महाराणी ताराबाई राणीसाहेब ( १६७५-१७६१) ह्या छत्रपती राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या.महाराणी ताराबाईंचे लग्न छत्रपती राजाराम महाराजांशी १६८० च्या सुमारास झाले. २५ मार्च १६८९ रोजी मोगलांनी रायगडास वेढा घातला असता त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या. छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर महाराणी ताराबाई, राजसबाई व अंबिकाबाई या विशाळगड येथे राहिल्या. रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली.सन १६९४ साली त्या तिघी जिंजीला पोहचल्या. ९ जून १६९६ रोजी महाराणी ताराबाईंना शिवाजी हा पुत्र झाला.
राजाराम महाराजांच्या निधनानंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे हाती आल्यावर समोर उभ्या असलेल्या अनेक कठीण प्रसंगांनी खचून न जाता मोगली फौजांना मागे सारण्यासाठी महाराणी ताराराणींनी आक्रमक भूमिका घेतली. मराठेशाहीतील मुत्सद्यांना काळाचे गांभीर्य समजावून देऊन शेवटपर्यंत या सगळ्यांबरोबर एकजुटीने राहून तिने शत्रू थोपवून धरला. लष्कराचा आत्मविश्वास वाढवला. मोगलांना कर्दनकाळ वाटावेत असे कर्तृत्ववान सरदार त्यांच्यासमोर उभे केले. दिल्लीच्या राजसत्तेवर स्वतःचा असा धाक निर्माण केला. मराठ्यांची खालावलेली आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी त्यांनी मोगली मुलुखावर स्वाऱ्या करून चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करून आर्थिक बळ वाढवले.
करवीर राज्याची, कोल्हापूरच्या राजगादीची त्यांनी स्थापना केली. महाराणी ताराबाई साहेब मराठ्यांच्या इतिहासातील ही एक कर्तबगार राजस्त्री होत्या. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीमहाराज यांच्यामागे त्यांनी कणखरपणे राज्याची धुरा सांभाळली. सरसेनापती संताजी, धनाजी यांना बरोबर घेऊन मोगलांना सळो की पळो करून सोडणारी ही रणरागिणी म्हणजे महाराष्ट्रातल्या कर्तृत्ववान स्त्रियांमधील एक अभिमानचे व गौरवाचे महापर्व आहे.
दिल्ली झाली दीनवाणी| दिल्लीशाचे गेले पाणी | ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली || ताराबाईच्या बखते | दिल्लीपतीची तखते | खचो लागली तेवि मते | कुराणेही खंडली || रामराणी भद्रकाली | रणरंगी कृद्ध झाली | प्रलयाची वेळ आली | मुगलहो सांभाळा || "
तत्कालीन कवि गोविंद यांनी ताराबाईचे जे वर्णन केले आहे ते बढवून चढवून नाही तर त्यातील शब्दनशब्द खरा आहे. केवळ २४ ते २५ वर्षाची एक स्त्री, औरंगजेबासारख्या मुत्सदी, नृशंस व कपटी सम्राटाशी लढा देण्यास उभी राहते आणि सलग साडेसात वर्षे त्याचाशी लढा देते व त्या लढ्यात स्वतः पराजित होत नाही. आणि एवढेच नव्हे तर त्या औरंगजेबाची कबरही याच स्वराज्याच्या मातीत खोदली जाते व त्याच्या शिवरायांचे स्वराज्य संपविण्याच्या काळ्या स्वप्नाची धूळधाण उडवते. ही घटनाच त्यांच्या कर्तृत्वाबद्दल सगळे काही सांगून जाते.
No comments:
Post a Comment