विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 12 December 2025

सज्जनगडाचा "किल्लेदार जिजोजी काटकर"

 सातारा शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्याच्या किनाऱ्यावर उभा असलेला “परळीचा किल्ला उर्फ सज्जनगड”...


सज्जनगडाचा "किल्लेदार जिजोजी काटकर", यांना "छत्रपती संभाजी महाराजांनी" २ जून १६८२ रोजी, पाठविलेले पत्र उपलब्ध आहे :
"स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ८ दुंदुभीनाम संवत्सरे जेष्ठ शुद्ध सप्तमी भृगुवासरे क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीराजा शंभूछत्रपती स्वामी याणी राजश्री जिजोजी काटकर मुद्राधारी सज्जनगड यांसी आज्ञा केली ऐसी जे श्री स्वामी याणी अवतार पूर्ण केला त्या अगोदरच आज्ञा केली होती की श्री देव मुचाफल या कडील कार्यभाग व राजगृहास जाणे येणे हे वेदमूर्ती दिवाकर गोसावी यांनी करावे श्री स्वामी कडील वीत विषय असेली त्याचा व्यय देवालयी चाफलास करावा. सज्जनगडी चितास्थानी श्री हनुमंताचे देवालय बांधावे. गड मजकुरी भानजी व रामाजी गोसावी आहेती व स्वामीकडील समुदाये ही उभयंताचा आहेतैसा असो द्यावा म्हणून श्री स्वामींची आज्ञा आहे ऐसा असता उधव गोसावी उगीच द्रव्यलोभात्सव भानजी व रामाजी गोसावी यांसी कटकट करितात. तुम्ही ही उधव गोसावी यांसी द्रव्य व पात्रे व वस्त्रे भानजी व रामाजीगोसावी याकडून श्री स्वामींची देवविली म्हणून कलो आले तरी तुम्हास ऐसे करावया प्रयोजन काये व उधव गोसावी यासी कटकट करावया गरज काये यासपरी जे । वस्ताभाव व द्रव्य उधव गोसावी याचे अधीन तुम्ही करविले असेल ते मागते भानुजी व रामाजी गोसावी यांचे आधीन करणे. उधव गोसावी यांसी कटकट करू न देणे...
२२ जानेवारी १६८२ रोजी रामदास स्वामींचा सज्जनगडावर मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी सज्जनगडावर श्री हनुमानाचे मंदिर बांधले. रामदास स्वामींनी आपल्या पश्चात सर्व अधिकार दिवाकर गोसावी याला दिले होते, तरी उद्धव गोसावी द्रव्यलोभासाठी गडावरील कर्मचाऱ्यांशी भांडण करत होता. छत्रपती संभाजी महाराजांना हे कळताच त्यांनी "सज्जनगडाचा किल्लेदार जिजोजी काटकर" याला पत्र लिहून कडक सूचना दिल्या. जिजोजी काटकर याने गडावरील कर्मचाऱ्यांकडून वस्त्रे आणि पैसे घेऊन उद्धव गोसावी यास दिले होते. त्या बद्दलही संभाजी महाराजांनी त्याची कडक शब्दात हजेरी घेतली. जो व्यवहार करावयाचा तो केवळ दिवाकर गोसावी यांच्याशी करावा असा आदेश संभाजी महाराजांनी किल्लेदाराला या पत्रातून दिला. संभाजी महाराजांनी सज्जनगडावरील स्वामींच्या शिष्यवर्गात निर्माण झालेले तंटे सोडविण्यात पुढाकार घेतला..
या सर्व उदाहरणांवरून छत्रपती संभाजी महाराजांची गडकोट प्रशासन व व्यवस्थेवर किती उत्तम पकड होती याची आपणास कल्पना येते...

सेनानी संताजी पांढरे

 ६ नोव्हेंबर १७०५ रोजी,

मराठ्यांच्या इतिहासात आपल्या पराक्रमाने अविट ठसा उमटविणाऱ्या पांढरे घराण्यातील (शरिफनमुलूक) हा उमदा “


सेनानी संताजी पांढरे”...
मराठ्यांच्या स्वातंत्रसंग्रामात सत्वर भाग घेऊन आपल्या सैन्यदलाचे नेतृत्व करत थेट औरंगजेबाशी भिडणारा रणगाजी म्हणजे संताजी राजेपांढरे. पांढरे घराण्याच्या अनेक शाखा महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा. इ भागात विस्तारित झाल्या आहेत, परंतु शिखर शिंगणापूर च्या पायथ्याला असणाऱ्या नातेपुते हे पांढऱ्यांच्या मूळ वतनाचे गाव होय. शिखर शिंगणापूरच्या यात्रेची सुरवातच पांढरे घराण्यातील मुलगी व माळशिरसच्या वाघमोडे घराण्यातील मुलगा यांचे लग्न झाल्या शिवाय सुरवातच होत नाही अश्या या नातेपुते गावचे वतनदार म्हणजे संताजी पांढरे..
औरंगजेबाची ही विशाळगड मोहीम खूपच मानहानीकारक घडली ह्यात मोगलांकडील सहा हजार माणसे गमावली ह्या मध्ये संताजी पांढरे यांचा मोठा वाटा होता. एकदा तर मराठे अगदी औरंगजेबाच्या तंबूच्या जवळ येऊनच ठेपले होते. स्वतः आलमगीर हातात धनुष्यबाण घेऊन पुढे सरसावला ऐन वेळी एक रजपूत सरदार मदतीला धावला त्यामुळे मराठे मागे हटले ही मदत आली नसती तर खासा आलमगीर बादशहाच कैद झाला असता. मोगल बातमीपत्रातील एका नोंदी नुसार १ मार्च १७०३ साली संताजी पांढरे मोठे सैन्य बरोबर घेऊन अहमदनगर जवळ असणाऱ्या तिसगाव मढी भागात आक्रमण करत असल्याच सांगण्यात आले आहे..
६ नोव्हेंबर १७०५ रोजी, प्रसिद्धगड उर्फ रांगणा या किल्ल्यावर एक ऐतिहासिक मजहर तयार केला गेला. त्यामध्ये नेमाजी राजे शिंदे, धनाजी जाधवराव, हंबीरराव मोहिते, या सारख्या मातब्बर मंडळी बरोबरच संताजी पांढरे यांचा शिक्का उमटवल्याचे दिसून येते. यावरूनच संताजी पांढरे यांची मातब्बरता समजून येते. इस १७०६ च्या सुमाराला संताजी पांढरे, धनाजी जाधव, नेमाजी शिंदे, दमाजी थोरात मंडळी अहमदनगर येथील छावणीवर तुटून पडले. ही मोहीम खुद्द बादशहावर करण्यात आली होती. शाही सैन्याचे प्रचंड मोठे नुकसान करून मराठे मागे फिरले. वरील नोंदी पाहिल्या तर संताजी पांढरे यांनी मोठ मोठ्या मोहिमा ह्या बादशहाच्या विरोधात केल्याचे दिसून येते. मध्यंतरीच्या काळात औरंगजेब भिंगार या ठिकाणी मृत्यु होऊन छत्रपती थोरले शाहुमहाराज यांची कैदेतून सुटका झाली. छत्रपती थोरले शाहुमहाराज महाराष्ट्रात आल्या नंतर अनेक मातब्बर मराठा सरदार छत्रपती शाहु महाराजांना जाऊन मिळाले. परंतु बदललेल्या राजकीय परिस्थिती मध्ये ही संताजी पांढरे यांनी महाराणी ताराराणीसाहेब यांचा पक्षाला एकनिष्ठ राहिला..

Monday, 8 December 2025

विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी. भाग-५











 विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.

भाग-५
.........यांच्या राजवटीत अजून एक अत्यंत महत्वाचे कार्य झाले. हिंदू शिक्षण पद्धतीमधे गूरू-शिष्य़ परंपरेमधे सर्व विद्या ही गुरूकडून विद्यार्थ्यांकडे पाठांतराने जात असे. पण जेव्हा हिंदू मुसलमान हा झगडा चालू झाला व मुसलमानांच्या अत्याचारी व क्रूरतेमुळे ही परंपरा वारंवार खंडीत होऊ लागली. हे टाळण्यासाठी ही सर्व विद्या, ग्रंथ लिखित स्वरूपात आणायचे काम यांच्या कारकीर्दीतच चालू झाले. यामुळेच कदाचित बुक्क याने वेदांची टिका व भाष्ये प्रकाशीत करणारा अशी पदवी धारण केली असावी. यांच्याच काळात प्रासिद्ध माधवाचार्य व सायणाचार्य या द्वयींनी इतर विद्वानांबरोबर व राजांबरोबर बरीच ग्रंथ निर्मती केली. राजघराण्यतील स्त्रियाही ज्ञानी असत याचा उल्लेख वर आलाच आहे. या सर्व वातावरणाने ज्ञान व संस्कृतीची सर्व बाजूने वृद्धी झाली. व्यापारवृद्धीचे तर बोलायलाच नको. सुबत्ता म्हणजे खरोखरच सोन्याचा धूर निघत असे व हिरे माणके तर अगणित जमा झाली होती. विजयनगरचा व्यापार चौदाव्या शतकात तीनशे बंदरातून चालत असे यावरून आपल्याला याची कल्पना येऊ शकेल.
दुसरा राजवंश – सालुव घराणे
पण चांगल्या वाईटाचा फेरा येतच असतो या नियमाप्रमाणे या राजवंशाचा शेवटचा राजा दुसरा विरूपाक्ष याला त्याची सत्ता गमवावी लागली. अर्थात त्याला तोच जबाबदार होता. तो दुर्बळ व दुर्वतनी असल्यामुळे त्याच्या दरबारात अनेक तंटे बखेडे उभे राहिले व त्यातच याच घराण्यातील पण दुसर्या पातीच्या कुटुंबातील नरसिंह या राजपुत्राने सत्ता हस्तगत केली. हे सत्तांतर व्हायला बरीच कारणे होती. कलिंगराज्यात (ओरिसा) सत्ताबदल होऊन कपिलेश्वर नावाच्या सरदाराने गादी बळकावली होती. तो व त्याचा मुलगा पुरुषोत्तम यांनी सत्तेवर आल्या आल्या आपल्या राज्याच्या विस्ताराची योजना हाती घेतली. अर्थातच त्यांना पहिला अडथळा होता तो विजयनगरचा. त्यांनी पूर्वकिनार्याने खाली उतरून राजमहेंद्रीपर्यंतचा मुलूख जिकला व ते कृष्णाकाठाने विजयनगर साम्रज्यात उतरले. बघता बघता त्यांनी अर्काट पर्यंतचा मुलूख आपल्या अधिपत्याखाली आणला. हे झाल्यावर विजयनगरच्या राजाच्या दुबळेपणाची चीड येऊन बहुदा त्याला सिंहासनावरून हटविण्याचे कारस्थान झाले असावे. त्याच काळात बहामनी सुलतानानेही विजयनगरचा कृष्णा व तुंगभद्रा या पट्यातील सुपीक प्रदेश बळकावला होता. नशिबाने याच काळात बहामनी सत्तेतही सत्तेसाठी कुरबुरी चालू झाल्या होत्या ज्यामुळे नरसिंहाला त्यांनी बळकावलेला सर्व मुलूख परत मिळविण्यात यश आले. नरसिंहाच्या या कामगिरीमुळे जनमत त्याच्या बाजूने झुकले पण दुर्दैवाने उत्तरेची मोहीम हाती घेण्याआधीच तो शूर राजा मरण पावला.
याच्या नंतर याचा मुलगा गादीवर आला परंतू नरसिंहाला आपल्या मुलाच्या कुवतीची कल्पना असल्यामुळे त्याने मरायच्या आधीच त्याला नामधारी राजा करायचे ठरविले होते. ही योजना त्याने त्याचा एकनिष्ठ सेनापती नरसानायक याला समजावून सांगितली व त्याप्रमाणे राज्यशकट हाकायची त्याच्याकडून शपथ घेतली. त्या शपथेनुसार नरसानायक याने त्या मुलाला गादीवर बसवून प्रधान राज्यकारभार म्हणून हाती घेतला. हा नरसानायकही कर्तबगार होता. त्याने जिवावर उदार होऊन दिलेले वचन पाळले. याच्या मृत्यूनंतर ही जबाबदारी त्या दुर्बळ राजाने नरसानायकाच्या मुलावर टाकली. वचनाची देवाणघेवाण आदल्या पिढीत झाली असल्यामुळे त्या वचनाचे ओझे या नवीन प्रधानाला वाहायचे काही कारण नव्हते. त्याने त्या राजाला पदच्यूत करून विजयनगरची सत्ता हस्तगत केली. योगायोगाने याचेही नाव नरसिंहच होते.
हा होता तिसरा राजवंश - तुलूव घराणे
हा मुळ राजघराण्यातील नसल्यामुळे याला जनतेकडून व इतर सरदाराकडून बराच विरोध झाला पण हा सगळ्यांना पुरून उरला. याच्या नंतर (१५०५) याचा धाकटा भाऊ सिंहासनावर बसला त्याचे नाव “कृष्णदेवराय” हाच तो इतिहास प्रसिद्ध कृष्णदेवराय. यालाही सिंहासनावर येताच बराच त्रास देण्यात आला पण काहीच काळात त्याची कर्तबगारी लक्षात आल्यामुळे त्याला होणारा विरोध शांत झाला. त्याने गेलेले वैभव व प्रदेश परत मिळवायचा विडा उचलला. त्याची धडाडी बघून त्याला इतर सरदारांनी उत्तम साथ दिली व त्याच्या कारकीर्दीत गेलेला बहुतेक प्रदेश विजयनगरमधे परत समाविष्ट करण्यात त्याला यश आले.
याच काळात बहामनी राज्यात बंडाळी माजून त्याचे पाच तुकडे झाले. या गोंधळाचा फायदा उठवण्यासाठी कृ्ष्णदेवरायाने आपली सेना बाहेर काढली. पहिल्याच धडाक्यात त्याने त्याचा जुना शत्रू कलिंगाच्या राजावर आक्रमण केले. पूर्वी गमावलेला सर्व प्रदेश त्याने काबीज केलाच पण एवढ्यावर न थांबता त्याने कटक येथील राजालाही आपले मांडलिक केले. ही मोहीम सुरू करण्याअगोदर त्याने कृष्णा व तुंगभद्रा या नद्याच्या मधे असलेला प्रदेश खालसा केला (रायचूरचा दुआब) व म्हैसूरच्या दक्षिणेत एक गंगवंशी राजा जरा त्रास देत होता त्याचे पारिपत्य केले. अशा तऱ्हेने विजयनगरची उत्तर सरहद्द परत एकदा निर्वेध झाली.
कृष्णदेवरायच्या या कामगिरीमुळे विजयनगरचा दबदबा सर्वदूर पसरला. उत्तरेकडून होणार्या मुसलमानांच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्याच्या प्रयत्नात शेवटी अशा प्रकारे यश मिळाले. कृष्णदेवरायने अजून एक महत्वाचा उपक्रम राबवला त्याची फळे आपण आजही उपभोगतोय तो म्हणजे उध्वस्त देवळांच्या पुनरूज्जीवनाचा उपक्रम. त्याने पडलेली देवळे बांधायला घेतली व यासाठी निधीची कमतरता भासू दिली नाही. त्याच्या या उत्तेजनाने पडलेली देवळे उभीच राहिली नाही तर नवीन देवळे बांधण्याचा वेगही वाढला. नवीन नवीन प्रकारच्या देवळाचे बांधकाम होऊ लागले. त्यासाठी वास्तूशास्त्रज्ञ दूरदुरहून आणण्यात आले. दक्षिण भारतात बहुतेक सगळ्या देवळांना जी मोठमोठी गोपूरे बांधलेली आहे यांना रायगोपूरम असे संबोधले जाते. असे म्हणतात ही रचना कृष्णदेवरायने करविली असल्यामुळे याला असे नाव पडले. खाली गोपूर आतून कसे दिसते त्याचे छायाचित्र दिले आहे. हे आतून पोकळ असते. वरून याचा डोलारा बराच मोठा असतो. याचे बांधकाम विटांचे व अचूक असावे लागते व याचा गुरूत्वमध्य बरोबर पायात पडवा लागतो. ( बाहेरची रचना कशीही असली व मोठी असली तरी मग ही वास्तू स्थिर राहू शकते.) एका ढासळलेल्या व बांधकाम अर्धवट सोडलेल्या गोपूराच्या आत जाऊन मी हा फोटो काढला होता...
क्रमशः
जयंत कुलकर्णी...

विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी. भाग-४

 






विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.

भाग-४
......होयसळांकडून या पाच भावांकडे सत्ता कशी आली हा एक संशोधनाचा विषय आहे व यासंबंधी अनेक प्रवाद चर्चिले जातात. पण हे बंधू होयसळांच्या पदरी सरदार असावेत व नंतर त्यांच्या हातात ही सत्ता आली किंवा त्यांनी ती घेतली या प्रवादावर विश्वास ठेवायला हरकत नाही. या भावांपैकी तिघे पूर्व किनार्यावरील नेल्लोर ते पश्चिम किनार्यावरचे बेळगाव ही सरहद्द सांभाळत होते. सध्याचा दक्षिण महाराष्ट्र हा हरिहरच्या ताब्यात होता व तो उत्तरेच्या मुसलमानांना थोपवून धरत होता. दुसरा भाऊ होता कंप. याचे उदयगिरीराज्यम नावाचे राज्य पूर्वकिनार्यावर होते. मधला भाऊ बुक्क जो इतिहासात पसिद्ध आहे हा विशेष कर्तबगार असून त्याच्या ताब्यात होयसळांचे हळेबीड, पेनुगोंडचा किल्ला व आसपासचा प्रदेश होता. अजून दक्षिणेकडे शिमोगाजवळ अरग येथे एक भाऊ राज्य करत असे व शेवटचा भाऊ बुक्कच्या हाताखाली सरदार होता.
इस्लामशी टक्कर घेऊन हिंदू धर्माचे रक्षण करणे हे यांचे ध्यय होते. यांनी अत्यंत हुशारीने विजयनगर ही मध्यवर्ती सत्ता मानून आपले साम्राज्य उभे केले होते व मुसलमानी सत्तेला न जुमानता त्यांच्या छाताडावर पाय देऊन ते ताठ मानेने राज्य करत होते. त्या काळातील परिस्थितीचे आकलन ज्यांना आहे त्यांना हे काम किती अवघड होते याची कल्पना येऊ शकेल.
उत्तरेत काळाच्या ओघात हिंदू संस्कृती वरीच नष्ट झाली. भारतात हिंदूंची संस्कृती, त्यांचा धर्म, त्यांच्या कल्पना, त्यांच्या काव्य शास्त्र विनोद या विषयीच्या कल्पना याचे दृष्य स्वरूप कोठे दिसत असेल ते फक्त दक्षिणेकडेच..व याचे श्रेय जाते विजयनगरला हे निर्विवाद.....
वर आपण या राजांनी उत्तर सीमा सुरक्षित करण्यासाठी तयारी चालवली होती हे आपण बघितले. पण वीरबल्लाळचे मदूरा काबीज करायचे स्वप्न कोणी पुरे केले हे बघूयात. बुक्करायाचा कम्पराय नावाच जो मुलगा होता त्याने हे काम तडीस नेले. हा कम्परायही बुक्कप्रमाणे मोठा शूर व कर्तबगार होता यात शंका नाही. याचे शत्रूही याला नावाजत. त्याच्या कारकीर्दीत त्याने दाखवलेल्या कर्तबगारीची वर्णने त्याच्या पत्नीने लिहिलेल्या एका “कम्पराजविजयम” या संस्कृत काव्यग्रंथात आढळतात. त्या काळात एखादी राणी एखादे काव्य रचते यावरून त्यावेळी हा प्रदेश कसा सुसंस्कृत असेल हेही लक्षात येते. या राजघराण्यांमधे अनेक थोर ग्रंथरचनाकार व दी्र्घका्व्ये रचणारे होऊन गेले. मुसलमानांची हकालपट्टी केल्यावर त्याने त्याप्रित्यर्थ मुसलमानांनी उध्वस्त केलेली श्रीरंगम व मदूरा येथील देवळे पूर्णपणे नव्याने बांधून काढली. त्या देवळांवरचे हिंदू झेंडे जणू मुसलमानांपासून आता सुटका झाली आहे हे मोठ्या डौलाने फडकत सांगत होते. पण या सगळ्याला चौदावे शतक संपत अले होते. पाच भावांपैकी हरिहर व कंप मरण पावले होते तर बुक्कही खूपच वृद्ध झाला होता. ठिकठिकाणी अनेक हिंदू राजे आपले राज्य सांभाळून होते पण एकत्रीत असे काही राज्य स्थापन होत नव्हते. हा मान शेवटी बलाढ्य कम्परायला मिळाला.
त्याने बुक्काच्या मृत्यूनंतर (१३७८ साल असावे) दूसरा हरिहर असे नाव धारण करून स्वत:ला विजयनगरच्या साम्राज्याचा पहिला सम्राट म्हणून घोषीत केले.
या दुसऱ्या हरिहराचा गोतावळा बराच मोठा होता व पहिल्या हरिहराच्या मुलांचा कोठे उल्लेख आढळत नाही. पहिल्या कम्पाला एक मुलगा असल्याचा भक्कम पुरावा उपलब्ध आहे पण तरी सुद्धा तिसर्या भावाच्या मुलाला गादीवर बसविण्यात आले यावरून जो कर्तबगार, त्यालाच राजा म्हणून निवडायचे धोरण प्रधानांनी व सरदारांनी स्वीकारले होते हे कौतूकास्पद आहे. थोडीफार कुरकुर झाली असणार पण इतिहासात त्याचा विशेष उल्लेख नाही. या राजावर आता साम्राज्याचे संघटन, सुव्यवस्था व हिंदूंचे स्वतंत्र राज्य असून हिंदूंकडे वाकड्या नजरेने पहाणार्यांचे डोळे काढले जातील अशी जरब बसविण्याची जबाबदारी येऊन पडली. ती त्याने मोठ्या निर्भयतेने, कुशलतेने व पराक्रमाने निभावली असे म्हणायला हरकत नाही. याने अनेक पदव्या धारण केल्या होत्या व त्यातील बहुतेक "वेद प्रणीत नियमांचे व राष्ट्र स्थापन करणारा” या अर्थाच्या आहेत. हे वेद प्रणीत हिंदू धर्मस्थापनेचे शंकराचार्यांचे कामही त्याने स्वत:च्या अंगावर घेतेले होते यावरून त्याच्या समर्थ्याची कल्पना येऊ शकते. त्याच्या सुसंस्कृतपणाची साक्ष त्याची अजून एक पदवी देते. त्याचा अर्थ आहे “वेदांवरची टीका व भाष्ये प्रकाशीत करणारा” असा आहे. या प्रकारच्या पदव्या घेतलेला राजा मला तरी दुसरा आढळला नाही. त्यामुळे हिंदूंची म्लेंच्छांपासून सुटका करणे एवढेच त्याचे काम नसून त्याने त्याच्या प्रजेच्या एकंदरीत सामाजीक उन्नतीची काळजी घेणे हेही त्याचे ध्येय असावे असे वाटते.
सामान्य लोकांना कल्पना नसते व शाळांतूनही इतिहास नीट शिकवला जात नाही त्यामुळे विजयनगरच्या साम्राज्यावर एकंदरीत चार राजवंशांनी राज्य केले हे माहीत नसते. खाली ही वंशावळ दिलेली आहे. यांच्या सनावळीबद्दल मलाच शंका आहे परंतू अंदाज येण्यासाठी या ठीक आहेत आणि मुख्य म्हणजे आपण त्यांचा इतिहास थोडक्यात बघतोय म्हणून यात अधिक खोल जाता येणार नाही.
पहिला राजवंश संगमा
हरिहरराय-१: १३३६-१३५६
बुक्कराय-१: १३५६-१३७७
हरिहरराय-२: १३७७-१४०४
विरूपाक्षराय: १४०४-१४०५
बुक्कराय-२: १४०५-१४०६
देवराय-१: १४०६-१४२२
देवराय-२: १४२४-१४४६
रामचंद्रराय: १४२२
वीरविजय बुक्कराय: १४२२-१४२४
देवराय-२: १४२४-१४४६
मल्लिकार्जूनराय: १४४६-१४६५
विरूपाक्षराय-२: १४६५-१४८५
सालुव घराणे.
नरसिंहदेवराय: १४८५-१४९१
तिम्मा भुपाला: १४९१
नरसिंहराय-१: १४९१-१५०५
तुलूव घराणे.
नरसानायक: १४९१-१५०३
वीरनरसिंहराय: १५०३-१५०९
कृष्णदेवराय: १५०९-१५२९
अच्युतदेवराय: १५२९-१५४२
सदाशिवराय: १५४२-१५७०
अरविदू घराणे
अलियरामराय: १५४२-१५६५
तुरूमलदेवराय: १५६५-१५७२
श्रीरंग-१: १५७२-१५८६
वेंकट-२: १५८६-१६१४
श्रीरंग-२: १६१४
रामदेव: १६१७-१६३२
वेंकट-३: १६३२-१६४२
श्रीरंग-३: १६४२-१६४६.
पहिला राजवंश – संगमा घराणे
या राजवंशाने विजयनगरवर साधारणपणे शंभरएक वर्षे राज्य केले असे समजले जाते. यांच्या कारकिर्दीत त्यांनी त्यांच्या उत्तरसीमेचे उत्तमप्रकारे संरक्षण केले व या दरम्यान त्यासाठी ज्या काही लढाया त्यांनी मुसलमानांबरोबर लढल्या, त्यातील दोन तीनच लढायांमधे त्यांना माघार घ्यावी लागली असेल. या युद्धातील विजयांमुळे हिंदू सैनिकांचा आत्मविश्वास इतका वाढला की दुसर्या देवरायाच्या काळात या राजांना मुसलमानांच्या आक्रमणाची फिकीर राहिली नाही. दक्षिणेकडे साम्राज्याचा विस्तार होऊन भरपूर महसूल गोळा होऊ लागला व लोककल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात आल्या. एकंदरीत शांतता व सुबत्ता व हिंदू पद्धतीप्रमाणे चांगल्या राजाचे एकछत्री अंमल असे सगळे चांगले वातावरण होते.
दुसऱ्या देवरायाच्या काळात अजून एक महत्वाची घटना घडली म्हणजे या राजाने समुद्राचे महत्व ओळखून त्यामार्गे होणार्या व्यापारावर लक्ष व अंकूश ठेवण्यासाठी लक्ष्मण नावाचा एक अधिकारी नेमला. याला पदवीच दक्षिण समुद्राचा स्वामी अशी दिली होती. पण दुर्दैवाने यावेळी व भविष्यात कधीही विजयनगरचे नौदल असल्याचा पुरावा नाही. बहुदा याचे काम समुद्रावरून येणार्या मालावरची जकात गोळा करण्याचे असावे. या राजवंशाने त्यांचा शेवटचा राजा दुसरा विरूपाक्ष सिंहासनावरून पदच्युत होई पर्यंत साम्राज्याची चांगलीच उभारणी केली.....
क्रमशः
जयंत कुलकर्णी.

विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी. भाग-३






 विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.

भाग-३
......पण त्यावेळच्या परिस्थितीकडे जर आपण दृष्टी टाकली तर आपल्याला दिसेल की दक्षिणेत मुसलमानांची स्थिती तुलनेने भक्कम होती. मदूरेला मुसलमानी सत्तेची मुळे रुजली होती. पांड्य राजे नामशेष झाले होते व होयसळ सुलतानाचे मांडलिक होते. पण आतून आग धगधत होती. वरून जरी हे होयसळ मांडलिक होते तरी नाईलाजाने ते तसे रहात होते. त्यांच्या सभोवती मुसलमानी सत्तांचा फास आवळत चालला होता व त्यावेळचा होयसळांचा राजा वीरबल्लाळ प्रत्याघात करण्यासाठी योग्य संधीची वाट बघत होता. या राजाची राजधानी हळेबीडला असल्यापासून त्याने सबूरीचे धोरण स्वीकारून संरक्षणाची तयारी चालवली होती हे आपल्याला दिसून येईल. थोडक्यात मुसलमानांचे मांडलिकत्व स्वीकारल्यास त्यांची आपल्यावर नजर राहणार नाही व आपल्याला सैन्याची जमवाजमव करायला वेळ मिळेल असे त्याचे गणित होते. त्याने पहिल्यांदा आपली सीमा सुरक्षित करण्याकडे लक्ष पुरवले.
त्याच्या राज्याच्या उत्तरेला सीमेवर तुंगभद्रा नदी होती तर पूर्वेला महत्वाचा कंपलीचा किल्ला. तुंगभद्राच्या उत्तर किनार्यावर अजून एक मजबूत किल्ला होता. त्याचे नाव होते आनेगुंदी. म्हणजे तुंगभद्रेच्या उत्तर तीरावर आनेगुंदी व दक्षिण तीरावर कंपलीचा किल्ला अशी रचना होती.
महंमद तुघलकाच्या राज्यात एकदमच बंडाळी सुरू झाल्यामुळे त्याचा कडक अंमल जरा ढिला झाला. त्यातच त्याच्या पर्शिया व अफगाणीस्तानच्या आक्रमणच्या तयारीत त्याचा खजिना पूर्ण रिता झाला होता. या संधिचा वीरबल्लळ याने फायदा उठवायचे ठरविले. अर्थात स्वातंत्र्य पुकारण्याच्या त्याच्या महत्वाकांक्षे पुढे अडचणीही तेवढ्याच जबरी होत्या. पहिली म्हणजे त्याच्या दोन बाजूला मुसलमानी सत्ताच होत्या. एक देवगिरी व दुसरी मदूरेची. स्वातंत्र्य पुकारल्यावर दोन बाजूला हे दोन शत्रू लगेचच तयार झाले असते. कदाचित एका हिंदू राजा विरूद्ध हे दोन्ही मुसलमान बंड विसरून एकत्रही झाले असते. हे लक्षात घेता त्याला या दोन सुलतानांच्या एकामेकातील दळणवळण तोडण्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्याने चोखपणे या दोन सत्तांमधे चौक्यांचे जाळे उभारले. इब्न बतूतने त्याच्या रिहालामधे या नाकेबंदीचा उल्लेख केलेला आहे. त्याने तर असे लिहिले आहे की या हिंदू राजाची मदूरेला वेढा घालण्याची तयारी होत आली होती.
जेव्हा मदूरेच्या सुभेदाराने सुलतानाविरूद्ध बंड पुकारले तेव्हा आता आपली संधी जवळ आली असे वीर बल्लाळला वाटू लागले. पण एकदम अविचाराने हालचाल न करता तो सुलतान महंमद काय करतो याची वाट बघू लागला. महंमदचे लक्ष आता उत्तरेकडे पक्के लागले हे लक्षात येताच वीरबल्लाळ मदूरेवर चाल करून गेला. यानंतर त्या काळाचा विचार केल्यास त्याने एक आगळीवेगळी गोष्ट केली. त्याने राजत्याग केला, स्वत:च्या मुलाला सिंहासनावर बसविले व स्वत:ला लढायांना वाहून घेतले. यावरून त्याला या मुसलमानांच्या विरूद्ध पुकारलेल्या युद्धाचे किती महत्व वाटत असेल हे लक्षात येते. या लढायांमधे त्याने मुसलमानांना मदूरेपर्यंत मागे रेटले व मदूरेवर हल्ला करण्यासाठी एक लाख पंचवीस हजार सैन्य गोळा केले. यात पंचवीस हजार मुसलमानही सामील होते. हे कदाचित देवगिरीपासून फुटलेले भाडोत्री सैनिक असावेत. आता त्याच्या आणि मदूरेमधे मुसलमानांचे त्रिचनापल्ली हे एकच ठाणे उरले होते. दुर्दैवाने या युद्धात वीरबल्लाळ मारल गेला व त्याचे हे स्वप्न अधूरे राहिले. हा होयसळांना मोठ्ठाच धक्का होता.
इतिहासात वरंगळच्या दोन भावांनी हरिहर व बुक्क यांनी विजयनगरच्या साम्राज्याची पायाभरणी केली असे जे इतिहासात सांगितले जाते ते तपासून बघितले पाहिजे. वीरबल्लाळच्या धडपडींमुळे या साम्राज्याचा पाया यानेच घातला असावा असे मला वाटते. अर्थात हे आपण इतिहासकारांवर सोडून पुढे जाउया. वीरबल्लाळच्या मृत्यूनंतर जो राजा गादीवर आला तो दोन तीन वर्षातच मरण पावला. कशाने हे इतिहासाला ज्ञात नाही. पण त्याने व त्यानंतरच्या राजांनी व त्याच्या प्रधानांनी उत्तर सीमा मजबूत करायचे काम मोठ्या जोमात केले हे मात्र खरे. याच प्रयत्नात कंपलीचा किल्ला मुसलमानांच्या ताब्यात गेल्यावर अशाच एका मजबूत तटबंदीची गरज भासू लागली असावी व विजयनगरचा उदय झाला असावा.
कंपलीचा किल्ला मुसलमानांच्या ताब्यात गेला १३२८ साली व त्याच्या आसपासचा काळ हा विजयनगरच्या स्थापनेचा काळ असे समजायला हरकत नाही. १३४० पर्यंत हरिहर व बुक्क यांची नावे विशेष उजेडात येत नव्हती हेही लक्षात घेण्यासारखे आहे. विजयनगरची तटबंदी उभारण्याचा काळ हाच या साम्राज्याच्या स्थापनेचा काळ समजायला हरकत नाही. १३२७/२८ च्या आसपासचा काळ !
१३२७ सालापासून पुढे सतत अनेक वर्षे या हिंदू राजांनी हा लढा चालू ठेवून हिंदूंचा प्रतिकार जागृत ठेवला याबद्दल आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत. मुसलमानांशी टक्कर घेऊन हिंदूत्व जिवंत ठेवणे हे विजयनगरच्या राजांचे घ्येय होते. त्यासाठी दक्षिणेत ठिकठिकाणी उगवलेली मुसलमानी सत्तेची बेटे बुडविणे हाच एक मार्ग होता. हे ध्येय त्यांनी शेवटी पन्नास वर्षांनी साध्य केले असे मानायला हरकत नाही. मदूरेच्या मुसलमान सुभेदाराला संपविले तेव्हा या कार्याचा एक महत्वाचा भाग संपला. दुसरे एक लक्षात घेतले पाहिजे की जरी तुघलक उत्तरेत अडकले होते तरी त्यांचे मात:बर सरदार अजूनही दक्षिणेत प्रबळ होते व त्यांची ताकद वाढतच चालली होती. किंबहुना तेही स्वतंत्र होण्याच्या मागे लागले होतेच. उत्तरेकडे गुलबर्गा येथे बहामनी सुलतानाच्या कहाण्या कानावर येत असल्यामुळे उत्तर सीमा बळकट करायचे काम चालू झाले. यातच महंमद तुघलकानंतर दिल्लीच्या तख्तावर आलेल्या फिरोजशाने उत्तर हिंदूस्तान हेच आपले कार्यक्षेत्र ठरविल्यामुळे त्याने दक्षिणेकडे दुर्लक्ष केले. त्याचा फायदा घेऊन बहामनी सुलतानाने आपले राज्य दक्षिणेकडे वाढवायचे ठरवले. अर्थात त्यात वावगे काहीच नव्हते. कोणीही असेच करेल. पण त्यामुळे विजयनगरची उत्तर सीमा सुरक्षीत करण्याचे अत्यंत महत्वाचे कार्य हरिहर, बुक्क व त्यांचे तीन भाऊ करत होते.....
क्रमशः
जयंत कुलकर्णी.

सज्जनगडाचा "किल्लेदार जिजोजी काटकर"

  सातारा शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्याच्या किनाऱ्यावर उभा असलेला “परळीचा किल्ला उर्फ सज्जनगड”... ●...