यशवंतराव व त्यांचे चुलत बंधु सखारामराव ह्यांच्यामध्ये तंटा उत्पन्न झाला. त्या वेळीं सखारामराव हे ईर्षेस पेटून, कागलाहून निघून परशुरामभाऊ पटवर्धन ह्यांचे पदरीं नौकरीस जाऊन राहिले. परशुरामभाऊ पटवर्धन हे त्या वेळीं दक्षिण महाराष्ट्रामध्ये पेशव्यांचे बलाढ्य सरदार ह्मणून प्रसिद्ध होते; व त्यांच्या पदरीं सैन्याचा जमावही पोक्त होता. त्यामुळे सखारामराव घाटग्यासारख्या मर्द शिपायास त्यांच्या पथकामध्ये शिलेदारीचे काम स्वीकारून आपली कर्तृत्वशक्ति दाखविण्यास चांगली संधि मिळाली. परशुरामभाऊ पटवर्धन हे स्वतः युद्धकलानिपुण व पराक्रमपटु असल्यामुळे गुणी गुणं वेत्ति' ह्या न्यायाने सखारामराव घाटगे ह्यांच्या शिपाईगिरीची त्यांनी तेव्हांच परीक्षा पाहिली; व त्यांच्या अंगी हिंमत, धाडस, शौर्य इत्यादि वीरपुरुषाचे गुण चांगले वसत आहेत, असे त्यांच्या लक्ष्यांत आले. तेव्हांपासून त्यांची सखारामरावावर हळू हळू मेहेरबानी जडत चालली. परशुरामभाऊंसारख्या प्रबल व वजनदार सरदाराचा चांगला आश्रय मिळाल्यामुळे सखारामराव घाटगे ह्यांस आपला भाग्योदय करून घेण्याचा अनायासे योग प्राप्त झाला. सखारामराव ह्यांचे परशुरामभाऊ पटवर्धनांबरोबर पुण्यास वारंवार जाणे येणे होऊ लागले. त्या योगाने पुणे दरबारचे प्रख्यात मुत्सद्दी नाना फडनवीस ह्यांचा व त्यांचा चांगला परिचय झाला.
No comments:
Post a Comment